Satara : कऱ्हाड, पाटणला बळीराजा सुखावला

पेरणी झालेल्या पिकांना मिळणार जीवदान
rain
rainsakal

कऱ्हाड : कऱ्हाड, पाटण तालुक्यांत दोन दिवसांपासून जाणवणाऱ्या ढगाळ वातावरणाने उकाडा वाढला होता. अखेर काल रात्रीपासून दोन्ही तालुक्यांत पावसाचे आगमन झाल्याची नोंद घेण्यात आली. दोन्ही तालुक्यांत दिवसभर पावसाची संततधार कायम होती. कऱ्हाडसह पाटणला पावसाची रिपरिप सुरू असली, तरी अद्यापही कोयनेत पावसाची प्रतीक्षाच आहे.

आज सकाळी थोडा पाऊस झाला. मात्र, त्यानंतर कोयनेत उघडीप होती. कऱ्हाड शहरासह तालुक्यात पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे हवेत गारठा होता. पावसाची प्रतीक्षा संपल्याने तालुक्यातील बळीराजाही आनंदात होता. काल रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. शहर व परिसारत काल रात्रीपासून सकाळी आठ वाजेपर्यंत दीड मिलिमीटरच्या पावसाची नोंद शासनाच्या पर्जनमापकाकडे झाली आहे. त्यानंतर सकाळपासून आज दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. भात व नाचणीचे तरवे, कारळा, सोयाबीन, भुईमूग, उडीद, तूर, चवळी, हायब्रीड ज्वारी, मूग पिकांच्या पेरण्या रखडल्या आहेत. त्याला गती मिळण्याची शक्यता आहे.

पाटण अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सकाळी पावसाचे आगमन झाले. दिवसभर रिमझिम पावसाच्या सरी पडत होत्या. पावसाच्या आगमनाने रखडलेल्या पेरण्या पूर्णत्वास तर पेरणी झालेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे चिंतेत असलेला बळीराजाच्या खरिपाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. वळिवाच्या पावसाने मारलेली दडी व लांबणीवर पडलेल्या पावसामुळे १० जूनपर्यंत होणाऱ्या खरिपाच्या पेरण्या रखडल्या असल्याने कधी नव्हे ती परिस्थिती निर्माण झाली आहे.तालुक्याच्या काही ठिकाणी तुरळक प्रमाणात वळिवाचा पाऊस पडला तो अपवाद सोडला तर संपूर्ण तालुका जुलै महिना आला तरी कोरडाच पाहावयास मिळत आहे. परिणामी खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत.

अनेक दिवस चातकाप्रमाणे बळीराजा पावसाची वाट पाहात आहे. ज्या परिसरात वळिवाचा पाऊस पडला, तर विभागात भात व सोयाबीनच्या पेरण्या झाल्या असल्या, तरी भात पिकाचा अपवाद वगळता सोयाबीनच्या दुबार पेरणीचे संकट बळीराजा समोर निर्माण झाले आहे. सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास रिमझिम पावसाचे आगमन झाले. आज दिवसभर कधी रिमझिम तर कधी दमदार पावसाच्या सरी पडत होत्या. दिवसभर पावसात सातत्य होते व हवेत गारवा निर्माण झाला होता. पडलेल्या पावसामुळे रखडलेल्या पेरण्या पूर्णत्वास काही दिवसांत जातील व पेरणी झालेल्या पिकांना जीवदान मिळणार आहे. पावसाचे आगमनामुळे चिंतेत असणाऱ्या खरिपाच्या आशा पल्लवित झाल्या असल्याने बळीराजा सुखावला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com