चार वर्षे हेलपाटे मारून थकले तरीही 960 विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचितच राहिले

चार वर्षे हेलपाटे मारून थकले तरीही 960 विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचितच राहिले

पाटण (जि. सातारा) : सन 2016 मध्ये घेण्यात आलेल्या आर्थिकदृष्ट्या मागास शिष्यवृत्ती परीक्षेतील पात्र लाभार्थींची शिष्यवृत्ती गेली चार वर्षे शासनाने दिलेली नाही. पात्र, लाभार्थी विद्यालयात हेलपाटे मारून थकले असले, तरी त्यांना न्याय मिळालेला नाही. सातारा जिल्ह्यातील 960 विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित असून, 25 लाखांवर शिष्यवृत्तीचे पैसे मिळाले नसल्याने पात्र विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
 
ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 60 हजारांच्या आत असते, अशा कुटुंबातील इयत्ता आठवीचा विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या मागास शिष्यवृत्ती परीक्षा देतो. परीक्षा देऊन पात्र झालेल्या विद्यार्थ्याला केंद्र शासन प्रत्येक महिन्याला 500 रुपये याप्रमाणे वर्षाला सहा हजार रुपये शिष्यवृत्ती देते. पुढील शिक्षणात त्या शिष्यवृत्तीचा विद्यार्थ्याला उपयोग होतो. मात्र, सन 2016 मध्ये घेण्यात आलेल्या व परीक्षा देऊन पात्र लाभार्थी झालेल्या विद्यार्थ्यांना चार वर्षांत एक रुपयाही मिळालेला नाही. या शिष्यवृत्तीसाठी माध्यमिक शाळेने केंद्र शासनाच्या वेबसाईटला रजिस्ट्रेशन करावे लागते. ज्यांचे रजिस्ट्रेशन झाले आहे, त्या शाळा पात्र लाभार्थींचे शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन प्रस्ताव पाठविते. ज्या शाळांचे रजिस्ट्रेशन झालेले नाही, त्या शाळा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठवितात.

माणला पुन्हा पावसाने झोडपले; बाजरी, कांद्यासह पिकांचे नुकसान 

तो प्रस्ताव पुढे पुणे व पुन्हा दिल्ली कार्यालयाकडे जातो. ऑनलाइन प्रस्ताव पाठविलेल्या विद्यार्थ्यांची चार वर्षे शिष्यवृत्ती मिळालेली नाही. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात वंचित लाभार्थी व पालकांनी याबाबत चौकशी केली असता केंद्र शासनाने राज्याला निधी दिला नसल्याने राज्य शासनाने जिल्ह्याला दिलेला नाही. या निधीबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू असून, निधी मिळाल्याशिवाय विद्यार्थ्यांना पैसे देता येणार नाहीत, असे सांगितले आहे.

पोलीस भरती रद्द करा; सातारचे राजे सरकारवर भडकले!
 
सन 2016 पूर्वी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती सदर लाभार्थी पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना मिळाल्याची धक्कादायक माहिती काही लाभार्थींनी सांगितली असून, पाच किंवा सात वर्षांनंतर शिष्यवृत्ती मिळणार असेल, तर उच्च शिक्षणात या शिष्यवृत्तीचा फायदा काय? 60 हजारांच्या उत्पन्नाची मर्यादा असणाऱ्या विद्यार्थ्याला आर्थिक परिस्थितीमुळे किंवा प्रत्येक महिन्याला मिळणारी शिष्यवृत्ती न मिळाल्याने शाळा सोडावी लागली असेल, तर त्यास जबाबदार कोण? संबंधित यंत्रणेने तत्काळ शिष्यवृत्तीचे पैसे दिले नाहीत, तर पात्र लाभार्थी व त्यांच्या पालकांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. आंदोलन करायची वेळ शासनाने आमच्यावर आणू नये, अशी विनंती केली आहे. 

दमदार कामगिरी; कसे पकडले 48 तासांत दराेडेखाेर सांगताहेत एसपी तेजस्वी सातपुते

सन 2016 पासून आम्ही शिष्यवृत्तीसाठी प्रयत्न करीत आहे. मी अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील असून, सध्या 12 वीच्या वर्गात शिकत आहे. माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषद शिक्षण विभाग व संस्थाचालकांकडे पाठपुरावा करूनही निधी मिळालेला नसल्याने शिष्यवृत्तीपासून वंचित आहे.  

- तेजस सत्रे, पात्र लाभार्थी, अडूळ, ता. पाटण

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com