शेतकऱ्यांना ताबडतोब २०१९ च्या प्रमाणे नुकसान भरपाई मिळावी, यासह ऊसाच्या एफआरपीचे तुकडे करण्यासही विरोध असल्याचे निवेदन तालुक्यातील शेतकऱ्यांच्यावतीने तहसीलदारांना देण्यात आले.
कऱ्हाड (सातारा): अतिवृष्टी, ढगफुटीमुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे खरीप पिकांचे, नदीकाठावरील शेकडो हेक्टर ऊस पीकाचे नुकसान झाले आहे. त्याला दीड महिना उलटला तरी अद्याप शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. शेतकऱ्यांना ताबडतोब २०१९ च्या प्रमाणे नुकसान भरपाई मिळावी, यासह ऊसाच्या एफआरपीचे तुकडे करण्यासही विरोध असल्याचे निवेदन तालुक्यातील शेतकऱ्यांच्यावतीने तहसीलदारांना देण्यात आले.
शेतकरी शिवाजी पाटील, रवींद्र यादव, मनसे जिल्हा सचिव चंद्रकांत पवार, एस. के. पाटील, दशरथ पवार, सुहास पाटील, धोंडीराम पवार, पंढरीनाथ माने, सचिन महाडिक, अमोल पाटील, अनिल साळुंखे, तालुक्यातील शेतकरी यांनी हे निवेदन दिले. निवेदनातील माहिती अशी ः निती आयोग आणि कृषीमूल्य आयोग यांनी आगामी गळीत हंगामातील ऊसाची एफआरपी तीन टप्प्यात शेतकऱ्यांना देण्याची अन्यायकारक शिफारस केली आहे. याला केंद्र व राज्य सरकारने सोईस्कर मान्यता दिली आहे. या अन्यायकारक प्रकाराने अगोदरच पूर, अतिवृष्टी, कोरोना महामारी, अवकाळी पाऊस, सरकारचे चुकीचे धोरण, शेतमालाला हमीभावाचा अभाव अशा अनेक संकटांनी मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखेच झाले आहे.
एफआरपीचे तुकडे केल्याने शेतकऱ्यांना पिककर्जाची फिरवाफिरवी करताना मोठी अडचण येणार आहे. पहिला हप्ता कमी मिळाल्यामुळे शेतकऱ्याची कर्जे भागणार नाहीत. त्याचबरोबर शेतकऱ्यांना पुढील खर्चासाठी आर्थिक भांडवल उपलब्ध होणार नाही. त्यामुळे त्यांची मोठी आर्थिक कोंडी होणार आहे. त्याचबरोबर पुढील दोन हप्ते कारखाने त्यांच्या सोईनुसार देणार आहेत. त्यामुळे हे तीन हप्ते करणे अन्यायकारक आहे. ते लादु नये अन्यथा शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन उभारले जाईल, असा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.