
water intake for kidney health : पाणी हा जीवनाचा अमृततुल्य स्रोत आहे. शरीरातील प्रत्येक पेशी, अवयव आणि ऊतींना कार्यरत ठेवण्यासाठी पुरेसं पाणी मिळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. परंतु आपण खरंच योग्य प्रमाणात पाणी पितो का? कमी पाणी पिण्याने शरीर निर्जलीकरणाच्या (डिहायड्रेशन) समस्येला सामोरं जातं, तर जास्त पाणी पिणं देखील धोकादायक ठरू शकतं.
अनेकदा आपण ऐकतो की दिवसाला ८-१० ग्लास पाणी प्यावं, परंतु प्रत्येक व्यक्तीच्या शरीराच्या गरजेनुसार हे प्रमाण बदलतं. नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस, इंजिनिअरिंग आणि मेडिसिनच्या अहवालानुसार, पुरुषांनी दररोज ३.७ लिटर (१२५ औंस) आणि महिलांनी २.७ लिटर (९१ औंस) पाणी प्यावं. यामध्ये अन्न आणि पेयांमधून मिळणारं पाणीही समाविष्ट आहे.
१. शरीराचे वजन आणि रचना – शरीराचा आकार मोठा असल्यास पाणी अधिक लागते.
2. शारीरिक हालचाल – व्यायाम, धावणे किंवा शारीरिक मेहनतीची कामे करणाऱ्यांना जास्त पाणी लागते.
3. हवामान आणि पर्यावरण – गरम हवामान किंवा उष्ण प्रदेशात राहणाऱ्यांना जास्त घाम येतो, त्यामुळे त्यांना अधिक पाणी लागते.
4. आहार – तिखट, खारट किंवा प्रथिनेयुक्त पदार्थ जास्त खाल्ल्यास शरीराला पचनासाठी अधिक पाणी लागते. तसेच, खरबूज, काकडीसारखी पाण्याने भरपूर असलेली फळे आणि भाज्या शरीर हायड्रेट ठेवतात.
5. आजार आणि औषधं – ताप, अतिसार, किडनी विकार, मधुमेह यांसारख्या आजारांमध्ये पाण्याची गरज बदलते. काही औषधांमुळे पाण्याची पातळी प्रभावित होऊ शकते.
6. वय आणि लिंग – लहान मुलं, वृद्ध व्यक्ती, तसेच गरोदर किंवा स्तनपान देणाऱ्या महिलांना वेगळ्या प्रमाणात पाणी लागते.
7. मद्यपान आणि कॅफिनयुक्त पदार्थ – मद्य आणि जास्त चहा-कॉफीमुळे शरीर निर्जलीत होतं, त्यामुळे अतिरिक्त पाणी पिण्याची गरज असते.
फक्त कमी पाणी पिणं नाही, तर गरजेपेक्षा अधिक पाणी पिणं देखील शरीरासाठी घातक असू शकतं. हायपोनेट्रेमिया ही स्थिती अधिक पाणी प्यायल्याने उद्भवते. यामध्ये रक्तातील सोडियमचे प्रमाण कमी होते आणि त्यामुळे मतिभ्रंश, उलट्या, झोप येणं, दौरे येणं, अगदी कोमामध्ये जाण्याचा धोका असतो.
इंडिया टूडेच्या वृत्तानुसार, डॉ. भानू मिश्रा, (नेफ्रोलॉजिस्ट, BLK Max Super Speciality Hospital, नवी दिल्ली) सांगतात की, "अधिक पाणी प्यायल्याने किडनीवर ताण येऊ शकतो, विशेषतः आधीपासून किडनीच्या समस्या असणाऱ्या रुग्णांसाठी. यामुळे फुफ्फुसांमध्ये पाणी साचणे (पल्मनरी एडिमा) किंवा रक्तदाबाच्या समस्या निर्माण होऊ शकतात."
✔ शरीराच्या गरजेनुसार पाणी प्या, अती किंवा कमी टाळा.
✔ लघवीचा रंग हलक्या पिवळ्या रंगाचा असेल तर शरीर योग्य प्रमाणात हायड्रेट आहे.
✔ भूक आणि तहान यामध्ये गोंधळ होऊ नये म्हणून तहान लागली की पाणी प्या.
✔ एकाच वेळी खूप जास्त पाणी पिण्याऐवजी थोड्या थोड्या प्रमाणात दिवसभर पाणी प्या.
✔ गडद रंगाची लघवी, सुकं तोंड किंवा चक्कर येणं ही कमी पाणी पिण्याची लक्षणं आहेत.
✔ मोठ्या घोटांमध्ये पाणी पिण्याऐवजी हलक्या घोटांमध्ये प्या.
✔ तहान लागताच पाणी प्या, पण जबरदस्तीने जास्त पाणी पिऊ नका.
✔ जेवणाच्या अगोदर आणि नंतर थोड्या वेळाने पाणी प्या, जेवताना खूप पाणी पिणं टाळा.
✔ व्यायामानंतर किंवा उन्हात फिरून आल्यावर थंडगार पाणी न पिता कोमट पाणी प्यावं.
जर तुम्हाला थकवा, डोकेदुखी, कोरडी त्वचा, चक्कर येणे किंवा वारंवार लघवीला जाण्याची इच्छा होत असेल, तर पाण्याचे प्रमाण योग्य आहे की नाही याकडे लक्ष द्या. शरीराच्या गरजेनुसार योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने पाणी पिणं हेच आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.