

Trinamool Congress Crisis
esakal
पश्चिम बंगालमधील नाट्यमय घडामोडीत ममता यांची हम करेसो थाटाची निर्णय प्रक्रिया, अभिषेक बॅनर्जी याच्या उदयातून पक्षात आलेली अस्वस्थता, खास करून त्यांनी पक्षाच्या केडरपेक्षा आय पॅकसारख्या सल्लागार संस्थेवर ठेवलेला भरवसा आणि पक्षात कथित कार्पोरेट शैली आणायचा प्रयत्न, यावरची प्रतिक्रिया, बंडवाल्यांमधील अनेकांवर यंत्रणांची टांगती तलवार अशा अनेक घटकांचा वाटा आहे. अर्थात तरीही हे प्रत्यक्षात येऊ शकते याचं सगळ्यात महत्त्वाचे कारण या सगळ्याला हवा देण्यात भाजपचं राज्यात आणि देशपातळीवरचं राजकीय गणित आहे
एक विजय, एक पराभव काय उलथापालथी घडवू शकतो, याचे दर्शन पश्चिम बंगालमधील चक्रावून टाकणाऱ्या घडामोडीत घडत आहे. पश्चिम बंगालचा गड भाजपनं जिंकला, तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांचं राज्य उलथवलं, तेव्हाच तृणमूल कॉँग्रेसचं पुढं काय होणार याविषयी चर्चा सुरू झाली होती. मुख्यमंत्री झालेल्या सुवेंदू अधिकारी यांनी तृणमूलचं विघटन होत तो संपेल, असं भाकीत निकालादिवशीच केलं होतं. बंगालमध्ये एकदा सत्तेत मांड ठोकून असेलला पक्ष सत्ताहीन होतो, तेव्हा त्याचं राजकीय पतन गतीनं होतं. याचा अनुभव आधी कॉँग्रेस नंतर डाव्यांनी घेतला आहे. डाव्यांनी स्वातंत्र्यापासूनची कॉँग्रेसची सत्ता संपवली आणि ३४ वर्षे पश्चिम बंगालवर राज्य केलं. कॉँग्रेसकडे नंतर कधीच सत्तेचा दावेदार म्हणावी अशी ताकद उरली नाही. डाव्यांची ही सत्ता ममता बॅनर्जी यांनी संपवली आणि क्रमानं डावे निष्प्रभ होत गेले. ममता यांनी डाव्यांचा प्रमुख विरोधक हे स्थान आधी मिळवलं. ते करताना कॉँग्रेसचा जनाधार खेचून घेतला. नंतर डाव्यांना सत्ताभ्रष्ट करत त्यांनी १५ वर्षे निर्विवाद बंगालवर सत्ता गाजवली. अलीकडं भाजपनं तृणमूलचा प्रमुख विरोधक असे स्थान आधी मिळवलं. ते करताना डाव्यांचा जनाधार हिसकावला आणि नंतर ममतांना सत्तेतून पायउतार केलं.