
Direct Train to Srinagar : काश्मीरपर्यंत थेट रेल्वेने प्रवास करण्याचे स्वप्न आता साकार होणार आहे. जानेवारी २०२५ पासून या मार्गावर थेट रेल्वेसेवा सुरू होईल. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक (यूएसबीआरएल) प्रकल्पाच्या पूर्णतेमुळे हा ऐतिहासिक टप्पा गाठला जात आहे.
या प्रकल्पातील महत्त्वाचे कामे जवळपास पूर्ण झाली असून, उर्वरित टनेल T-33 आणि रियासी-कटरा सेक्शनचे काम डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ जानेवारी २०२५ रोजी या थेट ट्रेन सेवेला हिरवा झेंडा दाखवतील, अशी अपेक्षा आहे. हा प्रकल्प उत्तर काश्मीरला भारताच्या विस्तृत रेल्वे जाळ्याशी जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.
यूएसबीआरएल प्रकल्प ३८ बोगद्यांसह (एकूण ११९ किमी) भारताच्या रेल्वे इतिहासातील एक आश्चर्य ठरणार आहे. यामध्ये T-49 नावाचा देशातील सर्वात मोठा वाहतूक बोगदा (१२.७५ किमी) देखील आहे. या प्रकल्पात ९२७ पुलांचा समावेश असून, जगातील सर्वाधिक उंचीच्या चेनाब रेल्वे पुलाचीही नोंद आहे. हा पूल नदीपात्रापासून ३५९ मीटर उंच असून, तो आयफेल टॉवरपेक्षा ३५ मीटर उंच आहे. वारा २६० किमी प्रतितास वेगाने वाहिला तरीही पुलावर परिणाम होणार नाही, अशा उच्च दर्जाच्या सामग्रीचा वापर करण्यात आला आहे.
सांगलदान ते कटरा या ६३ किमी भागाचे अंतिम सुरक्षेचे निरीक्षण सुरू असून, रियासी-कटरा सेक्शनमधील १७ किमी अंतरावरील चार स्थानकेही डिसेंबरपर्यंत तयार होतील. या रेल्वेमुळे जम्मू आणि काश्मीरमधील संपर्कप्रणाली अधिक सक्षम होईल, तसेच या प्रदेशाचा आर्थिक विकास आणि जागतिक स्पर्धात्मकतेत मोठा वाटा उचलेल, असे केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी निरीक्षणादरम्यान सांगितले.
यूएसबीआरएल प्रकल्पाचा ऐतिहासिक प्रवास २००९ साली बारामुल्ला-काझीगुंड विभाग सुरू करण्यापासून झाला. २०१३ मध्ये काझीगुंड-बनिहाल, २०१४ मध्ये उधमपूर-कटरा आणि २०२४ मध्ये बनिहाल-सांगलदान सेवा सुरू करण्यात आली. दिल्ली ते बारामुल्ला हा सुमारे ७०० किमीचा प्रवास आता थेट रेल्वेमार्गाने सहज आणि सुखकर होणार आहे.
जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील पिर पंजाल पर्वतरांगांतील ऐतिहासिक जवाहिर बोगद्याचे नूतनीकरणही जोरात सुरू आहे. बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन (BRO) या प्रकल्पावर काम करत असून, ६२.५ कोटी रुपयांच्या या प्रकल्पात ऊर्जा-कार्यक्षम प्रकाशयोजना आणि रिअल-टाइम मॉनिटरिंग यंत्रणा समाविष्ट करण्यात येणार आहेत. २०२५ च्या सुरुवातीस या कामाची पूर्तता होईल.
दिल्ली-काश्मीर थेट रेल्वेसेवा प्रवाशांना हिमालयाच्या पर्वतरांगांपासून दिल्लीच्या सपाट मैदानी प्रदेशांपर्यंतचा विविधरंगी अनुभव देईल. हा प्रकल्प केवळ वाहतुकीसाठीच नव्हे, तर पर्यटनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरेल.
ही थेट रेल्वेसेवा भारताच्या प्रगत तंत्रज्ञान आणि अभियंत्यांच्या क्षमतेचे प्रतीक आहे. आता काश्मीरचे हिमालयीन स्वर्ग दिल्लीतील प्रवाशांसाठी काही तासांच्या अंतरावर असेल!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.