
आतापर्यंत व्यापाऱ्यांकडून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना चार कोटी रुपये परत मिळाले असून, १६९ व्यापाऱ्यांनी दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांना पैसे परत करण्याबाबत लिहून दिले आहे.
नाशिक/कळवण : शेतकऱ्यांच्या प्रश्नांची मला जाण असून, माझ्या मातृभूमीवर माझे प्रेम आहे म्हणून मी आता मातृभूमीच्या सेवेसाठी आलो आहे. त्यामुळे यापुढे जर कोणी शेतकऱ्यांची आणि सुशिक्षित बेरोजगार युवकांची फसवणूक केली तर गाठ माझ्याशी आहे, असा गर्भित इशारा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी कळवण येथे झालेल्या कार्यक्रमप्रसंगी दिला.
रवींद्र देवरे मित्रमंडळ कळवण तालुका व सर्वपक्षीय पदाधिकारी यांच्यातर्फे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांचा सत्कार समारंभ व शेतकरी संवाद कार्यक्रम साई लॉन्सवर झाला. ज्येष्ठ नेते बाबूलाल पगार अध्यक्षस्थानी होते. खासदार डॉ. भारती पवार, अपर पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, पोलिस उपअधीक्षक ढोले, कळवण पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, देवळा पोलिस निरीक्षक सुहास देशमुख, अभोणा सहाय्यक पोलिस निरीक्षक उमाकांत गायकवाड आदी प्रमुख पाहुणे होते.
हेही वाचा > काय बोलावं आता! जेव्हा न्यायाधिशांच्याच घरी होते चोरी; मुळासकट पुरावे नष्ट
शेतकरी फसवणुकीचा नवीन कायदा लवकरच
सत्कारप्रसंगी डॉ. दिघावकर म्हणाले, की नाशिक, नगर, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यात यापूर्वी शेतकरी फसवणुकीचे गुन्हे दाखल केले जात नव्हते, मी पदभार घेतल्यानंतर पाचही जिल्ह्यांतील पोलिस अधीक्षकांना शेतकरी फसवणुकीचे तत्काळ गुन्हे दाखल करण्याच्या सूचना केल्याने आतापर्यंत व्यापाऱ्यांकडून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना चार कोटी रुपये परत मिळाले असून, १६९ व्यापाऱ्यांनी दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांना पैसे परत करण्याबाबत लिहून दिले आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची २२ कोटी रुपयांची फसवणूक झाली असून, राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांनी आणि अन्य घटकांनी फसवणूक केल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना अमळनेर येथील कार्यक्रमात निदर्शनास आणून दिले. राज्य सरकार लवकरच शेतकरी फसवणुकीचा नवीन कायदा निर्गमीत करणार असल्याचे डॉ. दिघावकर यांनी या वेळी सांगितले.
हेही वाचा > एक हात बिबट्याच्या जबड्यात, तरीही चिमुकला थेट भिडलाच; 12 वर्षांच्या गौरवची धाडसी झुंज
डॉ. दिघावकर यांचा कळवण तालुक्यातील सर्वपक्षीयांतर्फे रवींद्र देवरे, नारायण हिरे, बाबूलाल पगार, शीतलकुमार अहिरे, दशरथ बच्छाव, संतोष देशमुख, भाऊसाहेब शिंदे यांनी सत्कार केला. या वेळी खासदार डॉ. भारती पवार, देवीदास पवार, राजेंद्र भामरे, संतोष देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास ॲड. परशुराम पगार, अशोक पवार, कृष्णा बच्छाव, शांताराम जाधव, शरद गुंजाळ, हेमंत पाटील, महेंद्र हिरे, अंबादास जाधव, जयंत पवार, अतुल पगार, नीलेश जाधव, बी. एन. पगार, मोतीराम पगार, विकास देशमुख, गोविंद पगार, रामा पाटील, कैलास चव्हाण, भाऊसाहेब शिंदे, नरेंद्र पवार आदी उपस्थित होते. राकेश हिरे यांनी सूत्रसंचालन केले.