

Dr Subodh Kerkar Art Journey
esakal
हर्ष भटकळ - saptrang@esakal.com
समाज माध्यमांचा उपयोग स्वतःच्या प्रसिद्धीसाठी न करता कला शिक्षणासाठी त्याचा वापर ते करतात. ‘माझ्यासाठी इंस्टाग्राम ही कलाशिक्षणाची सोय आहे,’ असे ते सांगतात. ज्यांच्या कलाजीवनात समुद्र आणि त्याची विविध रूपं प्रकट होतात, ते डॉ. सुबोध केरकर संत तुकारामांचा आदर्श मानतात. ते म्हणतात, ‘सागराच्या लाटा फक्त पत्थर आणि वाळू यातून आकार निर्माण करत नाहीत, तर सांस्कृतिक जाणिवांवरही परिणाम करतात.’ उच्चभ्रू समाजात अडकलेली कला सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवायची त्यांची इच्छा आहे.
सुबोध यांचे बालपण सर्वसाधारण गोव्याच्या कुटुंबात गेले. त्यांचे वडील शिक्षक होते आणि ते सवड मिळेल तेव्हा चित्रे काढत असत. जवळजवळ शतकापूर्वी विख्यात पेंटर सावळाराम लक्ष्मण हळदणकर यांच्या कलाविश्वाशी केरकर कुटुंबाचा संबंध आला. १९३० मध्ये मिठाच्या सत्याग्रहाच्या वेळी हळदणकर यांचे बंधू ब्रिटिश इंडियातून बाहेर पडून त्यांनी गोव्यातील केरकरांचे मूळ गाव केरी येथे आश्रय घेतला. हळदणकर आपल्या भावाला भेटायला त्या गावात आले आणि त्यांनी समुद्राचे लँडस्केप चित्र तयार केले. त्याच वेळी त्यांनी सुबोधच्या आजोबांचे तयार केलेले पोट्रेट अजूनही त्या कुटुंबात आहे. सुबोधच्या वडिलांवर त्या घटनेचा परिणाम झाला. जरी त्यांनी शिकवण्याचा व्यवसाय निवडला, तरी त्यांनी हयातभर पेंटिंगशी संबंध राखला. ‘‘आम्ही मुलं त्यांच्या रंगफलकावर रंग ट्यूबमधून काढून ठेवत असू आणि ब्रश धुवून ठेवणं हे आमचं काम असे,’’ केरकर आठवतात. सुबोध पंधरा वर्षांचा होईतो वॉटर कलरमध्ये उत्तम पारंपरिक चित्रे काढत असे.
काही घटना वेगळ्याच दिशेने जाऊ लागल्या. सुबोध एक हुशार विद्यार्थी असल्यामुळे ते बोर्डाच्या परीक्षेत सातवे आले. त्यांनी डॉक्टर व्हायचे ठरवले आणि गोव्यातील एक यशस्वी डॉक्टर होते. ‘‘मी डॉक्टर झालो ते चुकून पण मी त्यातून लवकरच सावरलो.’’ कला आसपास होतीच. वैद्यकीय शिक्षण घेत असतानाही ते वर्तमानपत्रात कार्टून काढायचे. तेव्हा ‘द इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया’ हे टाइम्सच्या वतीने प्रसिद्ध होत असे आणि संपादक होते एम. व्ही. कामत. त्यात ते कार्टून काढत असत. काही काळाने डॉ. सुबोध केरकर यांनी वैद्यकीय व्यवसाय सोडून संपूर्ण लक्ष कलेकडे द्यायचे ठरवले, तरीही त्यांचे समाधान होईना. ‘फक्त कसब म्हणजे कला नव्हे याची जाणीव त्यांच्या विचारांना नवीन दिशा देऊ शकली. फक्त भाषेचे व्याकरण समजणे यामुळे कोणी लेखक होऊ शकत नाही. तुमच्याकडे सांगण्यासारखे काहीतरी असायला हवे.’