बोंडारवाडी धरणप्रश्‍नी कोणावरही अन्याय होऊ देणार नाही : शिवेंद्रसिंहराजे

बोंडारवाडी धरणप्रश्‍नी कोणावरही अन्याय होऊ देणार नाही : शिवेंद्रसिंहराजे

सातारा : जावली तालुक्‍यातील केळघर, मेढा विभागातील 54 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटण्यासाठी बोंडारवाडी धरण प्रकल्पाचे काम मार्गी लागणे आवश्‍यक आहे. येथील ग्रामस्थांनी काही मागण्यांसाठी या प्रकल्पाला विरोध दर्शवला होता. ग्रामस्थ, बोंडारवाडी धरण कृती समिती आणि पाटबंधारे विभाग यांच्यात समन्वय साधण्यात आला असून सर्वसमावेशक तोडगा काढून जावली तालुक्‍यात 54 गावांचा पाणी प्रश्‍न सोडवण्यासाठी या प्रकल्पाचे काम मार्गी लावू, असे आश्‍वासन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले. 

बोंडारवाडी ग्रामस्थांनी पिकाऊ शेतजमीन वाचावी आणि धरणाचे काम व्हावे, अशी मागणी करुन या प्रकल्पाला विरोध केला होता. ग्रामस्थांच्या मागणीनुसार शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रत्यक्ष धरणस्थळ आणि जागेची पाहणी केली. यावेळी अधीक्षक अभियंता प्रकाश मिसाळ, कार्यकारी अभियंता महादेव धुळे, सहायक अभियंता जयंत बर्गे, शाखा अभियंता संजय पांडकर, सरपंच बाजीराव ओंबळे, वसंत मानकुमरे, संदीप ओंबळे, गणपत ओंबळे, विष्णू ओंबळे, महेंद्र ओंबळे यांच्यासह बोंडारवाडी ग्रामस्थ उपस्थित होते. 

बोंडारवाडी ग्रामस्थांच्या मागणीनुसार शिवेंद्रसिंहराजे यांनी गुरुवारी (ता. 24) पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत धरणस्थळाची पाहणी केली. ज्या जागेवर धरण होत आहे, त्या जागेत शेत जमीन जात आहे. ही शेतजमीन वाचवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे केली. 54 गावांचा पाणीप्रश्‍न आणि बोंडारवाडी ग्रामस्थांची शेतजमीन या दोन्ही बाबींचा विचार करुन सर्वांच्या सहमतीने, कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेवून धरणाचे काम मार्गी लागेल, असे शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले. काहीही झाले तरी बोंडारवाडी प्रकल्पाचे काम मार्गी लावू आणि 54 गावांचा पाणीप्रश्‍न सोडवू, असेही ते म्हणाले. 

विष कालवणाऱ्यांपासून सावध रहा 
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना बोंडारवाडी प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती. दुर्दैवाने भाजपाचे सरकार पुन्हा सत्तेत आले नाही. सरकार कोणाचेही असले तरी मी या प्रकल्पासाठी पाठपुरावा केला असून पुढेही करणार आहे. महाआघाडी सरकारकडेही पाठपुरावा करुन हा प्रकल्प मार्गी लावणार आहे. सोशल मीडियावर विनाकारण वावड्या उठवायच्या, लोकांच्या मनात विष कालवायचं अशा काही विकृती सध्या फोफावल्या आहेत. त्यांना फोटोशूट करुन गाजावाजा करायची फारच हौस आहे. मला श्रेयवादात पडायचे नाही आणि मला श्रेयही घ्यायचे नाही. मला फक्त जनतेचे प्रश्‍न सोडवायचे असतात. स्वत: काहीही करायचं नाही. काम झालं तर मी केलं म्हणायचं आणि झालं नाही तर आमदारावर ढकलायचं, अशा प्रवृत्तींपासून जावलीकरांनी सावध राहावे, असे आवाहन शिवेंद्रसिंहराजे यांनी केले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com