Anti-Inequality Day : पावलोपावली अस्वस्थ करणाऱ्या विषमतेचा होतोय सामना...वाचा तरुणाईशी साधलेला संवाद..

Anti-Inequality Day.jpg
Anti-Inequality Day.jpg

नाशिक : कधी शहरी-ग्रामीण, तर कधी मुलगा-मुलगी, गरीब-श्रीमंत अशा विविध स्‍तरांवर आजही समाजात विषमता बघायला मिळते आहे. सुरवातीला विषमतेचा सामना करावा लागत असला, तरी मैत्री, प्रेम व सलोख्याच्‍या भावनेतून कालांतराने विषमता दूर झाली असल्‍याचा अनुभवदेखील अनेक तरुणांनी घेतलाय. अनेक पातळ्यांवर जाणवणारी विषमता तरुणाईला अस्‍वस्‍थ करत असून, ही विषमता समूळ नष्ट झाली पाहिजे, अशी भावना व्‍यक्‍त केली जाते आहे. 

तरुणाईशी साधलेला संवाद... 

ग्रामीण भागातून नाशिक शहरात जेव्हा शिक्षण घेण्यासाठी आल्‍यावर महाविद्यालयात इतर मुले बोलण्यास व मैत्री करण्यास तयार नव्हती. अशा परिस्थितीत प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला; परंतु कालांतराने सर्वांचा दृष्टिकोन बदलला. असे अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातून शिक्षणासाठी शहरात येतात, त्‍यांच्‍याशी विषमतेने वागायला नको. 
-यतीश देसले, कॉलेज रोड 

मला विषमतेचे अनेक अनुभव आले. काही वेळा अमाप खर्च करणाऱ्या मित्रांसोबत फिरायला जाताना, घरच्या परिस्थितीमुळे खर्च करताना कमी पडलो, तेव्‍हा खर्च बऱ्याच वेळा मित्रांनी केला; परंतु कालांतराने काही मित्र बाहेर येताना टाळाटाळ करताना जाणवल्‍याने आर्थिक विषमतेची जाणीव झाली. जोपर्यंत समाजातील, लोकांच्या मनातील विषमता नष्ट होत नाही तोपर्यंत समाजाची आणि देशाची प्रगती होणार नाही. - राजेश साळुंके, कॅनडा कॉर्नर 

सामाजिक काम करताना अनेक अनुभव असे येत गेले. ज्यामध्ये विरोधकांकडून वेळोवेळी जातीय विषमतेचा सामना करावा लागला. एखाद्या जातीचा आहे, म्हणून भेदभाव करणे हे मुळीच मनाला पटणारे नसले तरी अनेकांकडून हिणवले गेले. त्या वेळी भेदभावाची जाणीव दिसून आली. -अथर्व कुलकर्णी, कॅनडा कॉर्नर 

अनेक वेळेला नातेवाईक व इतर ठिकाणी जाताना, मुलगी आहे तर काम केले पाहिजे, स्वयंपाक केला पाहिजे असे बोलले जाते. तसे मुलांना कधीच बोलले जात नाही. एकदा बसने प्रवास करत असताना शेवटच्या पायरीवर उभी होते. एक काका बोलले, ‘तू मुलगी आहेस तू वरती ये मी खाली उभा राहतो.’ यावर वाटले की मुलगी इतकी पण कमजोर नसते. - श्वेता खोडे, इंदिरानगर 

महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर ग्रामीण भागातील व शेतकरी असल्याने कोणी लवकर व स्वतःहून बोलत नव्हते. सुरवातीला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत नव्हते. मला एकटीलाच काही दिवस राहावे लागल्‍याने वाईट वाटत होते. नंतर हळूहळू ओळख करत मी सर्वांसोबत मैत्री करून बोलायला लागले. ग्रामीण भागातील मुलींना अशा विषमतेचा सामना करावा लागायला नको. - दीपाली माळोदे, मखमलाबाद 

नोकरी करत असल्याने मला नियमित महाविद्यालयात जाता येत नव्हते. त्यामुळे महाविद्यालयातील काही मित्र-मैत्रिणी विषयाची काही माहिती विचारली असता, ते मदत करत नव्हते. त्यामुळे मला परीक्षा व रोज तासिका करण्यासाठी नोकरी सोडावी लागली. हळूहळू त्यांनी माझी परिस्थिती समजून घेऊन मला मदत केली. - राहुल मगर, मुंबई नाका 

संपादन - किशोरी वाघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com