फक्त सामाजिकच!

आमच्या स्त्री आधार केंद्राच्या कामात आम्हाला जिने दीर्घकाळ मोलाची साथ दिली, ती म्हणजे आमची मैत्रीण ज्योती कोटकर! ज्योतीने दीर्घ काळ संघटना बांधण्यात सहकार्य केलं.
Social Work
Social Worksakal

आमच्या स्त्री आधार केंद्राच्या कामात आम्हाला जिने दीर्घकाळ मोलाची साथ दिली, ती म्हणजे आमची मैत्रीण ज्योती कोटकर! ज्योतीने दीर्घ काळ संघटना बांधण्यात सहकार्य केलं. अशी आमची लाडकी ज्योती २०२२ मध्ये आम्हाला सोडून गेली. तिच्यासारख्या बऱ्याच कार्यकर्त्यांचं कालौघात हळूहळू काम थांबलं. एखाद्या महिलेचा लोकसंग्रह तिचं मोठं शक्तिस्थान असतं. अशा महिला समाजकारणा-बरोबरच राजकारणातही कार्यरत राहायला हव्यात.

तीस वर्षांच्या कालावधीत अनेक कार्यकर्त्या बरोबर आल्या. सर्वांनी सर्व वेळेला अगदी जीवाला जीव देऊन काम केलं. उन्हातान्हात आमच्यासोबत चालल्या, आठ-दहा तासांचे प्रवासाचे कष्ट घेतले... अनेक मोर्चांत पुरुषांच्या बरोबरीने त्या चालल्या. या सगळ्या साथीत मला त्यांचा भगिनीभाव जाणवलाच; पण त्याचबरोबर प्रवासामध्ये त्यांच्याशी झालेल्या गप्पागोष्टींतून सुख-दुःखाची ओळख झाली.

या सगळ्यात जिने माझ्यावर जास्तीत जास्त प्रवास केला आणि स्त्री आधार केंद्राच्या कामात साथ दिली ती म्हणजे, आमची मैत्रीण ज्योती कोटकर. तिचं मूळचं आडनाव साप्ते. मुंबईच्या नंदादीप विद्यालयामध्ये एकत्र शिकत असताना तिची आणि माझी फार मैत्री नव्हती; परंतु एक छान असा जिव्हाळा आमच्यात होता. त्यानंतर ज्योती १९९० मध्ये मला अचानकच माझ्या निवडणुकीनंतर भेटली.

ती म्हणाली, ‘‘मला तुझ्यासोबत काम करायचं आहे. मी कॅटरिंगचं कंत्राट घेते, त्यामुळे ते सांभाळून मला तुझ्यासोबत काम करायचं आहे.’’ तिचा स्वभाव आनंदी होता. त्याच्यामुळे इतके मोठमोठे प्रश्न आलेले दिसले, की ती थोडीशी त्याचबरोबर भावनाविवश होत असे. ज्योती अगदी सरळ आणि सौम्य स्वभावाची होती.

प्रत्येक सामाजिक संस्थेत राजकीय पक्षाच्या तुलनेत डावपेच, कट-कारस्थान नसतात; पण याचा अर्थ प्रत्येकच राजकीय पक्षात ते नसतातच, असं मी म्हणणार नाही. सामाजिक संघटनात्मक समस्या असतात; परंतु त्यामानाने व्यक्तिगत कुरघोडी, स्पर्धा किंवा सत्तेचं पद असं सामाजिक संस्थांत नसल्यामुळे त्याच्यात कामाची वेगळी स्पर्धा असते.

दैनंदिन कामासाठी विविध भागांमध्ये जाणं, वेळ देणं, महिलांशी न कंटाळता बोलणं, त्यांच्या शंका निरसन करत राहणं, इत्यादी सगळी कामं ज्योती करत असायची. ज्योतीने १९९० पासून २०१५ पर्यंत दीर्घकाळ संघटना बांधण्यात सहकार्य केलं. त्या काळात नागपूर आणि जळगावबरोबरच भुसावळ, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, लातूर, धाराशिव, औसा, उमरगा इत्यादी अनेक ठिकाणी कार्यालयं चालत. तिथे समुपदेशनाचं काम चालत असे.

काही ठिकाणी भूकंप व कायदा जागृतीचा भाग म्हणून समुपदेशन चालायचं. काही ठिकाणी आरोग्य प्रशिक्षणाचा भाग म्हणून समुपदेशन केलं जायचं. त्याचबरोबर महिलांचं संघटन, प्रशिक्षण आणि नेतृत्व विकासावर मार्गदर्शन व्हायचं. १९९० नंतर १५-१६ वर्षांच्या मुलींचं आणि महिलांचं संघटन, प्रशिक्षण आणि नेतृत्व विकास व्हायचा. अत्याचारग्रस्त महिलांसाठी कम्युनिटी लेव्हलला म्हणजे सामाजिक स्तरावर महिलांचे गट उभे करणं अशा अनेक प्रकारे काम सुरू होतं.

१९९५ मध्ये नैरोबीला जागतिक विश्व महिला संमेलन झालं. त्याच्या तयारीसाठी एका सामाजिक संस्थेची भारतीय स्तरावर समन्वय समिती तयार करण्यात आली होती. त्या समितीत महाराष्ट्राची व पश्चिम भारतातील सामाजिक समिती करण्यात आली होती. त्याची समन्वयक म्हणून मी काम करत होते. त्यामुळे मुंबई, गोवा, गुजरात आणि मध्य प्रदेश अशा चारही राज्यांचं काम आम्ही एकत्रितपणे पाहत होतो.

त्या कामांसाठी देशपातळीवर दिल्लीला अनेक बैठकांना आम्ही वारंवार जात होतो. त्यात माझा त्या कामांचा भार वाढत गेला. ज्योती बैठकीतील विचार समजून मराठीतील भाषणं बोलून, लिहून आणि बोलायला मदत करायची. आमच्या कामाचा झपाटा चाललेला होता. १९९५ च्या बीजिंगच्या विश्व महिला संमेलनात भारतातून जवळजवळ ५०० महिला प्रतिनिधींचा समावेश होता आणि महाराष्ट्रातील त्यातील २५ महिला प्रतिनिधींचा प्रवास खर्च करण्यात आला होता.

ज्योती आमच्या कामांत मदत करत असताना माझ्याबरोबर अनेकदा दिल्लीला यायची. शेवटच्या क्षणी भारतातून स्थानिक भाषेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी तीन तिकिटं उपलब्ध झाली. त्यात महाराष्ट्राच्या कोट्यातून ज्योतीचा समावेश करण्याची आम्हाला संधी मिळाली. ज्योती बीजिंगला आली. तिला इंग्लिश बोलता येत नव्हतं; परंतु समजत होतं. तिला बोलण्याची आवड होती. त्यामुळे भारतीय हिंदी भाषिक महिलांमध्ये ती फार लोकप्रिय झाली. कारण प्रत्येक ठिकाणी त्या गप्पा मारत असत, बोलत असत... अशा आमच्या लाडक्या ज्योती कोटकरचं निधन २७ आॅक्टोबर २०२२ रोजी झालं.

अशाच प्रकारच्या बऱ्याच कार्यकर्त्यांचं कालौघात हळूहळू काम थांबलं. कोणी आजारी पडलं; परंतु आर. डी. शेलार गुरुजी, वत्सला पाटील, आशा रणदिवे इत्यादींसारख्या काही कार्यकर्त्यांचं आजारपणामुळे देहावसन झालं. या सगळ्यांच्या बरोबरीने काही अशाही महिला आहेत, की ज्या कुटुंबातील दबावामुळे यायच्या बंद झाल्या. त्यांच्यातसुद्धा काही जणींनी आपत्ती हे कारण सांगितलं, पण ते खरं नव्हतं.

मला तर एका महिलेची कथा आठवते, की त्या अतिशय उत्साही अशा कार्यकर्त्या होत्या. आमच्या पहिल्या महिला सत्यशोधक परिषद जी सप्टेंबर १९८९ मध्ये झाली, त्यात त्यांचा अतिशय उत्साही असा सहभाग होता. एखाद्या महिलेचा लोकसंग्रह हे तिचं मोठं शक्तिस्थान असतं. अशी स्त्री समाजाला कुठे ना कुठे राजकीय शक्तींना अंकित करून घ्यावी, असं वाटायला लागतं. तिला अंकित करून घेत असताना तिचा प्रभाव, त्याचा राजकीय लाभ उठवण्याचा हेतू होता. त्याचा परिणाम म्हणून ती राजकारणापासून दूरच रहिली; परंतु समाजकारणातही आली नाही.

अशा वेळी कार्यकर्त्या निर्णय घेतात, की मी फक्त सामाजिक कामच करेन! बऱ्याचशा स्त्रिया आजही राजकारणात जाताना दहा वेळा विचार करतात त्याचं तेच कारण आहे. म्हणून सामाजिक का राजकीय, अशा प्रश्नामध्ये बऱ्याचशा महिला आजही म्हणतात, की फक्त सामाजिकच! हा ‘च’ जाऊन राजकारणात यायला व सातत्याने काम करायला आपल्याला खूप काम करत राहावं लागेल, असं मला नेहमी जाणवतं.

neeilamgorhe@gmail.com

(लेखिका विधान परिषदेच्या उपसभापती आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com