
-तानाजी पवार
वहागाव: किरकोळ कारणावरून आजी नऊ वर्षाच्या नातवावर ओरडल्याचे निमित्त झाले आणि त्याच रागात त्याने रविवारी भरदुपारी घर सोडले. ऊन-पावसाची तमा न बाळगता त्याने सायकलवर कोल्हापूर जिल्ह्यातील मूळ गावी जाण्याचा विचार केला. एवढेच नव्हे तर त्या रागाच्या भरात तो एक-दोन किलोमीटर नव्हे, तर तब्बल ५० किलोमीटर सायकल चालवत कऱ्हाड तालुक्यातील वनवासमाचीपर्यंत पोहोचला. तेव्हा मात्र रिक्षाचालकाच्या प्रसंगावधानाने व पोलिसांच्या तत्परतेने तो सापडला अन् नातेवाइकांचा जीवच जणू भांड्यात पडला.