मायणीत रस्त्याच्या शस्त्रक्रियेची गरज, मल्हारपेठ-पंढरपूर रस्त्यावर कोंडी

मायणीत रस्त्याच्या शस्त्रक्रियेची गरज, मल्हारपेठ-पंढरपूर रस्त्यावर कोंडी

मायणी (जि. सातारा) : रुंदीकरणाच्या कामासाठी येथील मुख्य रस्त्यावरील वाहतूक बंद करून बायपास रस्त्याने वळविण्यात आली आहे. मात्र, बायपास रस्त्यावरील प्रचंड दलदलीने नागरिक हैराण झाले आहेत. बायपास रस्त्यावर किमान मुरमीकरणाची शस्त्रक्रिया ग्रामपंचायतीने करावी, अशी आग्रही मागणी होत आहे. 

येथील बाजारपेठेतून जाणाऱ्या मल्हारपेठ-पंढरपूर रस्त्यावर सतत वाहतुकीची कोंडी होत असे. ती टाळण्यासाठी काही व्यावसायिक, अवजड वाहनांचे मालक व नागरिकांच्या सहकार्याने चांद नदीच्या काठावरून तात्पुरता बायपास रस्ता तयार करण्यात आला. त्यावर मुरमीकरण अथवा खडीकरण करण्यात आलेले नाही. परिणामी, रस्त्यावर अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे ठिकठिकाणी रस्ता खचत आहे. मोठे खड्डे पडत आहेत. त्यामध्ये पाणी साचून राहत आहे. रस्त्याच्या कडेलाच अनेक नागरिकांनी सांडपाणी सोडलेले आहे. सार्वजनिक काही गटाराचे पाणीसुद्धा त्या रस्त्यावर येत आहे. त्यामुळे सतत रस्त्यावर दलदल असते. त्या दलदलीतून मार्ग काढताना वाहनचालकांना कमालीची कसरत करावी लागते. अचानक दलदलीत फसून वाहनचालकांना अपघात होत आहेत. बायपास रस्त्याच्या दलदलीतून चालत जाणे केवळ अशक्‍य आहे. अनेकदा वाहने दलदलीत रुतून बसत आहेत. घसरून दलदलीत पडत आहेत. चालक जखमी होत होऊन वाहनांचे नुकसान होत आहे. 

मात्र, त्याकडे कोणीही संवेदनशीलतेने व जबाबदारीने पाहताना दिसत नाही. येथील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने मुख्य रस्ता वाहतुकीस बंद करण्यापूर्वी लोकांची वाहतुकीची गैरसोय टाळणे आवश्‍यक होते. तात्पुरत्या बायपास रस्त्यावर किमान मुरमीकरण व खडीकरण करणे आवश्‍यक होते. मात्र, त्यांनी त्याकडे कानाडोळा केला. ग्रामपंचायतीसह स्थानिक नेते व गावगाड्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनीही त्यासाठी आवश्‍यक पाठपुरावा केलेला नाही. त्याचे दुष्परिणाम स्थानिक नागरिकांसह सर्वच वाहनचालकांना सोसावे लागत आहेत. ग्रामपंचायतीने लोकांच्या सोयीसाठी व सुरक्षिततेसाठी बायपास रस्त्यावर किमान मुरूम टाकावा. तेही करणे अशक्‍य असल्यास रस्त्यावरील साचलेल्या पाण्याचा आवश्‍यकतेनुसार वारंवार उपसा करावा व लोकांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी नागरिक करीत आहेत. दरम्यान, बायपास रस्त्यावर मुरूम टाकून ग्रामपंचायतीने दलदल दूर करावी व लोकांना दिलासा द्यावा, अशी मागणी व्यावसायिक दीपक देशमुख यांनी केली. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com