
भारत डिजिटल क्रांतीच्या नव्या पर्वात प्रवेश करत आहे आणि यावेळी हे भविष्य केवळ वेगवान नाही तर हॅकप्रूफ असणार आहे. इस्रो (ISRO) आणि डीआरडीओ (DRDO) हे दोन महत्त्वाचे शास्त्रीय संस्था भारतासाठी अशक्य वाटणाऱ्या सुरक्षित डिजिटल संवादाची रचना करत आहेत आणि यामागील केंद्रबिंदू आहे ‘क्वांटम एंटॅंगलमेंट’ नावाचं अजब पण अद्भुत विज्ञान
अल्बर्ट आइन्स्टाइन यांनी ज्याला "spooky action at a distance" असं म्हणत गूढ म्हणून संबोधलं, ते म्हणजे क्वांटम एंटॅंगलमेंट. यामध्ये दोन कण (फोटॉन्ससारखे) एकमेकांशी एवढ्या घट्ट पद्धतीने जोडलेले असतात की एक कणावर परिणाम झाला तर दुसऱ्यावरही तितकाच प्रभाव होतो मग ते पृथ्वीवर असो वा अंतराळात.
आज डिजिटल युगात प्रत्येकजण इंटरनेटवर अवलंबून आहे बँकिंग, संवाद, संरक्षण, आरोग्य व्यवस्था आणि कित्येक गोष्टी ऑनलाइन चालतात. यासाठी डेटा सुरक्षित ठेवणं अत्यावश्यक आहे. सध्याच्या एन्क्रिप्शन प्रणाली ज्या गणिती गुंतागुंतीवर आधारित आहेत, त्या भविष्यात क्वांटम संगणकांच्या समोर निष्प्रभ ठरू शकतात. कारण हे संगणक सेकंदात कोडी उलगडू शकतात.
म्हणूनच, क्वांटम की डिस्ट्रीब्युशन (Quantum Key Distribution - QKD) ही संकल्पना पुढे आली आहे. यामध्ये संवाद करणारे दोन युझर्स (उदाहरणार्थ अॅलिस आणि बॉब) क्वांटम कणांच्या माध्यमातून सुरक्षित कळांची देवाणघेवाण करतात. जर कोणी तिसरा व्यक्ती (जिला 'ईव्ह' म्हटलं जातं) हे ऐकण्याचा प्रयत्न केला, तर लगेचच सिग्नल बदलतो आणि सुरक्षेचा अलार्म वाजतो.
भारताने या तंत्रज्ञानात पाऊल टाकत एक नवा टप्पा गाठला आहे. इस्रोने 300 मीटर अंतरावर फोटॉन व लेसरच्या सहाय्याने सुरक्षित व्हिडीओ संवाद यशस्वीपणे पार पाडला आहे. दुसरीकडे, डीआरडीओ आणि आयआयटी दिल्ली यांनी 1 किलोमीटरहून अधिक अंतरावर हॅकप्रूफ संवाद यशस्वी केला.
हे प्रयोग केवळ प्रयोगशाळेपुरते मर्यादित नसून, भारताच्या राष्ट्रीय संरक्षण, अर्थव्यवस्था आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या सुरक्षेसाठी निर्णायक ठरणार आहेत.
क्वांटम संवादासाठी तीन मुख्य मार्ग आहेत फायबर ऑप्टिक, मुक्त हवामार्ग (free-space) आणि सॅटेलाइट आधारित संवाद. फायबर प्रणाली शहरी क्षेत्रांसाठी उपयुक्त असून, मुक्त हवामार्ग प्रणालीचा उपयोग मोबाइल आणि ग्रामीण भागांतील संवादासाठी केला जातो. पण खरी क्रांती आहे सॅटेलाइट आधारित संवाद. चीनने आपल्या ‘मिसियस’ उपग्रहाद्वारे 1200 किमी अंतरापर्यंत यशस्वी क्वांटम संवाद साधला आहे.
भारत या स्पर्धेत थोडा मागे असला तरी इस्रोने सॅटेलाइट आधारित क्वांटम संवादासाठी योजना आखली आहे. डीआरडीओ युद्धभूमीवरील आणि ग्रामीण संवादासाठी सुरक्षित प्रणाली विकसित करत आहे. हे दोघं मिळून ‘राष्ट्रीय क्वांटम संवाद नेटवर्क’च्या दिशेने काम करत आहेत.
आज जिथे हॅकिंगच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत, तिथे क्वांटम संवाद केवळ एक शास्त्रीय शोध नसून भारताच्या स्वायत्ततेचं आणि सुरक्षिततेचं भविष्य आहे. तुमचं बँक खातं, वैयक्तिक माहिती, सरकारी गोपनीयता सगळं काही भविष्यात 'अनहॅक करण्याजोगं' होणार आहे.
इस्रो आणि डीआरडीओचं हे पाऊल भारताला जागतिक पातळीवर क्वांटम शक्ती बनवण्याच्या दिशेने नेत आहे. विज्ञान आणि सुरक्षेच्या या संगमात, भारताचं ‘क्वांटम युग’ सुरू झालं आहे आणि त्याचा फायदा प्रत्येक नागरिकाला होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.