वसुंधरा पुरस्कार संशयाच्या भोवऱ्यात; पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल असताना गौरव होतोच कसा?

Satara Latest Marathi News Satara News
Satara Latest Marathi News Satara News

कऱ्हाड (जि. सातारा) : नदी प्रदूषणामुळे पालिकेच्या नगराध्यक्षा, मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची वेळ पालिकेवर आली होती. त्याच पालिकेला वसुंधरा पुरस्काराने गौरवले. त्याच वसुंधरा पुरस्काराभोवती संशयाचे वलय निर्माण होईल, असे आरोप पालिका सभेत झाले. तो केवळ आरोप नव्हता तर मैलामिश्रित पाण्याच्या नागझरी नाल्यावर पाच दशक उपाय पालिकेला शोधता आला नाही, याची कबुली सभेत दिली गेली होती. त्यामुळे वसुंधरा पुरस्कार संशयाच्या भोवऱ्यात अडकतो आहे. तो कोणत्या निकषांवर दिला, याची चर्चा रंगू लागली आहे. अन्य पालिकांच्या तुलनेत कऱ्हाड पालिकेची प्रदूषण नियंत्रणाबाबत चांगली कामगिरी आहे, असे समर्थनही करणारे पुढे येतीलही. मात्र, कालच्या सभेत सत्ताधाऱ्यांनी केलेल्या आरोपामुळे ते समर्थन लंगडे ठरेल, अशीच स्थिती आहे. 

पालिकेतील जनशक्ती आघाडीने कालच्या मासिक सभेत नागझरी नाल्याच्या कळीच्या मुद्‌द्‌यावरून आरोप झाले. नागरझरी नाल्यातून मैलामिश्रित पाणी नदी पात्रात सोडल्याचा आरोप हा केवळ आरोप नाही, तर बहुमतातील सत्ताधाऱ्यांनी मैलामिश्रित पाणी नदी पात्रात मिसळत असल्याची दिलेली कबुलीच आहे. त्यावर एकाही नगरसवेकांनी किंवा अधिकाऱ्यांनी खुलासा, हरकत नोंदवली नाही. त्याचा अर्थच ती वस्तुस्थिती आहे. असे असतानाही दोन वर्षांपूर्वी शहराला माझी वसुंधरा पुरस्काराने सन्मानित केले. त्यामागचे गौडबंगालही प्रकाशात आले आहे. पुरस्कार मॅनेज करणे फार कठीण नसते. मात्र, शहरातील वस्तुस्थिती लपवून पुरस्कार मिळवणेही योग्य नाही, पालिकेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी त्या गोष्टी केल्या होत्या. त्यावरही आरोपामुळे प्रकाश टाकला गेला. 

पालिकेच्या नगराध्यक्षा, मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल असताना, मैलामिश्रित नागझरी नाल्याची स्थिती माहिती असतानाही वसुंधरा पुरस्कार दिला गेला असेल, तर त्या पुरस्काराचे नक्की निकष काय आहेत, त्याची माहिती शासनाने दिली पाहिजे. पालिकेने बाजू लपवून पुरस्कार मिळवला असले, तर पुरस्काराचे निकष काय होते, त्याची सखोल चौकशी होण्याची गरज आहे. अन्य पालिकांच्या तुलनेत प्रदूषण नियंत्रणात कऱ्हाड पालिका अव्वल आहे, असे समर्थन करणारे काहीजण आता पुढे येतील. ती वस्तुस्थितीही असेल मात्र पाच दशकांपासून मैलामिश्रित पाणी नदीत मिसळते आहे. त्यावर देशात स्वच्छतेत अव्वल येणारी पालिका त्यावर काहीही उपाय करू शकत नसेल, तर ते समर्थन लंगडे ठरणार आहे, हेही नक्कीच. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com