
पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : द्राक्ष, ऊस, टोमॅटो यांसह बागायती शेतीक्षेत्र, अशी ओळख असलेल्या निफाड मतदारसंघात शेतीसाठी लागणाऱ्या सेवासुविधाही तेवढ्याच व्यापक स्वरूपात आहेत. ३८ हजार ६६३ शेतीपंपांसाठी वीजजोडणी निफाड मतदारसंघात आहेत. बागाईतदारांचा तालुका म्हणून निफाडची ओळख असली तरी येथील शेतकरी तीन वर्षांपासून अवकाळी पाऊस, शेतीमालाचे घसरलेले दर यामुळे आर्थिकदृष्ट्या पिचला आहे. परिणामी, आतापर्यंत २७० कोटी रुपये वीजबिल थकले आहे. कृषी धोरण योजनेतून सवलत मिळवून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणच्या वतीने केले जात आहे.
पाण्याचे मुबलक स्रोत असल्याने निफाडमध्ये बारमाही पिके घेतली जातात. पिकांना पाणी देण्यासाठी सर्वच विहिरी, कूपनलिकेला वीजपंप आहेत. सर्वाधिक वीजजोडणी असलेल्या निफाडमधून दर महिन्याला सुमारे दहा कोटी रुपयांचा महसूल महावितरणला मिळतो. पण, गेल्या तीन-चार वर्षांपासून येथील शेतकरी अस्मानी-सुलतानी संकटांशी सामना करतो आहे. गेल्या वर्षी हातातोंडाशी आलेला द्राक्ष हंगामाचा घास कोरोनाने हिरावला. त्यामुळे बँकांच्या कर्जाची परतफेड करता आली नाही. शिवाय वीजबिलही थकले.
९० कोटी रुपयांची सवलत
निफाड मतदारसंघात एकूण ३५८ कोटी रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. त्यात सुमारे ९० लाख रुपये मुद्दल व दंडव्याज शासनाने कृषी वीजपंप धोरण या योजनेत सवलत दिली आहे. त्यामुळे थकबाकीची रक्कम आता सप्टेंबर २०२० अखेर २६९ कोटी ६९ लाख रुपये एवढी शिल्लक आहे. तर डिसेंबर महिन्याचे बिल दहा कोटी रुपये आहे. त्यातील पाच लाख रुपये वसुली आहे. त्यामुळे सुमारे २८० कोटी रुपये वीजबिल वसुलीसाठी शासन व महावितरणचे अधिकारी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करीत आहे.
वीजबिल भरताच मिळाले रोहित्र
कृषिपंप जोडणी योजनेंतर्गत थकबाकी भरल्यास ३३ टक्के रक्कम स्थानिक, ३३ टक्के जिल्हा व उर्वरित वीज खरेदी करण्यासाठी शासनाने योजना राबविली आहे. सावरगाव परिसरात चार दिवसांपूर्वी वीज रोहित्र जळाले होते. तेथील शेतकऱ्यांना या योजनेची माहिती देताच त्यांनी ८० टक्के म्हणजे तीन लाख रुपये वीजबिल भरले आणि अवघ्या दोन तासांत त्यांना नवीन रोहित्र देऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. वीजबिल भरणाऱ्या शेतकऱ्यांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सन्मान केला.
शासनाच्या कृषी धोरण योजनेचा निफाड मतदारसंघातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी व वीजजोडणी तोडण्याचा कटू प्रसंग टाळण्यासाठी सवलतीच्या दरात थकबाकी भरता येणार आहे.
-दिलीप बनकर, आमदार, निफाड
कृषी धोरण योजनेच्या जनजागृतीसाठी गावनिहाय ग्रामस्थांच्या सभा घेतल्या जात आहे. शेतकऱ्यांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे. या योजनेतून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होऊन महावितरणची वसुली होणार आहे.
-एकनाथ कापसे, उपकार्यकारी अभियंता, पिंपळगाव बसवंत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.