
काळाची झडप; झगलवाडीतील युवकासह कवठेतील शेतक-याचा मृत्यू
शिरवळ (जि. सातारा) : कवठे (ता. खंडाळा) येथे रविवारी दुपारी वेताळमाळ परिसरात वीज पडून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. शशिकांत दादासाहेब लिमण (वय 42, रा. झगलवाडी) व खाशाबा भाऊसाहेब जाधव (वय 60, रा. कवठे) अशी मयत झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी, की झगलवाडी येथून शशिकांत लिमण पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या वेताळमाळ शेतात खाशाबा जाधव यांच्या शेतात उन्हाळी भुईमूग भिजविण्यासाठी कवठे येथे गेले होते. या वेळी खाशाबा जाधव हेही शेतात काम करत होते. दुपारी विजेचा कडकडाट सुरू असताना शेतात काम संपल्यावर बांधावर झाडाखाली हे दोघे जण जेवण करत असताना त्यांच्या अंगावर अचानक वीज पडून त्यांचा मृत्यू झाला. लिमण हे मुंबई येथे काम करत होते. मात्र, सध्या लॉकडाउन असल्याने ते गावी आले होते. खाशाबा जाधव कवठे येथे पिठाची गिरणी चालवत होते.
दरम्यान, शिरवळ पोलिस ठाण्याचे सागर अरगडे, पांडुरंग हजारे व विनोद पवार यांनी घटनास्थळावर भेट देऊन पंचनामा केला. झगलवाडी येथील शशिकांत लिमण हे मुंबई येथे विम्याचे काम करत होते. लॉकडाउनमुळे ते घरी आले होते. या वेळी दुपारी रान भिजवून झाले आहे म्हणून घरी येत असल्याचा फोनही लिमण यांनी केला होता. मात्र, काळाने झडप घालून झगलवाडीतील तरुण व सेवाभावी असणाऱ्या शशिकांतला अचानक जावे लागले. त्यांना तीन वर्षांचा मुलगा आहे. कवठे येथील खाशाबा जाधव यांचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली.
हेही वाचा: Video पाहा : ग्रामस्थांनी एकीतून उभारले आयसोलेशन सेंटर
हेही वाचा: VIDEO : नगरसेवकांचं असंही दातृत्व; 'विलगीकरणा'साठी दिलं मोफत हॉटेल, जेवणाचीही केली सोय
हेही वाचा: दांपत्यास पोलिसाने सोने- चांदीच्या दागिन्यांची पर्स केली परत
Web Title: Lighting In Kavathe Two Farmers Died Satara
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..