कऱ्हाडमधील पाणीपुरवठ्याला गळतीचे ग्रहण, दररोज शेकडो लिटर पाणी जाते वाया

Satara
Satara

कऱ्हाड (जि. सातारा) : शहरातील 24 तास पाणीपुरवठ्याची योजना पूर्णत्वाकडे जात आहे. मात्र, त्यापूर्वी शहरातील पाणीपुरवठ्याच्या अनेक ठिकाणच्या पाइपमधील गळतीची दुरुस्ती होण्याची गरज आहे. पालिकेचे त्याकडे दुर्लक्ष असल्याने दररोज शेकडो लिटर पाणी वाया जाताना दिसते आहे. 

बारमाही वाहणाऱ्या कोयना व कृष्णा नद्यांची सुबत्ता कऱ्हाड शहराला मिळाली आहे. त्यामुळे येथे मुबलक पाणी आहे. ते पाणी बचत करण्याऐवजी त्याचा दुरूपयोगच जास्त होताना दिसतो. अनेक लोक ते पाणी वाहन धुणे, अंगणात मारण्यासाठी वापरतात. त्यावर निर्बधांसाठी पालिकेने कोणतीही उपाययोजना केली नाही. पाण्याची मुबलकता असल्याने पालिकाही सकाळ व सायंकाळ अशा दोन वेळेत पाणीपुरवठा करते. त्यामुळे एकवेळी आलेले पाणी लोक सर्रास ओतून देवून नवीन आलेले ताजे पाणी म्हणून ते भरतात. अशा अनेक गोष्टींवर काम होणे अपेक्षित आहे. टप्प्याटप्प्याने पालिका त्यावर काम करतही आहे. मात्र, अपेक्षित गती येताना दिसत नाही.

कपडे, भांडी धुणे करून वाया जाणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी शौचालयास देण्याचा उपक्रमही प्रलंबित आहे. त्यातच पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपच्या गळतीकडे पालिका दुर्लक्ष करत आहे. 24 तास पाणी योजनेचे गारूड कऱ्हाडकरांच्या मनावर ते वर्षापासून वाजवले जात आहे. काही भागात कनेक्‍शन दिले आहे. वारंवार होणाऱ्या टेस्टिंगच्या नावाखाली पाणी सोडले जाते. त्यावेळी त्या पाइपातून पाणी वाया जाताना दिसते आहे. टेस्टिंमुळे काही करू शकत नसल्याचे उत्तर देवून पालिका वेळ मारून नेते आहे. त्या पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपच्या गळतीकडे दुर्लक्ष होत आहे.

गळती काढण्यासाठी वारंवार नागरिक लक्ष वेधत आहेत. परिणामी पालिकेचे शेकडो लिटर पाणी आजअखेर वाया गेले आहे. पाण्याच्या टाक्‍या भरल्यानंतर होणारे "ओव्हर फ्लो' होणारे पाणीही वाया जात आहे. शहरातील किमान 25 पेक्षाही जास्त ठिकाणी पाइपची गळती आहे. त्यामुळे पाणी सुटले की ते पाणी रस्त्यावर साचलेले दिसते. दत्त चौक, मार्केट यार्ड, बैलबझार, शनिवार पेठ, शुक्रवार पेठ, वाखाण भाग, रुक्‍मिणीनगर परिसर, रणजित टॉवर परिसर, मंगळवार पेठ परिसरात गळती आहे. 


पाणीपुरवठ्याची कामे एकाकडेच! 

पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइनचा अभ्यास असणारेच लोक पालिकेकडे नाहीत. त्यामुळे नवीन काम करण्यास तयार नाहीत. केवळ एखादाच ठेकेदार तयार असतो. सध्याही पाणीपुरवठ्याच्या संबंधित कोणतेही काम असले की एकच ठेकेदार ते घेताना दिसतो. किंबहुना पालिकाही त्यालाच बोलावून ते काम देते. तोच ठेकेदार अनेक वर्षांपासून आहे. पाणीपुरवठ्याचे काम क्‍लिष्ट आहे व त्या ठेकेदाराचाही अभ्यास आहे. त्यामुळे ती कामे त्यालाच मिळतात. नवीन ठेकेदार अशी कामे घेण्यास तयार होत नाहीत. 

संपादन : पांडुरंग बर्गे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com