तीन रसांचं श्रीविष्णुमंदिर  

चिकमगळूर जिल्ह्यातलं बेलवाडीचं वीरनारायण मंदिर.
चिकमगळूर जिल्ह्यातलं बेलवाडीचं वीरनारायण मंदिर.

मंदिरस्थापत्य हा माझा आवडीचा विषय असला तरी, मला त्यातही, कर्नाटकातल्या होयसळ राजांनी बांधून घेतलेली मंदिरं फार आवडतात. मंदिरांवरचं माझं हे सदर जे वाचक सुरुवातीपासून वाचत आलेले आहेत त्यांना ही बाब जाणवली असेल. ‘क्लोरायटिक शिस्ट’ नावाच्या दगडाच्या शिळांवरून होयसळ राज्यातल्या कुशल शिल्पकारांची बोटं फिरली आणि त्या दगडाची रेष न् रेष जिवंत झाली. एका मंदिराचं शिल्पसौंदर्य बघून आपण भारावून जातो न जातो तोच दुसऱ्या मंदिरात त्याहूनही अधिक सुंदर मूर्ती, अधिक सुबक कोरीव काम, मूर्तीच्या मुखावरचे भाव अजूनच देखणे. होयसळ मंदिरं बघताना - माझे गुरू देगलूरकर सरांचा शब्द वापरायचा तर - आपण एकदम शिल्पबंबाळ होऊन जातो! 

चिकमगळूर जिल्ह्यातलं बेलवाडीचं वीरनारायण मंदिर हे असंच एक अप्रतिम होयसळमंदिर. होयसळ राजा नरसिंह पहिला यानं बाराव्या शतकात या मंदिराच्या निर्मितीला सुरुवात केली. पुढं हे मंदिर त्याचा मुलगा वीर बल्लाळ पहिला यानं पूर्णत्वास नेलं. त्रिकुटाचल पद्धतीचं म्हणजे तीन शिखरं आणि तीन गर्भगृहं असलेलं हे विलक्षण देखणं मंदिर. तिन्ही मंदिरांना जोडणारा, १०८ खांबांवर तोलला गेलेला उघडा सभामंडप. त्या खांबांची तकाकी इतकी सुरेख की आजही, अगदी आठशे वर्षांनंतरदेखील तुम्ही तुमचा चेहरा त्या खांबात प्रतिबिंबित झालेला पाहू शकता. 

या मंदिराचं एक मोठं आकर्षण म्हणजे, हे मंदिर सुदैवानं अनाघ्रात राहिलं. मलीक काफूर या अल्लाउद्दीन खिलजीकडच्या मूर्तिभंजकाची वक्रदृष्टी या मंदिराकडे वळली नाही. चौदाव्या शतकात खिलजीच्या सैन्यानं बेलवाडीपासून जवळच असलेली होयसळ राज्याची राजधानी द्वारसमुद्रम् लुटून, तोडून-मोडून पार बेचिराख करून टाकली. इथली सर्व मंदिरं उद्ध्वस्त केली, मूर्ती फोडल्या, इथल्या हिंदू लोकांचा नरसंहार केला, तेव्हा बेलवाडी कदाचित थोडं दूर, जंगलात असल्यामुळे असेल; पण या संहारापासून हे गाव वाचलं. 

इथल्या वेणुगोपाल, वीरनारायण आणि श्रीनरसिंहाच्या मूर्ती आठशे वर्षांपासून अखंड पूजेत आहेत. पुढं म्हैसूर संस्थानच्या कारकीर्दीत हे गाव तिथल्या वडियार राजांनी श्रीशृंगेरी मठाला दान म्हणून दिलं होतं. तेव्हापासून या मंदिराची व्यवस्था श्रीशृंगेरी मठातर्फे बघितली जाते. प्रशांत भारद्वाज नावाचा एक हसरा तरुण अर्चक सध्या मंदिराचं पौरोहित्य करतो. गेल्या चारशे वर्षांपासून त्याच्या घराण्यात या मंदिराचं पौरोहित्य करण्याची अखंडित परंपरा आहे. औपचारिक उच्च शिक्षण घेऊनसुद्धा प्रशांत शहरातली नोकरी, तिथलं छानछोकीचं जीवन सोडून आपल्या घराण्याचा पारंपरिक वारसा जपण्यासाठी बेलवाडीत परत आला. मंदिराचं पौरोहित्य तो अत्यंत श्रद्धेनं, आत्मीयतेनं आणि सेवा म्हणून करतो; नोकरी म्हणून नव्हे. 

बेलवाडीच्या या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे, इथल्या तीन गर्भगृहांतल्या तीन मूर्ती भरतमुनींच्या नाट्यशास्त्रानं सांगितलेल्या रससिद्धान्तानुसार, तीन वेगवेगळ्या रसांची निष्पत्ती भाविकांना देतात. भरतमुनींनी सांगितल्यानुसार, सर्व कलांची परिणती ही रसनिष्पत्तीमध्ये आहे आणि श्रृंगार, वीर, करुण, रौद्र, भयानक, अद्भुत, हास्य, शांत आणि बीभत्स असे नवरस आपण मानतो. बेलवाडीच्या मंदिरात ज्या मूर्ती पूजेत आहेत त्या म्हणजे श्रीविष्णूची तीन रसांतली वेगवेगळी रूपं आहेत. मंदिरात प्रवेश करताक्षणी थेट समोर जो गाभारा दिसतो, त्यामध्ये श्रीविष्णूची वीरनारायण या स्वरूपातली मूर्ती आहे. उजवीकडचा खालचा हात व्याघ्रहस्तमुद्रेत आहे, तर डावीकडचा खालचा हात वीरमुद्रेत आहे. जवळजवळ आठ फूट उंचीची ही मूर्ती गरुडपीठावर उभी आहे. चेहऱ्यावरचे भाव निग्रही आहेत. चक्र, गदा ही श्रीविष्णूची नेहमीची आयुधंही आहेत. वीररसाची अनुभूती देणारी ही मूर्ती आहे. 

श्रीवीरनारायणाकडे आपण तोंड करून उभे राहिलो तर उजवीकडच्या गाभाऱ्यात शांतरसाची अनुभूती देणारी श्रीनरसिंहाची योगमूर्ती आहे. श्रीनरसिंह योगमुद्रेत शांत बसलेत. त्यांच्या वरच्या दोन्ही हातांमध्ये शंख आणि चक्र आहेत आणि खालचे दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवलेले आहेत. दोन्ही गुडघ्यांवर योगपट्ट आहे. मागं प्रभावळीवर नेहमीच्या कीर्तिमुखाऐवजी शांतिदर्शक पद्म आहे. मूर्तीच्या मुखावरचे भाव योगमग्न आहेत. 

इथली तिसरी मूर्ती आहे ती वेणुगोपालाची. ही मूर्ती अत्यंत सुरेख आहे. अगदी ‘एएसआय’च्या तज्ज्ञ मूर्तिशास्त्रज्ञ मंडळींनी तसं मान्य केलेलं आहे. काळ्याकुळकुळीत गंडकी पाषाणाच्या एकाच शिळेतून निर्माण केलेली मूर्ती म्हणजे खरोखरच कुणा अत्यंत समर्थ शिल्पकाराच्या आयुष्यभराच्या तपश्चर्येचं फळ आहे. श्रृंगार आणि करुण अशा दोन्ही रसांची अनुभूती देणारी ही देखणी मूर्ती आहे. 

वेणुगोपाल आपल्याच तंद्रीत मग्न होऊन झाडाखाली मुरली वाजवतोय. त्याच्या कपाळावर सुरेख रेखलेलं ऊर्ध्व पुंड्र  आहे. त्याचे डोळे अर्धोन्मीलित आहेत, हाताची बोटं लांबसडक आणि रेखीव आहेत. एक पाय जमिनीवर पूर्ण टेकलेला आहे, तर दुसऱ्या पायाची फक्त बोटं जमिनीवर टेकलेली आहेत. ती देखणी पावलं पाहिली की देवाच्या पावलांना चरणकमल का म्हटलं जातं ते पुरतंच उमगतं. 

श्रीकृष्णाचं शरीर त्रिभंगात आहे. मागं प्रभावळीवर दशावतार कोरलेले आहेत. मूर्तीच्या पायाशी दोन्ही बाजूंना श्रीदेवी-भूदेवी आहेत. वर सनक, सनंदन, सनातन व सनत्कुमार हे चार ऋषी मुरली ऐकायला ध्यानस्थ बसलेले आहेत. ऋषींच्या खालच्या बाजूला, तल्लीन होऊन श्रीकृष्णाच्या गाई त्याचं मुरलीवादन ऐकत आहेत. सर्व गाईंची तोंडं श्रीकृष्णाकडे वळलेली आहेत. 

मुरलीधराच्या अस्फुट कमळकळीसारख्या ओठांवर मंद स्मित आहे. अशी ही अत्यंत देखणी मूर्ती. त्या मूर्तीवर प्रशांत अत्यंत प्रेमानं नित्यालंकार चढवतो. मोजकीच फुलं. मुकुटावर एक टपोरं फूल, मुरलीच्या टोकावर एक, पायांवर दोन, शेजारी श्रीदेवी-भूदेवीवर दोन, टपोऱ्या मोगरीचे गळ्यात एक किंवा दोनच हार आणि नीटनेटकं नेसवलेलं, एकही चुणी नसलेलं स्वच्छ पांढरं धोतर. गर्भगृहात भरून राहिलेला तो कापराचा, धुपाचा, आरतीचा, फुलांचा मंद, मिश्र दरवळ आणि खाली एका तबकात ठेवलेली घासून-पुसून स्वच्छ केलेली लखलखणारी चांदीची आणि तांब्या-पितळेची पूजेची उपकरणं. इतकं प्रसन्न वाटतं, बेलवाडीच्या मंदिरात गाभाऱ्याबाहेर उभं राहिलं की! वाटतं की कुठल्याही क्षणी तो मुरलीधर आपल्या त्या रेखीव ओठांनी त्या बासरीत हळुवारपणे फुंकर मारेल आणि आपण त्या स्वर्गीय सुरांच्या प्रवाहात वाहून जाऊ, आणि आपलं ते सुरात हरवून जाणं प्रसन्न नजरेनं तो सांवळा पाहत असेल. 

(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com