

Shivaji Maharaj History
esakal
अनिकेत यादव - इतिहास अभ्यासक
औरंगजेब व अन्य शाहजादे युद्धात गुंतल्याचे पाहून आदिलशाहाने मुघलांसोबतचा तह झुगारून दिला. या तहान्वये आदिलशाहाच्या ताब्यातील ‘निजामशाही कोकण’ मुघलांना देण्याचे ठरले होते. तह झाल्यापासून ते तो पाळावयाचा नाही असे आदिलशाहाने ठरवेपर्यंत निजामशाही कोकणात मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. याचा फायदा घेऊन महाराजांनी चपळतेने तो प्रदेश काबीज करून राज्यविस्तार केला.
दाभोळवर छापा : छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला आदिलशाही मुलूख व दाभोळ बंदर त्यांच्याकडे ठेवण्याचे २३ एप्रिल १६५७च्या पत्रानुसार औरंगजेबाने मान्य केले होते. म्हणजे त्यापूर्वी दाभोळ बंदरावर महाराजांनी स्वारी केली असावी.
सिद्दींचा इतिहास : आफ्रिका खंडातील अॅबिसिनीया (सध्याचा इथिओपिया) प्रांतातून गुलाम म्हणून आलेला हा समुदाय विविध राज्यकर्त्यांकडे नोकरीला होता. अॅबिसिनीयाला अरबीत ‘हबश’ व तेथील रहिवाशांना ‘हबशी’ म्हणत. तर आफ्रिकन लोकांना अरबी व फार्सी भाषेत ‘सय्यिदी/सैदी’ म्हणत. त्यावरून मराठीत ‘सिद्दी’ हे नाव रूढ झाले. त्यांची काटक शरीरयष्टी व अफाट मेहनतीमुळे या समुदायातील कित्येकजण मोठ्या हुद्यावर पोहोचले. त्यांच्या नावामागे ‘सय्यिदी’ अशी उपाधी लावली जात. निजामशाहचा मुख्य कारभारी मलिक अंबर, आदिलशाहीतील रणदौलाखान, रुस्तुम-इ जमान, सिद्दी जौहर इत्यादी प्रसिद्ध सरदार हे याच वंशाचे होते. यापैकीच सिद्दी अंबरने १६१७मध्ये जंजिरा किल्ल्याचा ताबा घेऊन त्या प्रदेशावर स्वतंत्रपणे कारभार सुरू केला. (निजामशाह, आदिलशाह, पोर्तुगीज, मोगल, इंग्रज इत्यादींचे वेळोवेळी प्रभुत्व मान्य करत तब्बल ३३० वर्षे सिद्दी वंशाने राज्य केले व शेवटच्या सिद्दी मुहम्मदखान याचे कार्यकाळात ३ एप्रिल १९४८ रोजी जंजिरा संस्थान स्वतंत्र भारतात सामील झाले.) त्यांच्या ताब्यात सावित्री ते कुंडलिका नद्यांच्या मधील सुमारे ९०० चौ.कि.मी. प्रदेश होता. या प्रांताला ‘हबसाण’ असेही म्हणत.
१६५६मध्ये शिवाजीराजांनी जावळी घेतल्यापासून, किंवा त्याही अगोदर १६४६मध्ये जावळीत हस्तक्षेप केल्यापासून त्यांचा सिद्दींशी संघर्ष सुरू झाला. सिद्दीविरुद्धची पहिली मोहीम (अं.१६४७ ते १६५२ च्या सुमारास) मोसे खोऱ्याचे देशमुख बाजी पासलकर यांनी केल्याचा उल्लेख येतो (सभासद बखर). ३१ जुलै १६५७च्या सुमारास रघुनाथ बल्लाळ सबनीस यांनी दंडा-राजपुरीच्या सिद्दीविरुद्ध मोहीम काढली आणि जावळीस लागून असलेला त्याचा मुलूख (तळा, घोसाळा इ. किल्ल्यांसह) जिंकून घेतला. पोर्तुगीज व आदिलशाहने सिद्दीला मदत पोहोचविल्याने आणि लढाऊ जहाजे नसल्यामुळे जंजिऱ्यावर हल्ले करणे यावेळी मराठ्यांना शक्य झाले नाही.