सातारा : राज्यासह जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सतर्क राहून खबरदारी घेतली पाहिजे. यासाठी प्रत्येकाने मास्कचा वापर करण्यासोबतच सुरक्षित अंतराचे पालन करून वेळोवेळी हात धुवावेत, असे आवाहन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आज कोरोना संसर्गाबाबतची आढावा बैठक मंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये उपस्थित होते.
रस्त्यावर विनामास्क वावरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशा सूचना करून श्री. देसाई म्हणाले, ""कोरोना संसर्गाचा रुग्ण आढळल्यास त्याच्या संपर्कातील कमीतकमी 20 जणांची कोरोना चाचणी करावी, तसेच जिल्ह्यात कोरोना चाचणीचे प्रमाण वाढवावे. भाजी विक्रेते, दुकानदार, रेस्टॉरंटवाले यांची कोरोना चाचणी करण्यावर भर द्यावा. नगरपालिका व मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये मास्क, सुरक्षित अंतर व वेळोवेळी हाताची स्वच्छता या विषयी जनजागृती करावी.''
सध्या 100 नागरिकांच्या उपस्थितीत लग्न समारंभ व इतर धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात येत आहे; परंतु लग्न समारंभात 500 ते 1000 नागरिक उपस्थित राहात असल्याचे निदर्शनास येत आहे. जेथे लग्न समारंभ होत आहे. तेथे भेट देऊन शासन व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन होते काय हे पाहावे. पालन होत नसल्यास कारवाई करण्यात यावी, तसेच पोलिस विभागाने पेट्रोलिंगचे प्रमाण वाढविले पाहिजे, अशा सूचना श्री. देसाई यांनी दिल्या.
साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
संपादन : बाळकृष्ण मधाळे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.