

Milind Shinde journey from theatre to FTII and Mumbai
sakal
सुधाकर निसळ यांनी जीएंच्या दोन कथा ऐकवल्या. त्यातील ‘मुक्ती’वर दोन अंकी नाटक राज्य नाट्य स्पर्धेत करायचं ठरलं... अडीच महिन्यांच्या तालमीनंतर नाटक स्पर्धेत सादर झालं, पहिलं आलं... मुक्ती झालं; आपलं काय?
पुण्यातील फिल्म ॲन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या मेन गेटपर्यंत मन जाऊन थांबलं होतं आणि वडिलांची ‘नाही रे’ची आरोळी पुन्हा मागे खेचत होती. पुन्हा घरामध्ये उभा झगडा उभा राहिला. वडील एका बाजूला, मी एका बाजूला आणि आई ‘न्यूट्रल’ म्हणजे माझ्या बाजूला... घरामध्ये आरडाओरडा करणारी शांतता असे. सगळे खूप बोलतायत, हिरीरीनं आपली मतं मांडतायत; पण ऐकू कुणालाच कुणाचं येत नव्हतं...निद्रिस्त कोलाहल भरून राहिला होता..
त्यात वडिलांची सहाय्यक संचालक या पदावर नियुक्ती झाली (पदोन्नती) होती. बीडला त्यांची बदली झाली. बीड आमचं गाव. आई बीड शहरातली आणि वडील बीडपासून २० किलोमीटर असलेल्या अतिशय लहान अशा निरगुडी या अतिशय छोट्या गावातले. आमचा सगळा गोतावळा बीडमध्ये असल्याने वडील आनंदाने बीडला गेले. त्यांचा नगरमधला वन बीएचके फ्लॅट मला मिळाला आणि मग काय ते घर म्हणजे आमच्या ग्रुपसाठी प्रयोगशाळाच बनून गेलं. नाट्यविषयक चर्चा तिथं झडू लागल्या. वाचन, संगीत बैठका, नेपथ्य मांडणीची प्रात्यक्षिकं सगळं आकार घेऊ लागलं.