उंडाळे प्रादेशिक योजनेचे पुनरुज्जीवन, पहिल्या टप्प्यासाठी सात कोटी मंजूर

Satara
Satara

मलकापूर (जि. सातारा) : अनेक वर्षांपासून बंद असलेल्या उंडाळे प्रादेशिक योजनेच्या पुनरुज्जीवनाचे काम तीन टप्प्यांत करण्याचा प्रस्ताव आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यासाठी सात कोटी निधी मंजूर झाल्यामुळे जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून हे काम लवकरच सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रथम पाच गावांना पाणीपुरवठा होणार आहे. या टप्प्याच्या यशस्वीतेनंतर पुढील दोन टप्प्यांचे काम हाती घेण्यात येणार आहे. 

मलकापूरसह परिसरात शहरीकरण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे रहिवाशी विभागात वाढ होऊन या भागात दिवसेंदिवस व्यवसाय वाढत आहेत. याचा विचार करता सध्या मलकापुरात असणारी 24 तास पाणीपुरवठा योजना भविष्यात अपुरी पडणार आहे. ती सुरळीत चालावी, यासाठी योजनेच्या बळकटीकरणासाठी पालिकेने सात कोटी 50 लाखांचा प्रस्ताव तयार केला होता. त्याबरोबरच कोयना वसाहत ग्रामपंचायत हद्दीतील लोकसंख्येचा मलकापूरच्या योजनेवर पडणारा ताण विचारात घेऊन उंडाळे प्रादेशिक योजनेचे पुनरुज्जीवन होणेही गरजेचे आहे. ते दोन्ही प्रस्ताव तयार करून शासन दरबारी दिले होते. त्याला मान्यता मिळावी म्हणून तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 14 डिसेंबर 2016 रोजी सादर केला होता. परंतु, त्या प्रस्तावावर अंमलबजावणी झाली नाही.

योजनेमार्फत पहिल्या टप्प्यात मलकापूरसह कोयना वसाहत, जखिणवाडी, नांदलापूर व पाचवड फाटा-मळा, कालेटेक व धोंडेवाडी या गावांनासुध्दा शुध्द पाणीपुरवठा व्हावा, यासाठी तोच प्रस्ताव पुन्हा मंजूर करावा, अशी विनंती शासनाकडे करण्यात आली होती. तसे साकडे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना घातले होते. या योजनेची तत्कालीन पाणीपुरवठा व स्वच्छता सचिव विजयकुमार गोयल यांनी पाहणीही केली होती. त्यांनी योजनेचे पुनरुज्जीवन करण्याकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले होते. त्यास मान्यता मिळण्यासाठी ते अंदाजपत्रक शासनाच्या पाणीपुरवठा विभागाकडे 21 मे 2019 रोजी सादर केले होते. त्यास तत्काळ मंजुरी मिळावी, अशी मागणी केली होती. या मागणीचा विचार करून शासनाने पहिल्या टप्प्यासाठी सात कोटी निधी मंजूर केल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मलकापुरात नुकतेच जाहीर केले. त्यामुळे या योजनेच्या पुनरुज्जीवनाच्या कामाला लवकरच सुरवात होणार आहे. तसेच या योजनेचे नूतनीकरण झाल्यास या गावांबरोबरच कऱ्हाड दक्षिणेतील 17 गावांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. 


सहा गावांना स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा 

स्वच्छ पाण्याचे महत्त्व लक्षात आले असून, म्हणूनच या योजनेचे काम तीन टप्प्यांत केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात या योजनेतून कोयना वसाहत, जखिणवाडी, नांदलापूरसह आजूबाजूच्या पाच ते सहा गावांना स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा केला जाणार आहे. 

संपादन : पांडुरंग बर्गे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com