राजवंश भारती : मौर्य राजवंश

Marathi Article : इतर अनेक प्राचीन राजवंशांप्रमाणेच मौर्य वंशाबद्दलही विद्वानांमधे एकमत नाही. त्यांचा काळ नक्की कोणता, यावर आजही घनघोर वाद होत असतात.
Ashoka stambh
Ashoka stambhesakal

लेखक : ॲड. सुशील अत्रे

महाभारतानंतरच्या काळात भारतातील बहुधा सगळ्यात विशाल साम्राज्य हे मौर्य साम्राज्य होते. पाश्चात्त्य इतिहासकारांच्या दृष्टीने तर तिथंपासूनच भारताचा इतिहास सुरू होतो. त्याच्या आधीच्या काळाला ते ‘इतिहास’ मानायलाच तयार नाहीत. तो भाग जाऊ द्या; पण प्राचीन भारतातील राजवंशांमधे मौर्य वंशाची गणना अग्रक्रमाने होते, यात शंकाच नाही. इतर अनेक प्राचीन राजवंशांप्रमाणेच मौर्य वंशाबद्दलही विद्वानांमधे एकमत नाही. त्यांचा काळ नक्की कोणता, यावर आजही घनघोर वाद होत असतात. (saptarang latest article on Mauryan Dynasty news)

म्हैसूरच्या ग्रंथसंग्रहालयात असलेली कौटिल्याच्या अर्थशास्त्राची मूळ भूर्जप्रत
म्हैसूरच्या ग्रंथसंग्रहालयात असलेली कौटिल्याच्या अर्थशास्त्राची मूळ भूर्जप्रतesakal

प्रचलित मान्यता अशी आहे, की इ. स. पूर्व ३२४ मध्ये चंद्रगुप्त मौर्य सम्राट बनला. नंद वंशातील अखेरचा राजा धनानंद याचा, आर्य चाणक्याच्या मदतीने पराभव करून चंद्रगुप्त मगधाच्या गादीवर बसला. त्याच्या वंशाला ‘मौर्य’ हे नाव कसे मिळाले, यावरही विविध मते आहेत.

चंद्रगुप्त हा राजा धनानंदाचाच दासीपुत्र होता, त्याच्या आईचे नाव ‘मुरा’ असल्याने त्याने आपला वंश आईच्या नावे ‘मौर्य’ ठरवला, असे एक मत आहे. तो एका गुराख्याचा मुलगा होता आणि त्याला चाणक्याने हेरले, असे एक मत आहे. तो ‘मयूर-पोषक’ समाजात जन्मला म्हणून त्याला ‘मौर्य’ नाव मिळाले, असे जैन ग्रंथामध्ये म्हटले आहे.

यापैकी कोणत्याच दाव्याला ठोस पुरावा नाही. त्या काळातले, आज उपलब्ध असलेले ग्रंथ म्हणजे ‘कौटिलिय अर्थशास्त्र’ आणि ‘मुद्राराक्षस’ हे नाटक. यापैकी अर्थशास्त्र हा एकूणच राजधर्म विशद करणारा ग्रंथ आहे. याचा कर्ता कौटिल्य अथवा चाणक्य तथा विष्णुगुप्त हा आहे. या अद्वितीय ग्रंथाची भूर्जप्रत १९०४ मध्ये म्हैसूरच्या ग्रंथसंग्रहालयात सापडली.

मात्र या ग्रंथात चंद्रगुप्तचा स्वतंत्र उल्लेख नाही. ‘मुद्राराक्षस’ हे नाटक लिहिणारा विशाखादत्त तर खूपच नंतरच्या काळातील आहे. त्यामुळे चंद्रगुप्त मौर्य नक्की कोण, हे गूढ आजही कायम आहे. ग्रीक सम्राट अलेक्झांडर इ. स. पूर्व ३२७ मध्ये भारतात आला होता. तो परत गेला (भारत जिंकून वगैरे अजिबात नव्हे.) त्यानंतर चंद्रगुप्त सत्तेवर आला.

चंद्रगुप्तचा सामना ग्रीक राजा/ सेनानींपैकी सेल्युकस निकेटरशी झाला होता; ॲलेक्झांडरशी नव्हे. चंद्रगुप्ताविषयी काहीही सांगायचे, तर चाणक्याला वगळून सांगताच येणार नाही. नंद वंशाचा संपूर्ण उच्छेद करून नवख्या चंद्रगुप्तला गादीवर बसवणारा चाणक्य होता. आजच्या भाषेत तो ‘किंगमेकर’ होता. काही काळ तो मौर्य साम्राज्याचा अमात्यसुद्धा होता.

गंमत बघा, एवढे प्रचंड साम्राज्य ज्यांनी उभे केले ते दोघेही चाणक्य आणि चंद्रगुप्त आयुष्याच्या उत्तरार्धात संन्यस्त होते. चंद्रगुप्त राज्यत्याग करून दक्षिणेत श्रवणबेळगोळला गेला आणि तिथे त्याने भद्रबाहू या जैन मुनींचे शिष्यत्व स्वीकारले. त्यानंतर चाणक्याने काही काळ बिंदुसाराचा अमात्य म्हणून काम केले आणि नंतर वानप्रस्थ स्वीकारले. (latest marathi news)

Ashoka stambh
मराठी गाण्यांमधील कविता

इ. स. पूर्व ३२४ पासून मौर्य राजवंश सुरू झाला. एक मतप्रवाह असा, की या वंशात एकूण नऊ राजे होऊन गेले. त्यांची नावे अशी अमित्रघात अथवा बिंदुसार, सम्राट अशोक, दशरथ, संप्रति, शालिशुक, देववर्मन, शतधन्वा आणि बृहद्रथ. यांची कारकीर्द इ. स. पूर्व १८४ पर्यंत होती.

त्या साली बृहद्रथाचा सेनापती पुष्यमित्र शुंग याने बृहद्रथाचा वध केला आणि स्वत:चा राज्याभिषेक केला. म्हणजे, सुमारे १४० वर्षे मौर्य वंशाची सत्ता होती. याविरुद्ध ‘कलियुगराज वृत्तांत’ या प्राचीन ग्रंथामध्ये आणि पुराणात नमूद केल्याप्रमाणे मगध राजसिंहासनावर मौर्य वंशाचे एकूण १२ सम्राट होऊन गेले.

त्यांनी एकूण ३१६ वर्षे राज्य केले आणि तो काळ इ. स. पूर्व १५३४ ते १२१८ असा होता. हा मतप्रवाह ज्यांचा आहे, त्यांनीही शेकडो संदर्भ बघून, ग्रंथ वाचून मग आपले मत दिले आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांपैकी कोणालाही थिल्लरपणे ‘मूर्ख’ म्हणण्याआधी आपला अभ्यास किती, हे बघणे आवश्यक आहे.

मौर्य सम्राटांपैकी चंद्रगुप्त इतकाच; किंबहुना थोडा अधिकच प्रसिद्ध असलेला राजा म्हणजे सम्राट अशोक! चंद्रगुप्तचा नातू इ. स. पूर्व २७३ ते इ. स. पूर्व २३६ अशी त्याची कारकीर्द मानली जाते. आयुष्याच्या पूर्वार्धात अत्यंत उग्र आणि निर्मम असणारा आणि उत्तरार्धात बौद्ध धर्म स्वीकारून ज्याने हिंसेचा पूर्ण त्याग केला, तो हा अशोक. (latest marathi news)

Ashoka stambh
इंग्लंडमधील वसाहत प्रेम आणि अवडंबर

आज भारताचे राजचिन्ह असलेला चार सिंहांकित ‘अशोक स्तंभ’ ही त्याचीच देणगी आहे. सारनाथ या ठिकाणी उत्खननात सापडलेला हा मूळ स्तंभ आजमितीस सारनाथ वस्तू संग्रहालयात ठेवलेला आहे. तो सुमारे सात फूट उंचीचा आहे. बौद्ध धर्माचा प्रसार भारताबाहेर करण्यात मोठे योगदान अशोकाचे होते.

‘देवानाम् प्रिय .. प्रियदर्शी’ अशी त्याची पदवी होती. अशोकाबाबतही काही इतिहास अभ्यासकांचा दावा असा आहे, की प्राचीन भारतात मौर्यवंशीय अशोक आणि गुप्तवंशीय अशोक असे दोघे वेगवेगळ्या कालखंडात होऊन गेले. ज्याचे अनेक शिलालेख आपण बघतो, तो गुप्तवंशीय अशोक होता.

त्याने नंतर बौद्ध धर्म स्वीकारला. दोन्ही मतप्रवाह आपापल्या दाव्यांना दुजोरा देणारे अनेक मुद्दे मांडतात. या लेखापुरता मी अधिक प्रचलित असलेला मतप्रवाह गृहित धरून मौर्य राजवंशाची माहिती दिली आहे. परंतु एखादी पर्यायी ‘थिअरी’ कोणी मांडली असेल, तर ती न वाचताच बाजूला फेकणे मला योग्य वाटत नाही.

कारण मौर्य वंशाबद्दल कोणताही वादातीत व स्पष्ट पुरावा आज तरी उपलब्ध नाही. तेव्हा, वाचकांनी आपल्या परीने अधिक अभ्यास केला आणि आपले स्वत:चे मत बनवले, तर ती अधिक आनंदाची गोष्ट आहे.

Ashoka stambh
बोलून मोकळं व्हा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com