
AI in Sugarcane Farming : राज्य सरकारने कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्याचे धोरण निश्चित केले आहे. याचा पहिला प्रयोग उसाच्या शेतीवर केला जाणार आहे. यासाठी राज्य सहकारी बँकेने पुढाकार घेतला आहे. एका साखर कारखान्यात हा प्रयोग केला जाणार आहे. राज्य बँक, साखर कारखाना आणि संबंधित ‘एआय’ कंपनी यांच्यात त्रिपक्षीय करार करण्यात येणार आहे. उसाच्या उत्पादनात ४० टक्के वाढ झाली तरच, हे धोरण स्वीकारले जाईल, अशी माहिती बँकेच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.
राज्यात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यास मान्यता दिली असून, त्यासाठी अर्थसंकल्पात ५०० कोटींची तरतूद केली आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी तर ही तरतूद आणखी वाढविण्याचे सूतोवाच केले आहे. शेतीत या तंत्राचा वापर करताना राज्यातील प्रमुख पिकांसाठी त्याचा वापर केला जाईल, असे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे. यामध्ये ऊस, कापूस ,सोयाबीन भात, केळी आदी पिकांचा समावेश आहे. मात्र असे असले तरी उसाच्या शेतीत जगभर चांगले निष्कर्ष आले आहेत. राज्यात देखील बारामतीच्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने यशस्वी प्रयोग केले आहेत. त्यामुळेच उसाच्या शेतीची ‘एआय’साठी निवड करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
वैयक्तिक शेतकरी शेतीत ‘एआय’चा वापर करण्यास लगेच तयार होण्याची शक्यता नसल्याने राज्य बँकेनेच पुढाकार घेऊन उसाच्या शेतीत हा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्यातील एका सहकारी साखर कारखान्याची निवड करण्यात येणार आहे. या साखर कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या सर्व सभासदांच्या ऊस शेतीसाठी ‘एआय’तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे तंत्रज्ञान देणाऱ्या कंपनीने उसाच्या उत्पादनात ४० टक्के वाढ करण्याचा दावा केला आहे. त्यामुळे या कंपनीशी करारही करण्यात आल्याचे राज्य बँकेकडून सांगण्यात आले. साधारण उसाचा एक हंगाम झाल्यावरच ‘एआय’ चे निष्कर्ष मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
उसाच्या शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी प्रती हेक्टर २५ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग राबविताना सर्व खर्च राज्य बँक करणार आहे. जर उत्पादनात ४० टक्के वाढ झाली तरच कंपनीला पैसे दिले जाणार आहेत. हे पैसे शेतकऱ्यांच्या ‘एफआरपी’ मधून वजा करून ते राज्य बँकेला देण्याची जबाबदारी संबंधित कारखान्यावर राहणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर,असाच प्रयोग इतर जिल्ह्यात होणार आहे. ज्याठिकाणी सक्षम जिल्हा बँका आहेत त्याठिकाणी तो प्राधान्याने करण्यात येणार आहे.
उसाच्या शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याच्या दृष्टीने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) येथे ९ जून रोजी व्यापक बैठक होणार आहे. बैठकीस सर्व सहकारी, खासगी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी, सर्व जिल्हा बँकेचे पदाधिकारी, राज्य बँक आणि शासनाच्या विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यात प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणाऱ्या या उपक्रमाचा त्रिपक्षीय करार होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.