किल्ले आणि भव्य राजवाडे

आपल्या महाराष्ट्रासारखी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेलं, गडकिल्ल्यांनी नटलेलं, उत्तम आणि चवदार पदार्थांची रेलचेल असलेलं राज्य म्हणजे राजस्थान.
Rajasthan Pushkarmela
Rajasthan Pushkarmelasakal

- मालोजीराव जगदाळे, jagdaleomkar5@gmail.com

आपल्या महाराष्ट्रासारखी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेलं, गडकिल्ल्यांनी नटलेलं, उत्तम आणि चवदार पदार्थांची रेलचेल असलेलं राज्य म्हणजे राजस्थान. भारतामध्ये सर्वांत जास्त परदेशी पर्यटक ज्या राज्याला भेट देतात ते म्हणजे राजस्थान. पूर्णपणानं ऐतिहासिक पर्यटन स्थळांसाठी हे राज्य प्रसिद्ध असून याचे प्रामुख्याने चार भौगोलिक भाग आहेत.

सर्वांत पश्चिमेकडील वाळवंटी प्रदेश, त्या लगत असलेली अरवली पर्वताची रांग आणि त्यालगतचा प्रदेश, पूर्वेकडील बऱ्यापैकी शेतीच्या दृष्टीने समृद्ध असलेला सखल प्रदेश तर सर्वांत पूर्वेकडील एके काळचे बुंदीचे राज्य असणारा मध्यप्रदेश लगतचा भाग, असे मिळून राजस्थान राज्य बनले आहे. स्थानिक लोकांसाठी आणि प्रशासकीय दृष्ट्या पश्चिमेकडील जैसलमेर, बिकानेर येत असलेला भाग म्हणजे थारचे वाळवंट, मारवाड, मेवाड, धुंधर, शेखावटी, हाडोटी, डुंगरपूर हे प्रमुख भाग आहेत.

उदयपूर, जयपूर ,जोधपूर, जैसलमेर, माउंट अबू ही राजस्थानमधील सर्वांत प्रसिद्ध असलेली ठिकाणं आहेत. पर्यटकांकडून प्रथम पसंती या ठिकाणांना दिली जाते. पर्यटकसुद्धा आता चोखंदळ झाल्यानं पुष्कर, रणथंबोर, कोटा, बुंदी, अलवर, बिकानेर यांना सुद्धा पसंती मिळत आहे. अर्थात आपण किती दिवसांसाठी भटकंतीला जाणार आहात त्यावर नेमकी किती ठिकाणं बघता येतील याचा अंदाज येतो.

महाराष्ट्रातून जाणारे बरेच पर्यटक उदयपूर, जोधपूर, जयपूर असं साधारण सात दिवसांचं पर्यटन करून परततात. उदयपूरला पोहोचण्याआधी डुंगरपूर लागते, हे पूर्वीच्या रावळ राजांचे संस्थान. अतिशय सुंदर असे पॅलेस आणि संग्रहालय येथे आहेत. इथला उदय बिलास पॅलेस प्रसिद्ध आहे. यातील काही भागाचं हॉटेलमध्ये रूपांतर केले असून तिथं राहता सुद्धा येतं. त्याच सोबत जुना महाल, गैब सागर हा जलाशय व इथलं विंटेज कारचं संग्रहालय पाहता येईल. दोन दिवसांत डुंगरपूर व आसपासचा भाग बघता येतो. इथून उत्तरेला शंभर किलोमीटरवर उदयपूर आहे. उदयपूर व जवळपासचा परिसर अतिशय प्रेक्षणीय असल्यानं इथं पाचसहा दिवस सुद्धा थांबता येतं.

उदयपूरबद्दल माहिती देण्यापूर्वी काही गोष्टी आवर्जून सांगाव्याशा वाटतात. महाराष्ट्रातील जवळपास सर्व गड-किल्ले हे सरकारच्या ताब्यात आहेत म्हणजेच एखाद-दुसरा अपवाद वगळता खासगी किल्ले अस्तित्वात नाहीत. परंतु या उलट राजस्थानमध्ये दीडशेपेक्षा जास्त किल्ले आणि शेकडो पॅलेस हे खासगी मालकीचे आहेत. त्यामुळे या खासगी किल्ले आणि राजवाड्यांमध्ये हॉटेल व रेस्टॉरंट आपल्याला दिसतील. या जागेचा इतिहास व तेथील सौंदर्य त्या त्या ठिकाणी राहून अनुभवता येते.

या सर्व खासगी ऐतिहासिक स्थळांच्या मालकांनी मिळून इंडियन हेरिटेज हॉटेल ग्रुपची स्थापना केली असून त्याचे अध्यक्ष जोधपूरचे राजे गजसिंह आहेत, त्यांच्या वेबसाइटवर या सर्व राजवाड्यांची माहिती मिळू शकेल. महाराष्ट्राप्रमाणेच राजस्थानमधील सरकारी मालकीच्या गड-किल्ल्यांचे पावित्र्य राखले असून तेथे कोणत्याही प्रकारचे हॉटेल अथवा रेस्टॉरंट नाहीत.

तत्कालीन मेवाडची राजधानी असलेल्या उदयपूरमध्ये सुद्धा लहान-मोठे असे शेकडो पॅलेस आहेत. इथल्या पिचोला तलावाभोवती हे संपूर्ण जुने शहर असून सर्व प्रमुख ऐतिहासिक स्थळं इथंच आहेत. उदयपूरच्या महाराणांचं निवासस्थान असलेले सिटी पॅलेस व तिथलं संग्रहालय प्रेक्षणीय आहे. इथून जवळच असलेल्या बागोर की हवेली या ठिकाणी राजस्थानमधील लोककलांचं सादरीकरण होतं. तलावाजवळ असलेल्या गंगोर घाट व आमराई घाट यांच्या काठावर अनेक सुंदर रेस्टॉरंट आणि कॅफे आहेत.

तिथं राजस्थानमधील प्रसिद्ध अशी दाल बाटी, ५६ भोग थाळी, लाल मास, सफेद मास, जंगली मास, यासारख्या पदार्थांचा आस्वाद घेता येईल. इथं जवळच्या डोंगरावरच समर पॅलेस म्हणून ओळखला जाणारा सज्जनगड हा किल्ला आहे.

उदयपूरपासून जवळच नाथद्वार हे भगवान श्रीकृष्णाचे प्रसिद्ध असे ठिकाण आहे. हे एक ऐतिहासिक स्थळ असून येथील मंदिरसुद्धा बरेच जुने आहे. वैशिष्ट्यपूर्ण असा नाथद्वारी चहा इथलाच. मेवाडचे कुलदैवत एकलिंगजी महाराज मंदिर आणि राणा प्रताप यांचे प्रसिद्ध हल्दीघाटीचे स्मारकसुद्धा उदयपूरपासून जवळ आहे. उदयपूरकडून जोधपूरकडे जाताना इतिहास प्रसिद्ध असे चितोडगड आणि कुंभलगड हे किल्ले बघून पुढे जाता येईल.

हँडीक्राफ्टची भारतातील सर्वांत मोठी बाजारपेठ म्हणून जोधपूरचं नाव आहे. दोन हजार कोटींपेक्षा जास्तीची उलाढाल दरवर्षी येथे होते. लाखो परदेशी पर्यटक येथे खरेदीसाठी येतात. शहराच्या मधोमध असलेल्या सरदार बाजारमध्ये सात हजारपेक्षा जास्त दुकाने आहेत. कापड, कातड्यापासून बनवलेल्या वस्तू, लाकडी वस्तू या प्रामुख्याने येथे मिळतात. इथला मेहरानगड किल्ला आणि उमेद भवन पॅलेस हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहेत.

एकेकाळचं इथल्या राजांचं निवासस्थान असलेलं उमेद भवन पॅलेस आता जगातील सर्वोत्कृष्ट हॉटेलपैकी एक आहे. याचा काही भाग पर्यटकांसाठी खुला आहे. ब्ल्यू सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जोधपूरमधील जुन्या काळातील या निळ्या घरांच्या मधल्या निमुळत्या रस्त्यांवरून आवर्जून पायी फेरफटका मारावा. जोधपूरवरून जयपूरला जाऊन तिथे भटकंती थांबवता येते किंवा जोधपूर ते जैसलमेर मग पुढे बिकानेर आणि तिथून जयपूर असंही करता येते.

हिवाळ्याच्या दिवसांत गेलात तर जैसलमेरमध्ये वाळवंटाची सफर आणि डून बॅशिंग आवर्जून करावे, शक्य असल्यास वाळवंटात काही ठिकाणी स्थायी कॅम्प आहेत तेथे मुक्काम करावा. जैसलमेरचा किल्ला अतिशय सुंदर असून किल्ल्यात २५० पेक्षा जास्त कुटुंब अजूनही राहतात. त्यामुळे याला लिविंग हेरिटेज असं म्हटलं जातं.

जैसलमेरच्या तुलनेत बिकानेरला फार लोक भेट देत नाहीत, मुख्य टुरिझम सर्किटपासून काही तुटत असल्यानं व नेमकं काय बघावं याची माहिती नसल्यानं बिकानेरच्या दिशेनं फारशी पावले वळत नाहीत. इथला जुनागढचा किल्ला, गजनेर राजवाडा आणि जवळच असलेले अभयारण्य या सगळ्यांला हजारो पर्यटक दरवर्षी भेट देतात. राजस्थान सरकारचं मुख्य पुराभिलेख कार्यालय बिकानेर इथं असून सर्व जुनी कागदपत्रं इथं उपलब्ध आहेत.

देशातलं पहिलं डॉक्युमेंट म्युझियम बिकानेर इथं असून या संग्रहालयामध्ये अतिशय विशेष स्वरूपात बनवली गेलेली छत्रपती शिवाजी महाराज गॅलरी आहे. ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची राजस्थानात उपलब्ध असलेली सर्व तत्कालीन अस्सल कागदपत्रं प्रदर्शन रूपात ठेवण्यात आलेली आहेत. बिकानेरला जाल तेव्हा आवर्जून या संग्रहालयाला भेट द्या.

जयपूर आणि त्याच्या आजूबाजूचा भाग इतिहास प्रसिद्ध आणि पर्यटन स्थळांची रेलचेल असलेला असल्याने त्यासाठी वेगळा विशेष लेख आवर्जून लिहावा लागेल. त्यामुळे जयपूरबद्दलची माहिती सध्या राखून ठेवतो. राजस्थानमधील परदेशी पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असलेली काही ठिकाणी आहेत, जिथं भारतीय पर्यटक क्वचितच भेट देतात. रणथंबोरचा किल्ला आणि तेथील राष्ट्रीय अभयारण्य प्रसिद्ध आहे.

४०० पेक्षा जास्त मंदिरं असलेलं पुष्कर हे धार्मिक स्थळ जरी असले, तरी वाराणसीप्रमाणे इथं अनेक परदेशी पर्यटक आकर्षित होतात. दरवर्षी होणारा पुष्कर मेळा प्रसिद्ध असून या मेळा काळात चार लाखांपेक्षा जास्त लोक भेट देतात. राजस्थान मध्ययुगीन काळातील लघुचित्रे, भित्तिचित्रे यांसाठी प्रसिद्ध आहे, बुंदी, किशनगड, कुचामन या ठिकाणांना कला रसिकांनी आवर्जून भेट द्यावी. भटकंतीसाठी राजस्थान अतिशय मोठा प्रदेश असून इतिहासप्रेमी, कलाप्रेमी, खवय्ये अशा सर्व प्रकारच्या पर्यटकांना राजस्थान आकर्षित करतो.

(लेखक जगभर भटकंती करत असतात, साहसी पर्यटनावर त्यांचा भर असतो.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com