सहकारी संस्थांच्या संचालकांना पुन्हा दिलासा; निवडणुकीला लागला ब्रेक

सहकारी संस्थांच्या संचालकांना पुन्हा दिलासा; निवडणुकीला लागला ब्रेक

सातारा : कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना 31 मार्चपर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात होणाऱ्या पाच सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित झाल्या आहेत. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेसह किसन वीर कारखाना, खंडाळा कारखाना, तसेच काही नागरी सहकारी बॅंकांसह पाणीपुरवठा संस्था, विकास सोसायट्यांचा समावेश आहे. जिल्हा बॅंकेबाबत उच्च न्यायालयात याचिका होती; पण न्यायालयाने स्थगितीबाबत निर्णय दिला नाही. त्यामुळे जिल्हा बॅंकेची निवडणूक लांबणीवर गेली आहे.
 
राज्यात ज्या टप्प्यावर सहकारी संस्थांच्या निवडणुका थांबल्या होत्या. त्या पुन्हा सुरू करण्याचे आदेश फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिले होते. त्यामुळे 31 मार्चपर्यंत स्थगिती मिळालेल्या संस्थांचा निवडणूक कार्यक्रम थांबलेल्या टप्प्यापासून पुन्हा सुरू झाला होता. त्यानुसार जिल्ह्यातील प्रमुख पाच सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा समावेश होता, तसेच जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी सदस्य संस्थांचे ठराव संकलन नुकतेच पूर्ण झाले आहे; परंतु राज्यात काही भागांत कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्यामुळे पुन्हा एकदा 31 मार्चपर्यंत सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली आहे. विद्यमान संचालकांना मुदतवाढ मिळाली आहे. 

जिल्हा बॅंकेबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल होती. या याचिकेवर सुनावणी होऊन राज्य सरकारने निवडणूक घेण्याची तयारी दर्शविली होती; पण कोरोनाचा संसर्ग वाढल्याने सरकारने निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. उच्च न्यायालयानेही स्थगितीबाबत कोणताही निर्णय दिला नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या स्थगितीचा निर्णय कायम राहिला आहे. सध्या जिल्हा बॅंकेचे ठराव संकलन पूर्ण करून ते बॅंकेकडे तपासणीसाठी पाठवले होते. त्यानंतर सहनिबंधक कार्यालयात त्याची पडताळणी होऊन प्रारूप मतदार यादी 12 मार्चला प्रसिद्ध केली जाणार होती. या प्रक्रियेनुसार एप्रिल किंवा मे महिन्यात निवडणूक प्रक्रिया सुरू होणार होती; परंतु आता स्थगितीमुळे ही प्रक्रिया एक ते दीड महिना लांबणीवर गेली आहे. 

कोरोनाचा संसर्ग आटोक्‍यात येऊन पुन्हा निवडणुका घेण्यास परवानगी मिळाली तर जिल्हा बॅंकेची निवडणूक साधारणपणे जून महिन्यात होईल अशी शक्‍यता आहे. त्यामुळे विद्यमान संचालक मंडळाला एक प्रकारे मुदतवाढच मिळणार आहे. मार्चमध्ये महिन्यात विद्यमान संचालक मंडळाला सहा वर्षे पूर्ण होतात. त्यापुढे निवडणूक जाणार असल्यामुळे संचालक मंडळाला पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे.

आता रामराज्य! इथं काेणच डाॅन नाही, तडीपारांना कसा धडा शिकवायचा मला चांगलं माहितीये 

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com