

BJP’s Electoral Surge in Satara Leaves Opposition Reeling
sakal
सातारा : जिल्ह्यातील नऊ पालिका व एका नगरपंचायतीच्या निवडणुकीत महायुतीमधील घटक पक्षांमध्येच झालेल्या लढतींमध्ये सात ठिकाणी नगराध्यक्षपद पटकावत जिल्ह्यातील राजकारणात आपणच ‘धुरंधर’ असल्याचे भाजपने दाखवून दिले. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे व जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे सातारा, फलटण, वाई, म्हसवड, रहिमतपूर, मलकापूर व मेढा या ठिकाणी भाजपचे वर्चस्व राहिले आहे. मतदारसंघातील तीन नगरपालिकांपैकी मकरंद पाटील यांना महाबळेश्वर व पाचगणीचे गड राखण्यात यश आले. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे चिन्ह राजकीय पटलावर टिकले. मात्र, वाईने त्यांना दगा दिला. कऱ्हाडमध्ये माजी आमदार बाळासाहेब पाटील व शिवसेनेचे राजेंद्रसिंह यादव यांच्या युतीमुळे अतुल भोसले यांना त्यांच्याच मतदारसंघात पराभवाची चव चाखावी लागली. गेल्या ३० वर्षांपासून आपल्या पालिकांवर सत्ता गाजवणारे फलटणचे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, राष्ट्रवादीचे सुनील माने व लक्ष्मी कऱ्हाडकर यांना बसलेला पराभवाचा झटका हा या पालिका निकालांमधील महत्त्वाच्या घटना ठरल्या आहेत.