
India Afghanistan relations
esakal
अफगाणिस्तानबरोबरच्या संबंधात लगेच सुधारणा येणारच नाही. पण तिथल्या भू-राजकीय वर्चस्वाच्या लढाईत आपण एकटे पडू नये, ही भारताची भूमिका आहे. अमेरिका, रशिया, चीन या सगळ्यांनाच अफगाणिस्तानमध्ये प्रचंड स्वारस्य आहे, प्रत्येकाची कारणे वेगवेगळी. आपल्या भूमिकेमधला बदल हा नैतिक आदर्शवादी भूमिका बाजूला ठेवून व्यवहाराला अधिक महत्त्व देण्याचं हे महत्त्वाचं कारण.
अफगाणिस्तानवर राज्य करणाऱ्या हैबतुल्ला आखुंजादाच्या तालिबान सरकारला रशिया वगळता कोणीही मान्यता दिलेली नाही. देश चालवणाऱ्यांवर देशाबाहेर जाण्यावर निर्बंध आहेत, त्यातील अनेक जण जगासाठी दहशतवादी आहेत. तरीही अफगणिस्तानात जगातील बहुतेक सगळ्या शक्तींना रस आहे. याचं एक कारण अफगाणिस्तानचं भौगौलिक स्थान, दुसरं तिथं आपल्या विरोधातील दहशतवाद्यांना फोफावण्याची संधी मिळू नये यासाठी दक्षता. अफगाणिस्तानवर प्रत्यक्ष कब्जा बाहेरच्या कोणाला कधी करता आला नाही, मात्र जगातील भू-राजकीय स्पर्धेचा तोल इंडो-पॅसिफिक, मध्य आशिया आणि पश्चिम आशियात केंद्रित होत असताना अफगाणिस्तानात आपला प्रभाव, निदान आपलं म्हणणं ऐकणारे कान असावेत यासाठीच्या स्पर्धेला तोंड फुटलं आहे.