आनेवाडी-तासवडे टोलनाक्‍यावर सातारकरांना सूट द्या; खासदार उदयनराजे आक्रमक

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News

सातारा : पुणे जिल्ह्यातील लोकांसाठी जशी खेडशिवापूर येथील टोल माफी दिली आहे. त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातील लोकांना आनेवाडी व तासवडे टोलनाक्‍यांवर सूट द्यावी, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. त्याचबरोबर सातारा-पुणे रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्यांवरही कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी नुकतीच प्रशासनाकडे केली आहे. 

जिल्ह्यातील विविध प्रश्‍नांसदर्भात उदयनराजे यांनी नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ""पुणे जिल्ह्यातील एमएच 12 व एमएच 14 पासिंग असलेल्या वाहनांना खेडशिवापूर टोलनाक्‍यावर सूट देण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातही दोन टोलनाके आहेत. पुण्याप्रमाणेच साताऱ्यातील एमएच 11 व एमएच 50 पासिंग असलेल्या वाहनांना आनेवाडी व तासवडे टोलनाक्‍यावर टोल माफी मिळणे आवश्‍यक आहे.'' सातारा - पुणे रस्त्याच्या दर्जाबाबतही उदयनराजे यांनी आज तीव्र नाराजी व्यक्त केली. 

ते म्हणाले, ""रिलायन्स कंपनीला ठेक्‍याचे पैसे मिळाले आहेत. त्यांनी नंतर उपठेकेदार नेमले; परंतु त्यांनी चांगले काम करणाऱ्यांना काम द्यायला पाहिजे होते. त्यामध्ये अनेकांना कामाची तांत्रिक माहिती नाही. अनेक जण बांधकाम विभागाच्या काळ्या यादीत आहेत; परंतु राजकीय हस्तक्षेपातून त्यांना कामे मिळाली आहेत. त्यामुळे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. खंबाटकी घाटातील एस वळणार शेकडो लोकांचे जीव गेले आहेत. प्रशासन अजून कशाची वाट पाहतेय.'' ठेकेदार व्यवस्थित काम करतो, की नाही हे पाहण्याची जबाबदारी राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळ व जिल्हा प्रशासनाची आहे; परंतु ते ती योग्यप्रमाणे पार पाडत नाहीत. त्यामुळे रस्त्याची कामे होत नाही तोपर्यंत टोल बंद करण्याचा निर्णय घ्यावा, असेही ते म्हणाले. या प्रश्‍नासंदर्भात रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचेही ते म्हणाले. 

पोलिसांचा धाक राहिला नाही 

राजवाडा परिसरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या कोयता हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर उदयनराजे यांनी आज पोलिसांच्या कार्यक्षमतेवर तोफ डागली. ते म्हणाले, ""शहराच्या मुख्य ठिकाणी एखाद्यावर वार होणे ही गंभीर गोष्ट आहे; परंतु पोलिसांनी ती गांभीर्याने घेतलेली नाही. यातील संशयितावर तातडीने कारवाई करणे आवश्‍यक होते; परंतु पोलिसांवर राजकीय दबाव आहे.'' राजकीय दबाव पोलिस घेत असल्यानेच गुन्हेगारी वाढत चालली आहे. पोलिसांचा धाकच उरलेला नाही, असेही ते म्हणाले. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com