

India Central Asia Geopolitics
esakal
श्रीराम कुंटे - kunteshreeram@gmail.com
१९९१ चा मोठ्या उलथापालथीचा काळ होता तो. सोव्हिएत रशियाचे तुकडे होऊन एका रात्रीत पाच नव्या देशांनी जन्म घेतला आणि मध्य आशियाचं भू-राजकारण कायमचं बदललं. नव्या रचनेत बसण्यासाठी अनेक देशांना आपल्या पूर्वापार भूमिका एका रात्रीत बदलाव्या लागल्या. त्याच वेळेला अफगाणिस्तानात नॉर्दन अलायन्स आणि पाकिस्तान पुरस्कृत तालिबानमध्ये घनघोर लढाई चालू होती. अचानक मिळालेल्या भू-राजकीय संधीचा फायदा घेत भारतीय गुप्तचर खात्याने अफगाणिस्तान सीमेवरच्या ताजिकिस्तान मार्फत नॉर्दन अलायन्सशी संधान बांधलं. त्यांना मदत करण्यासाठी ताजिक सीमेच्या आत भारत चक्क एक लष्करी हॉस्पिटल चालवू लागला. भारताला नशिबाने साथ दिली आणि नॉर्दर्न अलायन्सने तालिबानची सत्ता उलथवली. याचा भारताला खूप फायदा झाला. पण २०२१ ला तालिबान पुन्हा सत्तेवर आलं आणि भारताचं नशीब पालटलं. अर्थातच भू-राजकारणात असं होणार हे गृहीत धरावंच लागतं. पण मध्य आशियात भारताने आपल्या प्रकृतीविरुद्ध हे पाऊल उचलण्याइतकं तिथलं भू-राजकारण महत्वाचं का आहे?
या टप्प्यात आपण भारत महासत्ता बनण्यासाठी जगभरातल्या महत्त्वाच्या प्रदेशांमध्ये काय भू-राजकारण खेळतोय हे बघणार आहोत. या प्रत्येक प्रदेशाशी भारताचे असलेले संबंध आणि तिथल्या भू-राजकीय गरजा वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रदेशातलं भारताचं भू-राजकारणही वेगवेगळं आहे. आपल्या प्रवासाची सुरुवात आपण मध्य आशियापासून करतोय.
मध्य आशियाशी भारताचे दोन हजार वर्षांपूर्वीपासून सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध आहेत. इ.स. पहिल्या शतकात भारतातल्या बौद्ध भिक्खूंनी रेशमी महामार्गावरून मध्य आशियात पाऊल ठेवलं. सतत हिंसाचार पाहिलेल्या मध्य आशियासाठी बौद्ध धर्माचा शांतीचा संदेश इतका अनोखा होता की त्यानंतर अवघ्या काही शतकांमध्ये तो मध्य आशियामध्ये पसरला. आज कदाचित खरं वाटणार नाही पण इस्लाम धर्म स्वीकारण्यापूर्वी अफगाणिस्तान बौद्ध धर्माचं एक प्रमुख केंद्र होता. भारतात मुघलशाही स्थापन करणारा बाबर आजच्या ताजिकिस्तानचा होता. मध्य आशियात सर्रास बोलली जाणारी पर्शियन मुघल दरबाराची राजभाषा होती. पर्शियन संस्कृती ऐन भरात असताना मंगोलांच्या आक्रमणाला घाबरून मध्य आशियातून कवी, विचारवंत, लेखक वगैरे उत्तर भारतात आश्रयाला आले. त्यामुळे भारतातलं स्थापत्य, शास्त्रोक्त संगीत, पाककला वगैरे गोष्टींवर पर्शियन संस्कृतीचा मोठा प्रभाव पडला. रेशमी महामार्गाला चीनने आपल्या सांस्कृतिक आणि आर्थिक ताकदीचं कथ्य म्हणजे नॅरेटिव्ह बनवलंय पण प्रत्यक्षात त्या मार्गावरून होणाऱ्या व्यापारापेक्षा भारतातून जाणाऱ्या मसाल्यांच्या महामार्गावरचा व्यापार कैक पटींनी मोठा होता. मसाल्यांच्या महामार्गावर सुद्धा मध्य आशिया महत्त्वाचा होता. ब्रिटिशांची सत्ता सुरु झाल्यावर व्यापारी मार्ग बदलले आणि आपल्या मध्य आशियाशी असणाऱ्या संबंधांमध्ये खंड पडला.