सातारा, सांगली, कोल्हापूरसाठी एनडीआरएफ तैनात

सातारा, सांगली, कोल्हापूरसाठी एनडीआरएफ तैनात

कऱ्हाड (जि.सातारा) - पश्‍चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांला गेल्या वर्षीच्या महापुरावेळच्या आठवणी आजही ताज्या आहेत. महापुराने निर्माण झालेल्या हाहाकारामुळे मदत कार्यासाठी एनडीआरएफचे पथक पाचारण केले. तोपर्यंत महापुराचा फटका बाधित गावांतील लोकांना बसला होता. हवामान खात्याने यंदाही सरासरी पावसाचा अंदाज वर्तवल्याने महापुराचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यासाठी खबरदारी म्हणून शासनाने अगोदरच एनडीआरएफ पथकांना मंजुरी दिली आहे. कोल्हापूरसाठी दोन, तर सांगली व सातारा जिल्ह्यांसाठी प्रत्येकी एक तुकडी मंजूर असून, जुलैमध्ये ही पथके दाखल होतील. या तुकड्यांद्वारे नदीकाठच्या बाधित गावात आपत्ती निवारणाचे धडेही दिले जाणार आहेत.
 
गेल्या वर्षी जुलै, ऑगस्टमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीने सांगली, कोल्हापूरसह सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड व पाटण तालुक्‍यांला फटका बसला. यात काही ठिकाणी जीवितहानीला सामोरे जावे लागले. शेती, पिकांसह अनेक घरे पाण्याखाली गेल्याने संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. आजही बाधित गावांतील लोकांच्या आठवणी ताज्या आहेत. पूरस्थिती ओसरल्यानंतर राज्यभरातून मदतीचे ओघ सुरू होते. गेल्या वर्षी पूरस्थितीची भीषणता पाहून शासनाने "एनडीआरएफ'च्या पथकाला पाचारण केले. त्यांच्या तुकडीतील जवानांनी पुरात अडकलेल्या लोकांना मदतीसाठी पुढाकार घेतला. अनेक ठिकाणी एनडीआरएफच्या जवान बाधित गावांतील लोकांना आजही देवदूतच वाटतात. पाण्यातून सुखरूप बाहेर काढणारे एनडीआरएफच्या जवान देवदूत मानून त्यांच्या नतमस्तक झालेल्यांचे चित्रणही आजही सोशल मीडियावर पाहायला मिळते. पूरस्थिती ओसरल्यानंतर एनडीआरएफच्या तुकड्या परतताना लोकांना अश्रू अनावर झाले होते. महापुराच्या आपत्तीत एनडीआरएफच्या तुकड्यांचे काम महत्त्वपूर्ण ठरले.
 
दरम्यान, गेल्या वर्षीच्या महापुराचे गांभीर्य ओळखून यंदा शासनाने अगोदरच एनडीआरएफच्या तुकड्यांना मंजुरी दिली आहे. अद्याप पावसाचा जोर नसल्याने 15 जुलैपर्यंत या तुकड्या जिल्ह्यात दाखल होतील. कोल्हापूर जिल्ह्यासाठी दोन, तसेच सांगली व सातारा जिल्ह्यासाठी प्रत्येकी एक तुकडी येणार असल्याचे सांगण्यात आले. तुकड्या येण्याच्या दरम्यान पूरस्थिती नसल्यास नदीकाठच्या पूर बाधित गावांना भेटी देऊन एनडीआरएफचे जवान गावाचा अभ्यास करण्याबरोबरच आपत्ती काळात स्वतःचा बचाव कसा कारायचा, घरातील, तसेच नैसर्गिक साधनसामग्रीचा वापर करून बचाव कार्य कसे करायचे? याचे प्रशिक्षण देण्याचे काम करतील. 


""संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सज्ज आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आहे. त्यात संबंधित विभागांना सूचना केल्या आहेत. यंदा प्राधिकरणातर्फे नदीकाठच्या गावांना जीवसुरक्षा किट दिले जाईल. शासनाने यंदा एनडीआरएफच्या तुकड्यांना अगोदरच मंजुरी दिली असून, जुलैमध्ये या तुकड्या दाखल होतील.'' 

देविदास ताम्हाणे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, सातारा. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com