
'..तर जयकुमार गोरे विधानसभेची निवडणूक लढवणार नाही ही माझी भूमिका आजही आहे.'
एका विजयानंतर राष्ट्रवादीला मस्ती आलीय; भाजप आमदारानं व्यक्त केला संताप
दहिवडी (सातारा) : घाट फुटावा, रस्ता सुरू व्हावा, हा मागील १५ वर्षांचा संघर्ष आज कामी आला. (कै.) हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे व माता-भगिनींचे स्वप्न आज साकार झाले. यात आमदार जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांनी मोलाचे योगदान दिल्याचे प्रतिपादन खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर (Ranjitsingh Naik-Nimbalkar) यांनी केले.
सीतामाई घाटाच्या तीन किलोमीटर अंतराच्या व साधारण पाच कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन कार्यक्रमात खासदार नाईक-निंबाळकर बोलत होते. या वेळी आमदार जयकुमार गोरे, अर्जुन काळे, बाजार समिती सभापती विलास देशमुख, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, अतुल शिंदे, बाळासाहेब कदम, सोमनाथ भोसले, किसन सस्ते, दादासाहेब जगदाळे, दादासाहेब कद्रे, अप्पा बोराटे, दत्तात्रय सस्ते, कृष्णराव शेडगे, सरपंच विक्रम जगताप, भिवा कापसे, आनंदराव पवार, मारुती पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा: 'हिंदुस्थानी भाऊला अटक करुन तुमची यातून सुटका होणार नाही'
खासदार नाईक-निंबाळकर म्हणाले, ‘‘जयाभाऊंमुळे पिण्यासाठी संघर्ष करणाऱ्या या भागात आज उसाची शेती मी बघतोय. त्यांनी राबविलेला सिमेंट बंधाऱ्याचा प्रयोग महाराष्ट्राने अन् पुढे देशाने उचलून धरला. माणच्या वाटणीचे पाणी धोम बलकवडीत शिल्लक आहे ते उचलून माणमध्ये आणण्याचा आम्ही प्रयत्न करू.’’ आमदार गोरे म्हणाले, ‘‘सीतामाई घाट रस्त्याला आजपर्यंत ११ कोटींचा निधी मिळाला आहे. तालुक्यातील साठ टक्के भागात पाणी पोचले आहे. या तालुक्याला पाच वर्षांनंतर दुष्काळी म्हणण्याची कोणाची हिम्मत होणार नाही. पूर्वी टँकरसाठी मागणी करणारे लोक आज ऊसतोड टोळीची मागणी करत आहेत. जिहे-कटापूरचं काम अंतिम टप्प्यात आहे. १०० मीटरच्या बोगद्याचे काम सलग केले, तर अडीच महिन्यांत आंधळी धरणात पाणी येईल. युगानुयुगे ज्याची वाट पाहात होतो ते काम पूर्ण होतेय. या योजनेला एकरकमी साडेआठशे कोटी रक्कम केंद्राने दिले आहेत.
हेही वाचा: 'हा' चहावाला दिवसभर चहा विकून गोरगरीब, भिकाऱ्यांची भागवतोय भूक
जिहे-कटापूरचे पाणी (Jihe-Katapur water scheme) लोकांच्या शेतापर्यंत पोचलं नाही, तर जयकुमार गोरे विधानसभेची निवडणूक (Assembly election) लढवणार नाही ही माझी भूमिका आजही आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे (NCP) सर्व नेते जिहे-कटापूरचे पाणी येऊ नये, असा प्रयत्न करत आहेत.’’ उपळवे (ता. फलटण) येथील माऊली सावंत यांनी हिंदुराव नाईक निंबाळकर यांना हा रस्ता समर्पित करून या रस्त्याला त्यांचे नाव द्यावे, अशी मागणी केली. कार्यक्रमास आंधळी गटातील गावोगावचे सरपंच, सोसायटीचे अध्यक्ष, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
हेही वाचा: ढाब्यावर जेवण करून गावाकडं परताना 3 मित्रांचा जागीच अंत
‘‘दहिवडी नगरपंचायतीत राष्ट्रवादी जिंकली नाही, तर आमच्या माणसांनी त्यांना जिंकून दिले आहे. एका विजयानंतर राष्ट्रवादीला मस्ती आलेली आहे. मी तीन ‘टर्म’चा आमदार आहे, मला किती मस्ती पाहिजे. मी पाच ते सहा निवडणुका असा लढेन. माझ्या पैशाची तुम्ही चिंता करू नका, तुमच्याकडे किती पैसा आहे तेच बघायचे आहे मला.’’
-जयकुमार गोरे, आमदार
Web Title: Dahiwadi Nagar Panchayat Election 2022 Mla Jayakumar Gore Criticizes Ncp
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..