ते अस्वस्थतेचे दिवस ( SUNDAY स्पेशल)

ते अस्वस्थतेचे दिवस ( SUNDAY स्पेशल)

ईशान माझ्या मित्राचा मुलगा. देखणा हुशार. कॉम्प्युटर इंजिनिअर. त्याची पत्नी सायली गोड, सालस मुलगी. तीही कॉम्प्युटर इंजिनिअर. ईशान आणि सायली हसतमुख, खेळकर जोडपं. दोघंही आयटी कंपनीमध्ये हिंजेवाडीला काम करणारे. वर्षाभरापूर्वीच लग्न झालेलं. भरपूर पगार, स्वतंत्र कार्स. वेल फर्निश्‍ड सोयीसुविधांनी सुसज्ज घर. दोघांचेही परदेश दौरे झालेले. सगळं कसं दृष्ट लागण्यासारखं... 

...आणि दृष्ट लागावी असंच घडलं. वर्षभरापूर्वी त्यांच्या लग्नात दोघंही उत्साहानं ओसंडून वाहणारी प्रसन्न व्यक्तिमत्त्वं होती. आज माझ्यासमोरचा ईशान खूप थकलेला, निरुत्साही. सायलीदेखील विलक्षण थकल्यासारखी वाटली. मी नीट न्याहाळत होतो. शेवटी सायलीनंच कोंडी फोडली, ‘‘सर, सध्या आम्हा दोघांनाही प्रचंड अस्वस्थ वाटतंय. ताण वाढलाय- ऑफिस आणि आमच्या रिलेशनमधलाही. याची सारखी चिडचिड असते. आठ-आठ दिवस अबोला असतो. एकदम डिव्होर्सचीच भाषा. माझा मोबाईल चेक करतो; फेसबुक, व्हॉट्‌सॲप्स सगळंच. मी कुणाशी बोलते, कुणाला काय लिहिलंय. कुठल्या मित्राशी जवळकीचे संबंध आहेत का? हज्जारो गोष्टी. त्याचा फोन मात्र चेक करू देत नाही. त्याच्याही दहा मैत्रिणी आहेत. एक-दोन खास. शिवाय, रात्री उशिरापर्यंत त्या घाणेरड्या फिल्म्स आणि फोटो बघायचे. गेम्स खेळायचे. मी काहीही बोलत नाही. माझी प्रायव्हसी मला असावी, एवढंच माझं म्हणणं आहे.’’ 

मध्येच ईशान चिडून बोलला, ‘‘सायली, हे अती होतंय. सगळ्याच चुका माझ्या नाहीत. तुझा अहंकार, आयुष्य जगण्याच्या चुकीच्या कल्पना, मुलांशी अती स्वैर चॅट करणं हे चूकच. तू विवाहित आहेस, विसरू नकोस. यावर तुझा अहंकार, इगो या गोष्टी सगळ्याला कारणीभूत आहेत.’’ 

***** ***** ***** ***** ***** ***** ***** ***** ***** *****
माझ्या लक्षात आलं, दोघंही विलक्षण अस्वस्थ आहेत. परिणामी, त्यांना काय बोलतोय याचं भान नाहीये. त्याची कारणं दोघांशी स्वतंत्रपणे, तसंच नंतर एकत्र बोलून जाणून घ्यायला हवीत. दोघांनाही शांत केलं. या परिस्थितीतून निश्‍चित मार्ग काढण्याचं आश्वासन दिलं. मी दोघांनाही आधीपासून ओळखत होतो. म्हणूनच माहीत होतं, की दोघंही कुठल्यातरी विचित्र परिस्थितीत सापडलेत, म्हणून गुंता निर्माण झालाय. त्याचबरोबर दोघंही निश्‍चितपणे अस्वस्थतेच्या आजाराचे (Anxiety Neurosis) बळी ठरलेले दिसत होते. कदाचित नैराश्‍याच्याही. आधी वैयक्तिक अस्वस्थतेची कारणं शोधावीत. External stressors (बाह्य परिस्थितीजन्य कारणं) आणि Internal stressors (आंतरिक जैविक, स्वभावजन्य इ.) कारणं, यांचा मागोवा घ्यायला हवा होता. त्यावरचे उपाय करायला हवे होते. 

***** ***** ***** ***** ***** ***** ***** ***** ***** *****

दोघांशी बोलताना अनेक गोष्टी समोर आल्या, त्या अशा - दोघांवरही अतिशय ताण आहे. दोघांचीही एकाग्रता, आत्मविश्वास खूप कमी झालाय. कामात लक्ष नाही. परिणामी, परफॉर्मन्स ॲप्रायजलवर परिणाम होतोय. शारीरिक तक्रारी, अशक्तपणा वाढतोय. आयुष्यातला आनंद नाहीसा झाल्यासारखं वाटतंय. दोघांचाही रोजचा प्रवास जवळजवळ अडीच तासांचा. तोही अतिशय हेवी ट्राफिक. रात्री उशिरा घरी येणं. आल्यावर दोघंही, विशेषतः सायली विलक्षण थकलेली. दोघांमधला संवाद संपल्यासारखाच. जेव्हा जेव्हा एकजण पुढाकार घेतो, त्यात साध्या गप्पांमधूनसुद्धा भांडणंच होतात. मूळचे आनंदी स्वभावाचे, चिडचिडे झालेत. शारीरिक आणि मानसिक थकव्यामुळं लैंगिक संबंध जवळजवळ नाहीतच. कधी जवळ आलेच तर त्यात एकसुरीपणा जाणवतो. शनिवार, रविवार सुटीचा. पूर्वी दोघंही एकत्रितपणे नियोजन करायचे. निवांतपणा उपभोगायचे, तो आनंद संपलाय. उणीदुणी काढण्यातच वेळ जातो. आपण काय, किती टोकाचं बोलतोय, अनाठायी चिडतोय, याचं भानच हरवलंय. सुरवातीपासून भरपूर कमाई असल्यामुळे सुटीच्या दिवशी अवास्तव खर्च करण्याची सवय लागलीय. घरात गरज नसताना भरपूर वस्तू आल्यात. विलासाची, चंगळवादाची सवय लागलीय. तरीही अतृप्तीच जाणवतेय. माझी कमाई, तुझी कमाई, माझी ऑफिसमधली पोझिशन, तुझी पोझिशन यातून असूया वाढली. त्याला अहंकाराचं खतपाणी. मुख्य म्हणजे ऑफिस, करिअरमधील ताणतणाव चोवीस तास दोघांना वेढून राहिलेत. परिणामी, दोघांच्याही स्वास्थ्याला ग्रहण. स्वाभाविकतः त्यांचं स्वत:शी अन्‌ एकमेकांचं निकोप नातंच होरपळतंय. अन्‌ सुख शोधणं चालू होतं सोशल मीडियात स्वत:ला गुंतवून घेण्यात. 

***** ***** ***** ***** ***** ***** ***** ***** ***** ***** 
काही महिन्यांत योग्य उपचारांनंतर ईशान आणि सायली या अस्वस्थतेतून बाहेर आले. योग्य औषधोपचार, समुपदेशन, व्यायाम, तणाव नियोजनाची जुनी आणि अद्ययावत तंत्रं त्याचबरोबर आयुष्याकडे पाहण्याचा निकोप दृष्टिकोन जोपासायला शिकणं; भोग लालसेला, चंगळवादी विचारसरणीला लगाम, मुख्य म्हणजे सर्वच बाबतीत कुठं थांबायचं हे कळणं, करिअरइतकंच स्वत:तल्या आणि इतरांमधल्या माणूसपणाला महत्त्व देणं या सगळ्या गोष्टी शिकणं दोघांसाठी आवश्‍यक होतं. सर्वच क्षेत्रांत काम करणारे आणि अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स असणारे खूप ईशान किंवा सायली आढळतात. सध्याच्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात, आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच स्तरांतील बऱ्याच तरुणांवर ताणतणाव, त्याचे दुष्परिणाम वाढताना दिसताहेत. त्यातून बाहेर पडण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न पाहिजेत, स्वबंधनं आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना यावर भर दिला पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com