
ठेकेदार अर्धवट काम करून नुसते पैसे उकळत आहेत, अशा अर्धवट काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी समाधान पोफळे यांनी केली.
भिलार (जि. सातारा) : पाचगणी ते करहर रस्त्यावर महू धरणाजवळ घडलेला अपघात बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार आणि रस्त्याकडेच्या झुडपांकडे दुर्लक्षामुळे झाल्याचा आरोप करीत महू धरणावर सर्वपक्षीय "रास्ता रोको' करण्यात आला. बांधकाम अधिकाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत रस्ता अडवल्याने काही काळ वाहतूक विस्कळित झाली होती.
या आंदोलनात शेतकरी संघटनेचे पश्चिम विभागीय अध्यक्ष कमलाकर भोसले, भाजपचे तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष समाधान पोफळे, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अश्विन गोळे, नितीन पारटे, विश्वासराव रांजणे, ज्ञानेश्वर रांजणे, रमेश रांजणे, विलास पाटील, रघुनाथ पवार, धर्मेंद्र गोळे, सदाशिव रांजणे, महादेव रांजणे, तसेच शेकडो ग्रामस्थ, कार्यकर्ते उपस्थित होते. सरपंच संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष समाधान पोफळे म्हणाले, "या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारी झाडेझुडपेही काढली जात नाहीत. ठेकेदार अर्धवट काम करून नुसते पैसे उकळत आहेत, अशा अर्धवट काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे. रस्ता रुंदीकरण आणि झाडेझुडपे तातडीने काढावीत, अन्यथा आम्हाला आंदोलन तीव्र करावे लागेल.''
Marathwadi Dam : बैठक बोलवा, अन्यथा तीव्र संघर्ष; जनजागरचा आक्रमक पवित्रा
कमलाकर भोसले म्हणाले, ""खचलेल्या साइडपट्ट्या, धोकादायक वळणे आणि झाडाझुडपांमुळे रस्ता अपघातग्रस्त बनला आहे. हा रस्ता आठ दिवसांत नाही केला, तर आम्ही बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकणार आहे.'' या वेळी अपघात झालेल्या ठिकाणावर जोरदार घोषणाबाजी करीत सर्वांनी बांधकाम विभाग विरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या.
शिवसैनिकांची अभेद्य फळी आणखी मजबूत करणार; बनपुरीत शेलारांची ग्वाही
संपादन : बाळकृष्ण मधाळे