सरकार मायबाप! पंचनामा झाला, मग पैशाचं कधी?

सरकार मायबाप! पंचनामा झाला, मग पैशाचं कधी?
Updated on

मोरगिरी (जि. सातारा) : पाटण तालुक्‍यात सुरू असलेल्या अतिवृष्टीने अनेकांच्या घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. त्यामुळे लोकांचा निवाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुसळधार पावसाळ्यात भिंती पडल्याने घरांचे मालक अडचणीत आले आहेत. शासनामार्फत पंचनामा करण्याचे काम करण्यात आले असून, अद्याप मदत निधी मिळालेली नाही. त्यामुळे पावसाळ्यात घरांच्या भिंती पडलेले घर मालक नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र पाटण तालुक्‍यातील मोरणा विभागात दिसत आहे.
 
सातारा जिल्ह्यात जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांत अतिवृष्टी झाल्याने अतिवृष्टीचा सर्वात जास्त फटका मातीच्या घरांना बसला आहे. अशातच कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीकाठच्या गावाच्या घरात पाणी जाऊन घरांचे नुकसान झाले. अनेक कच्च्या घरांची पडझड होऊन कुटुंब उघड्यावर आली. ग्रामीण भागात मातीची कच्ची घरे मोठ्या प्रमाणात आहेत. सततच्या पावसामुळे घरांच्या भिंती कोसळून शेकडो घरांचे नुकसान झाले. त्यामुळे कुटुंबांची निवाऱ्याची समस्या निर्माण झाली आहे.

दरवर्षी पडत असलेल्या पावसामुळे पाटण तालुक्‍यातील जनतेला या समस्येला सामोरे जावे लागते. तहसील कार्यालयात चकरा मारताना ग्रामस्थ दिसत आहेत. गेल्या वर्षी गावकामगार तलाठी यांनी घरांच्या नुकसानीचा पंचनाम केला होता. त्यांना अद्यापी शासकीय मदत मिळालेली नाही. तोपर्यंत यावर्षी पुन्हा घरांच्या भिंती कोसळून घरांचे नुकसान झाले आहे. कधी कोणत्या दिशेची भिंत पडेल यांचा नेम नाही. त्यामुळे घर मालक हैराण झाले आहेत. 

छोट्या-मोठ्या भूकंपामुळे आधीच घरे खिळखिळी झाली आहेत, तर स्लॅबच्या घरांना तडे गेले आहेत, तर बहुतांशी स्लॅबची घरे पावसाळ्यात गळत असल्याचे पाहण्यास मिळते. येथे पावसाने घरांची अवस्था दयनीय करून टाकली आहे. जुलै महिन्याच्या शेवटी व ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेकडो घरांची पडझड होऊन नुकसान झाले आहे. मोरणा विभागातील शेकडो नागरिक मदतनिधीपासून वंचित आहेत. शासकीय मदत तातडीने मिळावी, अशी मागणी या लोकांनी केली आहे. 


पडझड झालेल्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा 

शासनाकडून पाच-दहा हजारांची आर्थिक मदत देऊन पीडितांचे अश्रू पुसले जातात, परंतु महागाईच्या काळात सिमेंट, मजूर, विटा यांचे वाढलेले दर पाहता शासनाने केलेल्या मदतीत भिंत बांधून होत नाही. त्यामुळे हे नुकसानग्रस्त शासनाकडून घरकुल मिळेल, अशी अपेक्षा बाळगून आहेत. अतिवृष्टीमुळे घराची पडझड होऊन नुकसान झालेल्या घरांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे, परंतु प्रशासन उदासीन असल्याचे चित्र यानिमित्ताने समोर आले आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com