मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीत 400 उमेदवार उतरवणार; सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी मराठा समाजाचा निर्णय
'लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचे उमेदवार देण्यात येणार आहेत. ते उमेदवार पक्षविरहित देण्यात येणार आहेत.'
कऱ्हाड : राज्यात आजपर्यंत आलेल्या सरकारने मराठा समाजाची (Maratha Community) फसवणूकच केली आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना धडा शिकवण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावातून पक्षविरहित एक ते दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्धार मराठा समाज बांधवांनी आज झालेल्या बैठकीत केला.
मराठा बांधवांची महत्त्वपूर्ण बैठक आज सायंकाळी झाली. त्यामध्ये मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण (OBC Reservation) मिळावे, सगेसोयऱ्यांचा अध्यादेश लागू करावा, या मागणीसाठी मनोज जरांगे- पाटील (Manoj Jarange-Patil) हे आंदोलन करत आहेत. मात्र, त्यांना बदनाम करण्यासाठी त्यांच्यावर खोटे आरोप केले जात आहेत. राजकीय षडयंत्राद्वारे जरांगे- पाटील यांच्याबाबत दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
राज्य शासनाने एसआयटी स्थापन करून चौकशी करण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय शासनाने त्वरित मागे घेतला पाहिजे. कुणबी- मराठा व मराठा- कुणबी हे एकच असल्याचे ऐतिहासिक काळापासून पुरावे आहेत. त्यानंतरही ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले जात नाही. दोनदा रद्द होऊनही पुन्हा एकदा स्वतंत्रपणे दहा टक्के आरक्षण देत मराठा समाजाची दिशाभूल करण्यात आली आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षांचे नेते केवळ बघ्याची भूमिका घेत मराठा समाजाला न्याय व हक्कांपासून वंचित ठेवत आहेत.
सगेसोयऱ्यांबाबत तातडीने अध्यादेश न काढल्यास लोकसभा निवडणुकीत सातारा लोकसभा मतदारसंघात तालुक्यातील प्रत्येक गावातून दोन ते तीन उमेदवारी अर्ज दाखल केले जातील, असा निर्धार या बैठकीत करण्यात आला. या वेळी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना मराठा बांधवांकडून आपापल्या गावात मत मागण्यास आल्यास तीव्र विरोध केला जाईल, असा इशाराही बैठकीतून देण्यात आला.
बैठकीत करण्यात आलेले ठराव
लोकसभेसाठी सुमारे चारशे उमेदवार देणार
मराठा समाजावरील सर्व गुन्हे मागे घ्यावे
मनोज जरांगे-पाटील यांच्यासोबतच सर्वांचीच एसआयटी चौकशी करावी
सगेसोयऱ्यांचा अध्यादेश लागू केल्याशिवाय प्रचाराला गावात जाऊ नये
जिल्ह्यातील समन्वयकांसमवेत सर्व मराठा बांधवांची घेण्यात येणार लवकरच बैठक
गुन्हे दाखल झाल्यास सर्व मराठा समाजाने बांधवांच्या पाठीशी उभे राहावे
कुणबी दाखले वेळेत मिळाले नाहीत, तर पुन्हा आंदोलन करण्यात येणार
उमेदवारांसाठी लोकवर्गणी काढणार
लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचे उमेदवार देण्यात येणार आहेत. ते उमेदवार पक्षविरहित देण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रत्येक गावातून मराठा समाजाचे दोन-तीन उमेदवार देण्यात येतील. त्यांना अर्ज भरताना द्यावी लागणारी अनामत रक्कम व अन्य शुल्क हे लोकवर्गणी काढून भरण्यात येणार आहे. त्यासाठीचीही चर्चा बैठकीत करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

