प्रा. डाॅ. बिरबल साहनी : भारतात पहिल्या जीवाश्मविज्ञान संस्थेची केली स्थापना

प्रा. डाॅ. बिरबल साहनी :  भारतात पहिल्या जीवाश्मविज्ञान संस्थेची केली स्थापना

त्याचा जन्म ब्रिटिश शासित भारतातल्या आणि सद्य पाकिस्तानस्थित शाहपूर जिल्ह्यातल्या चहूबाजूनं डोंगर टेकड्यांनी वेढलेल्या ‘भेरा’ नामक एका छोट्याश्या गावात झाला. त्याचे बाबा ‘रुचीराम’ पेशानं प्राध्यापक असल्यानं घरात तसं शैक्षणिक वातावरण होतंच पण पुस्तकांइतकाच हा लहानगा आजूबाजूच्या डोंगरटेकड्यातही रमायचा..

पुस्तकातलं विस्मयचकित करणारं विज्ञान त्याला जेव्हा फुलंपानं-प्राणीपक्षी यांच्या स्वरुपात प्रत्यक्ष बघयाला-अनुभवायला मिळायचं तेव्हा तो भलताच हरखून जायचा.. बाबा मग नवनविन पुस्तकं आणून देत त्याचं कुतूहल अजूनच जागवत आणि तो पुन्हा निसर्गात या ज्ञानाचा शोध घेत बसे..या चक्रात तो बुद्धिमान विद्यार्थ्याइतकाच एक ‘निसर्गोपासक’ व्यक्तीमत्व म्हणून घडत गेला.. हिरवेगार माळरान, डोंगररांगा हे सगळं त्याला मंत्रमुग्ध करून टाकत असे..त्याचं प्राथमिक शिक्षण लाहोरस्थित सेंट्रल मॉडेल स्कूल या शाळेत झालं तर पंजाब विद्यापीठाच्या शासकिय महाविद्यालयात त्यानं आपलं उच्चशिक्षण पुर्ण केलं...त्याचे बाबा स्वत: इथं प्राध्यापक असले तरी तो मात्र तत्कालिन सुप्रसिद्ध वनस्पती शास्त्रज्ञ प्राध्यापक शिवदास कश्यप यांच्या छत्रछायेत अधिक रमला..

प्रा. डाॅ. बिरबल साहनी :  भारतात पहिल्या जीवाश्मविज्ञान संस्थेची केली स्थापना
'जय भीम' IMDB च्या यादीत सर्वोच्च स्थानी; 9.6 रेटिंग

१९११ साली पंजाब विद्यापीठातून बीएससी उत्तीर्ण झाल्यानंतर एका बाजूला ‘पुढं काय करावं?’ याचा शोध घेत असतांना दुसऱ्या बाजूला ‘हे सगळं झुगारून स्वत:ला स्वातंत्र्य चळवळीत झोकून द्यावं’ या विचारानं तो पेटून उठत असे..शेवटी तरुणच रक्त ते..

तो या द्विधा मनोवस्थेत असला तरी त्याच्या बाबाच्या डोक्यात मात्र याच्यासाठी काहीतरी वेगळ्या योजना होत्या.. “आपण पापभिरू-बुद्धिवादी-मध्यमवर्गीय माणसं..आपल्या चौकटीत राहून आपण मायभूमीसाठी काही करू शकत असलो तर ते उच्च शिक्षणच आहे” यावर बाबा ठाम होते..सरतेशेवटी हो ना करता करता वडिलांच्या इच्छेखातर ‘आयसीएस अधिकारी’ बनावं ही महत्वाकांक्षा मनात घेऊन तो इंग्लंडला रवाना झाला.

१९१४साली त्यानं केंब्रिज विद्यापीठातील इमॅन्युएल महाविद्यालयात पदवी घेत स्थानिक तत्कालिन सुप्रसिद्ध वनस्पती शास्त्रज्ञ प्राध्यापक ए.सी.नेवार्ड यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधनकार्यास सुरूवात केली आणि १९१९ साली लंडन विद्यापीठातून आपलं डाॅक्टरेटही पुर्ण केलं. लिहायला वाचायला अतिशय सहजसोपं वाटत असलं तरी अभ्यासासोबतच नव्वद रुपये वार्षिक शिष्यवृत्ती रकमेत हे सगळं पार पाडणं म्हणजे दिव्यच होतं.

प्रा. डाॅ. बिरबल साहनी :  भारतात पहिल्या जीवाश्मविज्ञान संस्थेची केली स्थापना
राजकुमारने गुडघ्यावर बसून पत्रलेखाला केलं प्रपोज; पहा साखरपुड्याचा Video

आपला दौरा अत्यंत यशस्वीपणे पार पाडत १९१६ साली तो मायदेशी परतला..आता ‘तो’ केवळ एक ज्ञानपिपासु-जिद्दी-कष्टाळू विद्यार्थी राहिला नव्हता तर आता ‘ते’ एक प्रतिष्ठित संशोधक झाले होते. इथल्या काशीस्थित हिंदू विद्यापीठात वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले.. उच्चशिक्षण-संशोधनकार्य हे सगळं इंग्लंडला झालं असलं तरी हा ‘भारत’ होता..इथला साधनसामग्रीचा अभाव बघता काम तसं अवघडच होतं.

बसायला स्वतंत्र जागा सोडा,वाचायला-शिकवायलाही व्यवस्थित सोय नव्हती पण ‘निमित्त’ शोधणाऱ्याला शेकडो समस्या भेडसावतात पण संधी हेरणारा कुठंही जुगाड जुळवून आणतो. व्हरांड्याच्या एका कोपऱ्यात ते आपलं वाचन-चिंतन-मनन पार पाडून विद्यार्थ्यांना शिकवायला सज्जही असत.

आपल्याकडं अनेकदा मुख्य प्रवाहातील राजकारणाला लाजवेल इतकं कौटुंबिक आणि संस्थात्मक राजकारण असतं त्यामुळं स्थानिक प्राध्यापक शाळकरी-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला अनुत्सूक असत-कमीपणा समजत याउलट अगदी परदेशी शिक्षण घेऊनही हे प्राध्यापक मात्र शिकवण्यास सदैव उत्साही तर असतच पण विद्यार्थ्यांना जीवही लावत. या सगळ्यामुळं विद्यार्थीवर्गात त्यांची लोकप्रियता दिवसागणिक वाढतच गेली.

प्रा. डाॅ. बिरबल साहनी :  भारतात पहिल्या जीवाश्मविज्ञान संस्थेची केली स्थापना
'तारक मेहता..' फेम 'बबिता'चा ट्रान्सफॉर्मेशन लूक; चार महिन्यांत वजन केलं कमी

यानंतर ते लखनौ शहरात रुजू झाले. याच दरम्यान त्यांचा पंजाबमधील प्रतिष्ठित आसामी रायबहादुर सुंदरदास यांची कन्या ‘सावित्री’ समवेत ते विवाहबद्ध झाले आणि सावित्रीच्या आयुष्यात येण्यानं त्यांना हक्काची एक श्रोता-मदतनीसच मिळाली.

प्राध्यापक महाशयांनी ‘जीवाश्म’ शोधून आणायचे आणि तिनं त्यांची व्यवस्थित छायाचित्र काढून ठेवायची हा त्यांचा नित्यक्रमच झाला.

त्यांनी सर्वप्रथम जिवंत वनस्पती आणि तद्पश्चात वनस्पतींच्या अवशेषांवर संशोधन केलं.भौगोलिकदृष्ट्या त्यातली उत्क्रांती अभ्यासली. बालपणापासूनच निसर्गोपासक असल्यानं त्यांना पुस्तकी सिद्धांत सहज आणि साकल्याने मांडता आले.

जीवाश्मांचा तुलनात्मक अभ्यास करून त्यांनी सद्य मृदा आणि कृषी समस्या कश्या सोडवता येतील याकडं लक्ष्य केंद्रीत केलं. भारतातील कोळसा खाणी आणि अनेक वनस्पती जीवाश्म अभ्सासत त्यांनी नवनविन तंत्र विकसित केली जी देशासाठी नव्हे तर जगासाठीही पथदर्शक ठरली.

लहानपणी ते ज्या डोंगरटेकड्यांवर रमायचे तिथं त्यांनी निसर्गाला विज्ञानाशी जोडत अनेक रहस्यांमागचे वैज्ञानिक कार्यकारणभाव शोधून काढले आणि जगाला अनेक चित्रविचित्र वनस्पतींबाबत ज्ञानवर्धक अशी माहिती दिली.

वनस्पतीशास्त्र आणि भूशास्त्र या दोन्ही प्रांतात ते सारखेच रमल्यानं दुहेरी आणि दुरगामी काम उभं राहिलं. त्यांच्यातल्या संशोधकातलं वैशिष्ट्य म्हणजे ते प्रयोगशाळा आणि पुस्तकं यांच्यापेक्षा थेट निसर्गात अधिक वावरले-रमले. भारतातल्या अद्भूत वनस्पतीजगताचा लेखाजोखा मांडत जगभरातील संशोधकांसाठी त्यांनी एक वेगळी पायवाट आखून दिली. हडप्पा-मोहेंजदडो इथं जात त्यांनी इथं ‘टाकसाळ’ असल्याचं सप्रमाण सिद्ध केलं आणि टाकसाळ कधीची जेव्हा युरोप अमेरिकेत चलन म्हणजे काय हे ही माहित नव्हतं तेव्हाची.

प्रा. डाॅ. बिरबल साहनी :  भारतात पहिल्या जीवाश्मविज्ञान संस्थेची केली स्थापना
आभाळाएवढं व्यक्तिमत्त्व पंडित नेहरु; पाहा दुर्मिळ फोटो...


इंडियन गोंडवानातल्या फुलपानांचा अभ्यास असेल किंवा बिहारच्या राजमहल डोंगररांगांतील संशोधन त्यांनी संशोधक मंडळींसाठी एक मोठा व्यापक खजिनाच खुला करून दिला यामुळं प्राचिन आणि आधुनिक वनस्पतींमधला विकासक्रम समजावून घेता आला..

जिम्नोस्पर्मसारख्या वनस्पती जीवाश्मांचा शोध असो किंवा तत्सम पेंटोझायलिज कुळातील वनस्पती असो त्यांची मांडणी ऐतिहासिक ठरली. या सगळ्या प्रपंचामुळं जगभरातल्या संशोधकांचं लक्ष्य वेधलं गेलं आणि वनस्पतीशास्त्राच्या अंगानं कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट अर्थात खंडांचं विलग होणं या सिद्धांतावर शिक्कामोर्तब झालं.

देशविदेशातील अनेक संशोधन संस्थांचे ते मानद सदस्य होते. त्यांनी स्वत: लखनौत भारतातल्या पहिल्यावहिल्या जीवाश्मविज्ञान संस्थेची( first paleontology institute in India) स्थापना केली. अर्थात तोपर्यंत त्यांचं आयुष्य मावळतीला लागलं होतं पण तोपर्यंत त्यांचं डोंगराएवढं संशोधनकार्य-वनस्पतीशास्त्रावरची पुस्तकं-शेकडो शोधनिबंध जगभरात प्रसिद्ध झाले-मार्गदर्शक ठरले. ते केवळ प्राध्यापक किंवा संशोधक नव्हते तर तेवढेच उच्च चित्रकला आणि संगीतप्रेमीही होते.ते शेवटच्या श्वासापर्यंत अगदी डाॅक्टरांचा सल्ला झुगारून कार्यरत राहिले आणि १० एप्रिल १९४९ साली त्यांचं देहावसान झालं..

भारतीय विज्ञान काॅंग्रेसनं त्यांच्या स्मरणार्थ पदक घोषित केलं ते म्हणजे ‘बिरबल साहनी पदक' आणि बुद्धी-चिकाटी आणि कौशल्य यांचा त्रिवेणी संगम असणारे हे अवलिया दिपस्तंभ म्हणजे प्रा.डाॅ.बिरबल साहनी..

आज डाॅ.साहनींचा जन्मदिन..विनम्र अभिवादन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com