सातारा : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशनअंतर्गत राबविण्यात आलेल्या अभियानात सातारा नगरपालिकेचा कचरामुक्त शहराच्या यादीत देशात पंधरावा, तर राज्यात चौथा क्रमांक आला आहे. हा पुरस्कार आज मुख्याधिकारी अभिजित बापट, उपाध्यक्ष मनोज शेंडे यांनी दिल्लीतील कार्यक्रमात स्वीकारला.
केंद्र सरकारने स्वच्छ भारत मिशनअंतर्गत कचरामुक्त शहर अभियान राबविले होते. या अभियानात सातारा पालिकेने सहभाग घेतला होता. हा पुरस्कार मिळावा, यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याच्या सूचना पालिका पदाधिकारी, प्रशासनास केल्या होत्या. त्यानुसार नगराध्यक्षा माधवी कदम, उपाध्यक्ष मनोज शेंडे, मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली होती.
शहरातील रस्त्यांवर, तसेच प्रभागात कोठेही कचरा जमा होणार नाही, यासाठी कचरा संकलनाचे वेळापत्रक पालिकेने तयार केले होते. पालिकेने राबविलेल्या एकत्रित उपक्रमांमुळे शहराची वाटचाल कचरामुक्तीकडे सुरू झाली. या अभियानात विविध उपाययोजना, उपक्रमांसाठी गुणतक्ता तयार करण्यात आला होता. यानुसार पालिकेच्या उपक्रमांची माहिती, पाहणी आणि गुणनोंदणी केंद्रांच्या एका पथकाने केली होती.
या अभियानात ४ हजार ३५२ मते मिळवत सातारा पालिकेस देशात पंधरावा, तर राज्यात चौथा क्रमांक मिळाला. दिल्लीतील विज्ञान भवनात गृहनिर्माण आणि शहर संचालनालय मंत्रालयाचे सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांच्या हस्ते बापट व शेंडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.