

Contemporary Indian Art
esakal
हर्ष भटकळ - saptrang@esakal.com
मुंबईतच राहणाऱ्या सुनील पडवळ यांचे बालपण वेगळेच होते. पडवळ यांची गुंतागुंतीची रेखाटणे हीच त्यांची ओळख पटवतात. पण त्यातून ते काही सुचवत आहेत असे त्यांना वाटत नाही. त्यातून काही गोष्टी समोर याव्या असा इरादा नाही. त्यांना तुलना कराविशी वाटते ती हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताशी.
हिंसा आणि विसंगती यांनी गजबजलेल्या त्या काळच्या मुंबईच्या आठवणीतून निसटण्यासाठी नव्हे तर त्या आठवणींना अधिक उन्नत आणि चिरस्थळी रूप देण्यासाठी सुनील पडवळ यांनी कला माध्यमाचा उपयोग केला. ‘‘मी जे पाहत आलो ते कधी विसरू शकलो नाही.’’ पडवळ सांगतात ते शांतपणे. त्या आठवणी जणू एका वेगळ्याच मुंबईच्या आहेत. मुंबईत कामाठीपुराच्या जवळ कुंभारवाड्यात ते लहानाचे मोठे झाले. ते जग होते रस्त्यावरील मारामारीचे, टोळीयुद्धाचे, धर्मनिष्ठ मोर्चांचे आणि धर्माधर्मातील तणावाचे. ‘‘ते दिवस धाकधपटशाचे होते. जगण्यासाठी त्यांचीच भाषा जाणून घ्यावी लागायची. माझे अनेक साथीदार हे गुन्हेगारीकडे वळले. काही गुंडगिरी करू लागले. बऱ्याच जणांना लवकर मरण आलं. सुदैवाने मी कसाबसा त्यातून वाट काढू शकलो. परंतु त्या अनुभवाच्या जखमी कायम राहिल्या. कित्येक वर्षे उलटली तरी एक घटना काही केले तरी विसरली जात नाही. एक तरुण सिनेमाहून परतत असताना रस्ता चुकून एका वेगळ्याच परिसरात पोहोचला. १९८० चा सुमार जातीय दंगे सुरू होते. तो परक्या धर्माचा आहे अशा गैरसमजुतीने त्याला गर्दीत ठेचून मारले गेले. त्याने शेवटचा श्वास घेतला, ते दृश्य मला अजून आठवते.
या घटनेतील क्रौर्य तर लक्षात राहण्यासारखे होतेच शिवाय त्यानंतर निर्माण झालेले प्रश्न त्यांना अजून जाचत आहेत. साधी सामान्य माणसं अचानक हिंसक कशी बनतात? ती माणसं जेव्हा एका भाऊगर्दीचा भाग होतात, तेव्हा त्यांना काय होतं?’’
या प्रश्नाला कलेच्या माध्यमातून ते उत्तर शोधत राहिले.
निराळ्या दृष्टीने पाहणारे वडील