वय अवघं 13 वर्षे ! आयुष्मानने बनवली साबणाचे पाणी रिसायकल करणारी मशिन

आयुष्मान नायक या तेरा वर्षांच्या मुलाने साबणाचे पाणी शुद्ध करण्याची मशिन तयार केली
Ayushman Nayak
Ayushman NayakCanva

सोलापूर : पृथ्वीवर (Earth) पाण्याचे प्रमाण 71 टक्के इतके असूनही ते पिण्यासारखे नाही. समुद्रात पाणी सुमारे 96.5 टक्के आहे. पृथ्वीतलावर पिण्यायोग्य पाण्याचे प्रमाण फक्त 3 टक्के आहे. पाणी प्रदूषण, (Water Pollution) वाया जाणारे पाणी (Waste Water) व वाढत जाणारी पाणीटंचाई यामुळे अनेक महानगरांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे. महानगरपालिकांकडून होणारा पाणीपुरवठाही शंभर टक्के स्वच्छ असेल याची गॅरंटीच आता राहिलेली नाही. यामुळे स्वच्छ पाणी मिळवण्यासाठी नागरिकांना आता आरओ प्लांटवर (RO Plant) अवलंबून राहावे लागत आहे. त्यातच धुणीभांडी, कपडे धुण्यासाठी व अंघोळीसाठी वाया जाणाऱ्या पाण्यामुळे काही ठिकाणी भीषण पाणीटंचाई जाणवत असते. त्यामुळे आता "पाणी वाचवा'चा संदेश दिला जात आहे. नागरिकही पाणी वापराबाबत सजग झाले असून, पाणी वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. असाच वाया जाणारे पाणी शुद्ध करून त्याचा पुनर्वापर करण्याचा प्रयत्न ओडिसातील 13 वर्षांच्या आयुष्मान नायक (Ayushman Nayak) या मुलाने केला आहे. त्यात तो यशस्वीही झाला असून, वॉशिंग मशिनमधून वाया जाणारे साबणाचे पाणी रिसायकल करण्याची मशिनच त्याने तयार केली आहे. (Thirteen-year-old Ayushman Nayak built a machine to purify soapy water)

ओडिसातील एक छोटेसे गाव. या गावातील सामाबेश नायक यांच्या कुटुंबात पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा विचार केला जातो. सामाबेश नायक हे एका मॅनेजमेंट स्कूलमध्ये प्रशासनाधिकारी आहेत व त्यांची पत्नी याच ठिकाणी ग्रंथपाल आहे. दोघे पती-पत्नी आपल्या घरातील पाण्याचा खूपच काटकसरीने वापर करतात. अंघोळीसाठी लागणारे पाणी, कपडे धुतलेले पाणी, इतर कामांसाठी लागणारे पाणी, अशा सगळ्या दैनंदिन कामांसाठी पाणी वापरत असताना त्याचा कमीतकमी वापर कसा होईल याची काळजी या कुटुंबातील प्रत्येक सदस्य घेत असतो. यातूनच त्यांचा मुलगा आयुष्मान नायक याने पाणी वाचवण्यासाठी एक नावीन्यपूर्ण कल्पना मांडली. त्याने वॉशिंग मशिनमधून वाया जाणाऱ्या साबणाच्या पाण्याचा पुनर्वापर करता येईल का, याबाबत संशोधन सुरू केले. त्याच्या या प्रयत्नाला यश देखील आले. त्याने एक अशी मशिन तयार केली, ज्यामुळे वॉशिंग मशिनमधून बाहेर पडणारे पाणी शुद्ध होते आणि ते पुन्हा वापरता येते.

Ayushman Nayak
"क' जीवनसत्त्व असलेल्या लिंबाला आला भाव ! रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी होतोय वापर

आयुष्मानला वॉशिंग मशिनमधून बाहेर पडणारे साबणाचे पाणी शुद्ध करून वापरण्याची कल्पना सुचली. वॉशिंग मशिनमधून रिसायकल केलेले हे पाणी पुन्हा कपडे धुण्यासाठीच वापरणे सहजशक्‍य आहे. आयुष्मान सध्या इयत्ता सातवीमध्ये शिकत आहे. पाण्याची काटकसर म्हणजे काय, हे त्याने लहानपणापासून घरातच अनुभवले. पाण्याचे महत्त्व ओळखून पाण्याच्या पुनर्वापराबाबत विचार तो करू लागला. वॉशिंग मशिनमधून जे साबणाचे हजारो लिटर पाणी बाहेर पडते ते फिल्टर करण्याची एक युक्ती त्याला सुचली. आयुष्मानचा हा शोध त्याने केंद्र सरकार समोरही मांडला. त्याच्या या शोधासाठी त्याला "इंटलेक्‍चुअल प्रॉपर्टी राइट पेटंट' मिळाले आहे.

आयुष्मान म्हणतो, "मला असे मशिन बनवायचे होते, ज्याद्वारे वाशिंग मशिनमधून बाहेर पडणारे पाणी शुद्ध करता येईल. तिसरीत असल्यापासूनच मी यावर विचार करत आहे.' आयुष्मानला 2017 मध्ये एपीजे अब्दुल कलम इग्नाइट ऍवॉर्ड मिळाले होते. या पुरस्कारासाठी जेव्हा तो गुजरातला गेला, तेव्हा त्याला इंजिनिअर्सनी त्याच्या कल्पनेतील मशिनला मूर्त रूप दिल्याचे पाहून सुखद धक्का बसला.

Ayushman Nayak
बालरोगतज्ज्ञ म्हणतात, तिसऱ्या लाटेत लहान मुले बनू शकतात सुपर स्प्रेडर ! अशी घ्या खबरदारी

अशी आहे आयुष्मानच्या वॉटर रिसायकल मशिनची रचना

एनआयएफच्या इंजिनिअर्सनी वॉशिंग मशिनमधून बाहेर पडणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी त्याला पाच स्तर असलेली फिल्ट्रेशन सिस्टम बसवली होती. इंजिनिअर्सनी आयुष्मानला त्यातील प्रत्येक स्तरावर कसे पाणी स्वच्छ केले जाते याची माहिती दिली. हजारो लिटर वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर कसा होऊ शकतो, त्यांनी सांगितलं. या संशोधनासाठी आयुष्मानला पेटंट मिळाले आहे. जे वीस वर्षांपर्यंत वैध आहे. सध्या हे पेटंट त्याचे वडील समाबेश नायक यांच्या नावावर आहे.

विद्यार्थ्यांना मिळते "एनआयएफ'चे प्रोत्साहन

एनआयएफचे तज्ज्ञ दरवर्षी केआयआयटी इंटरनॅशनल शाळेला भेट देतात. तेव्हा ते विद्यार्थ्यांना नवनव्या कल्पना शोधण्यासाठी आणि त्या सर्वांसमोर मांडण्यासाठी प्रोत्साहन देतात. विद्यार्थ्यांच्या या कल्पना ते लिखित स्वरूपात स्वीकारतात ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांच्या कल्पनेचे वैज्ञानिक स्पष्टीकरण केलेले असते, पुढे ते या कल्पनेवर कामदेखील करतात.

आयुष्मानने दोन कल्पना सादर केल्या होत्या. पहिली होती वॉशिंग मशिनमधील पाण्याचा पुनर्वापर आणि दुसरी होती हेल्मेटला वायपर बसवण्याची, ज्यामुळे पाऊस पडत असतानाही वाहन चालवताना काही त्रास होणार नाही, समोरचे स्पष्ट दिसेल. एनआयएफच्या इंजिनिअर्सनी यातील पाण्याच्या फिल्ट्रेशनवर काम करण्यास सुरवात केली आणि असे फिल्ट्रेशन करणारे यंत्रही बनवले. आयुष्मानची कल्पना प्रत्यक्षात उतरली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com