panchachuli mountain five pandavas history significance culture himalaya
panchachuli mountain five pandavas history significance culture himalayaSakal

पंच चुली : नातं पांडवांशी

आपल्या भारताचा जाज्वल्य इतिहास हा हिमालयाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. महाभारत असो वा रामायण, हिंदू संस्कृती, भारतीय सभ्यता घडविणाऱ्या सर्व महत्त्वाच्या घटनांमध्ये हिमालयाचा उल्लेख आहे.

- उमेश झिरपे

आपल्या भारताचा जाज्वल्य इतिहास हा हिमालयाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. महाभारत असो वा रामायण, हिंदू संस्कृती, भारतीय सभ्यता घडविणाऱ्या सर्व महत्त्वाच्या घटनांमध्ये हिमालयाचा उल्लेख आहे. हिमालयात वसलेले असंख्य पर्वत आजही इतिहासातील या घटनांची साक्ष देतात. यातील एक उल्लेखनीय पर्वत म्हणजे पंच चुली.

महाभारतातील पाच पांडव अर्थात युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल व सहदेव यांनी हिमालयामार्गे स्वर्ग गाठला, तेव्हा त्यांनी पृथ्वीतलावरील शेवटचे भोजन जिथं केलं, तो पर्वत म्हणजे पंच चुली. या पर्वत शिखर समूहामध्ये पाच शिखरे असून सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरणं या शिखरांवरून आकाशाकडं परावर्तित होऊन आसमंत उजळवतात.

तसेच सूर्यास्तानंतर जिवंत चूल जशी असते तसा प्रकाश काही वेळासाठी या पर्वतांमधून दिसून येतो. पाच शिखरे म्हणजे पाच पांडवांचा संदर्भ अन् चुलीसारखं दिसणारं दृश्य या दोहोंमुळं या शिखराला पंच चुली असं नाव पडलं.

सूर्यास्तानंतर दिसणारं दृश्य हे मोक्ष प्राप्तीशी साधर्म्य साधणारं असून याचा संदर्भ पांडवांच्या पृथ्वीवरील शेवटच्या भोजनाशी आहे, असं पायथ्याजवळ असणाऱ्या गावांमध्ये राहणारे स्थानिक आवर्जून सांगतात.

उत्तराखंड राज्यात असलेल्या गढवाल हिमालय अन् नेपाळमध्ये असणाऱ्या गुरन्स हिमालयाच्या दरम्यान असलेली डोंगररांग म्हणजे पंच चुली. वायव्येकडून आग्नेय दिशेकडे पसरलेल्या या पर्वतशिखरांच्या समुदायामध्ये ६३५५ मीटर उंच पंच चुली-१,

६ हजार ९०४ मीटर उंच पंच चुली-२, ६ हजार ३१२ मीटर उंच पंच चुली-३, ६ हजार ३३४ मीटर उंच पंच चुली ४, ६ हजार ४३७ मीटर उंच पंच चुली-५ या शिखरांचा समावेश होतो. सोबतीला ६ हजार ४१ मीटर उंच नागलिंग,

६ हजार ७१ मीटर उंच बैंती, ६ हजार ५३७ मीटर उंच राजरंभा, ६ हजार १०२ मीटर उंच तेलकोट, ६ हजार ४१० मीटर उंच नागलफू व ५७८२ मीटर उंच शदेव या दुर्गम शिखरांचा समावेश होतो.

उत्तराखंड राज्यातील कुमाऊँ भागातील मुन्सीयारी हे पिथोरगड जिल्ह्यातील गाव, या शिखर समूहांच्या सर्वांत जवळ असलेली मोठी मानवी वस्ती आहे. हा भाग सध्या येथील पर्यटनामुळं प्रसिद्ध आहे. या ठिकाणी जेव्हा मी पहिल्यांदा गेलो होतो,

तेव्हा पंच चुली शिखर समूहाचं दर्शन घेतलं होतं. गोरी गंगा नदीवर वसलेल्या मुन्सीयारी गावातून पंच चुली शिखरं अगदी स्पष्ट दिसतात. पहाटेच्या वेळी उजळलेला आसमंत अन् संध्याकाळी पर्वतांभोवती असलेला चित्त वेधणारा प्रकाश अगदी मनात घर करून गेला.

या मुन्सीयारी इथंच नंदादेवी मंदिर आहे, या मंदिराच्या मागच्या बाजूस पर्वत शिखरं अगदी खुलून दिसतात. स्वतःचा शोध घेण्यासाठी जी शांती व एकाग्रता हवी असते, ती इथं गेल्यावर मिळते. कदाचित हीच शांती किंवा मोक्ष प्राप्तीची अनुभूती पांडवांना देखील इथंच मिळाली असेल, असा विचार मनात येतो.

गिर्यारोहणाचा विचार करता पंच चुली शिखरांचा समूह हा नेहमीच हटके गिर्यारोहण करणाऱ्या गिर्यारोहकांच्या नजरेत राहिला आहे. १९२९ पासून ब्रिटिशकालीन गिर्यारोहकांनी पंच चुली शिखर समूह चढण्याचे प्रयत्न केले मात्र त्यात यश आलं नाही.

पुढं तब्बल ४३ वर्षे भारतीय तसेच विदेशी गिर्यारोहकांनी पंच चुली शिखर गाठण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र पंच चुली अबाधितच राहिलं. या पाच शिखरांमधील सर्वांत उंच शिखर असलेल्या पंच चुली-२ शिखराच्या नैर्ऋत्य धारेवर काहीशा खालच्या बाजूस तीन उंचवटे आहेत.

गिर्यारोहक या शिखरवजा उंचवट्यांनाच पंच चुली समूहातील शिखरं समजून चकतात. या ४३ वर्षांच्या काळात असंच झालं असावं, असा गिर्यारोहण क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांचा अंदाज आहे. पंच चुली शिखर समूहातील पहिलं शिखर चढलं गेलं ते म्हणजे ६३५५ मीटर उंच असलेलं पंच चुली- १.

भारतीय गिर्यारोहण क्षेत्रातील एक आदरणीय नाव असलेल्या मेजर हुकूम सिंह यांच्या नेतृत्वाखाली इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिसच्या संघाने ही कामगिरी केली. १९७२ साली, म्हणजे पंच चुली शिखरावर पहिला प्रयत्न करणाऱ्या ह्यूज रटलेज यांच्या १९२९ च्या मोहिमेनंतर तब्बल ४३ वर्षांनी यश आले.

एका वर्षांनंतर पंच चुली-२ शिखराच्या नैर्ऋत्य धारेनं इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिसच्याच संघानं चढाई करत या शिखर समूहातील सर्वांत उंच शिखर चढाई यशस्वी करण्याची कामगिरी केली. या संघात एकूण १८ गिर्यारोहक सहभागी झाले होते.

गिर्यारोहक महेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम यशस्वी झाली. पंच चुली - १ व २ शिखरांवर यशस्वी चढाई झाल्यावर तब्बल १९ वर्षांनी पंच चुली-५ या ६४३७ मीटर उंच शिखरावर १९९२ साली चढाई यशस्वी झाली तर पंच चुली-४ शिखरावर १९९५ मध्ये न्यूझीलंडच्या गिर्यारोहक संघानं यशस्वी चढाई केली.

पाच शिखरांमध्ये उंचीनं सर्वांत कमी असलेल्या, मात्र चढाईसाठी तितक्याच अवघड असलेल्या पंच चुली-३ शिखरावर २००१ मध्ये यशस्वी चढाई करण्यात आली. पाचही शिखरांवर सर्वांत प्रथम यशस्वी चढाई करण्यामध्ये तब्बल पाच दशकांचा कालावधी लागला, यावरूनच या शिखरांची दुर्गमता, त्यातली कठीणता लक्षात येते.

पंच चुली शिखर समूह हा अद्‍भूत, अगम्य व तेवढ्याच नयनरम्य हिमालयाची साक्ष आहे. या शिखर समूहाला ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व आहे. गिर्यारोहणाच्या दृष्टीनं इथं अनेक आव्हानं आहेत, सोबतीला इथं असणारा नजारा हा तितकाच देखणा आहे.

पर्यटनाच्या दृष्टीनं देखील शिखर समूहाच्या जवळ असणारा भाग वेगानं विकसित होत आहे. पांडवांशी थेट संबंध असल्यानं भावनिकदृष्ट्या देखील पंच चुलीचं वेगळं महत्त्व आहे. हिमालयातील हा आगळा वेगळा शिखर समूह एकदा तरी बघायला हवा.

(लेखक हे ज्येष्ठ गिर्यारोहक असून अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघाचे अध्यक्ष आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com