

Marine Conservation
esakal
लेखक : महेश शिंदे
बंगालच्या उपसागराकाठची ओडिशाची किनारपट्टी पुन्हा एकदा निसर्गाच्या अद्भुत सोहळ्याची साक्षीदार ठरली आहे. गहिरमाथा आणि रुषिकुल्या येथे यंदाच्या हंगामात ऑलिव्ह रिडले कासवांचे प्रारंभीचे आगमन सुरू झाल्याच्या बातम्यांमुळे पर्यावरणप्रेमींमध्ये उत्सुकता वाढली आहे. समुद्र आणि वाळू यांच्यातील हा हजारो वर्षांचा करार पुन्हा नव्याने साकार होणार असल्याची चाहूल लागली आहे. या वर्षीची अरिबाडा केवळ जैवविविधतेचा उत्सव नाही, तर हवामान बदल आणि वाढत्या मानवी हस्तक्षेपाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणीय सजगतेचीही कसोटी ठरणार आहे.
ओडिशाच्या किनाऱ्यावर दरवर्षी घडणारी ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांची सामूहिक अंडी घालण्याची घटना म्हणजे निसर्गाचा एक थरारक सोहळा आहे. रात्रीच्या अंधारात हजारो-लाखो मादी कासवे बंगालच्या उपसागरातून बाहेर पडतात आणि काही दिवसांच्या कालावधीत समुद्रकिनाऱ्यावर अक्षरशः ‘जिवंत चादर’ पसरल्यासारखी दृश्ये निर्माण होतात. या सामूहिक आगमनाला अरिबाडा असे म्हणतात.
ओडिशातील गहिरमाथा, ऋषिकुल्य समुद्र किनारा आणि देवी नदीचे मुख ही तीन प्रमुख अंडी घालण्याची केंद्रे जगप्रसिद्ध आहेत. गहिरमाथा हे जगातील सर्वात मोठ्या सामूहिक अंडी घालण्याच्या स्थळांपैकी एक मानले जाते. काही वर्षांत रुषिकुल्या किनाऱ्यावर काही लाख कासवांनी एकाच हंगामात अंडी घातल्याची नोंद झाली आहे.
ऑलिव्ह रिडले (वैज्ञानिक नाव लेपिडोकेलिस ऑलिव्हेशिया) ही प्रजाती जागतिक स्तरावर धोक्याच्या स्थितीत आहे. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनेने तिला ‘असुरक्षित’ श्रेणीत वर्गीकृत केले आहे. भारतात वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत तिला अनुसूची-१ मध्ये सर्वोच्च संरक्षण आहे. वन्यजीव आणि वनस्पतींच्या लुप्तप्राय प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावरील कराराअंतर्गत या प्रजातीच्या व्यापारावर पूर्ण बंदी आहे. त्यामुळे या घटनेचे संरक्षण हा केवळ स्थानिक नव्हे तर जागतिक जबाबदारीचे विषय बनतो.