कोरोनासोबतच पावसाळी साथरोगांचीही पडणार भर...काय असेल आरोग्य विभागाचा 'ऍक्शन प्लॅन'?

rain.jpg
rain.jpg

नाशिक : पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य विभागासमोर कोरोनासोबतच साथरोगांवर नियंत्रण मिळविण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या आव्हानाला तोंड देण्यासाठी आरोग्य विभागाकडून नॉन कोविड रुग्णांसाठी दोन हजार 380 खाटांचे नियोजन केले आहे. असे असले तरी, आरोग्य विभागात सध्या आरोग्यसेवक व सेविकांच्या तब्बल 40 टक्‍के जागा रिक्‍त असल्याने हे आव्हान आरोग्य विभाग कसे पेलणार, हा प्रश्‍न निर्माण होत आहे. 

पाणी शुद्धीकरण तपासणी रखडली

कोरोनाच्या व्यापामुळे अद्याप दुर्गम भागातील पाणी शुद्धीकरण तपासणीही रखडली आहे. हिवाळा व कोरोना, उन्हाळा व कोरोना हे समीकरण आपण गेल्या काही महिन्यांमध्ये पाहिले आहे; परंतु आता पुढील महिन्यापासून पावसाळा सुरू होत आहे. सुदैवाने यंदाच्या उन्हाळ्यात कुठल्याही साथरोगांचा संसर्ग झाला नाही. परंतु पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे तसेच इतर माध्यमातून होणाऱ्या संसर्गाचे प्रमाण मोठे असते. जिल्हा प्रशासनाकडून आरोग्य विभागाला पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या 66 गावांची यादी पाठविण्यात आली आहे. या गावांसाठी आरोग्य विभागाकडून मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. संबंधित गावांच्या संपर्कात राहून गावाची आरोग्यविषयक माहिती त्यांच्याकडून आरोग्य विभागाला कळविण्यात येणार आहे. शिवाय पाणी शुद्धीकरण तपासणी, गावात ओआरएसचे वाटप आदी कामांसाठी त्याचा सहयोग असेल. 

कोविड, नॉन कोविड विभागणीत अडचणी

पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर प्रामुख्याने डायरिया, कावीळ, टायफॉइड, न्यूमोनिया, मलेरिया, डेंगी, डोळे येणे आदी विविध साथरोगांचा धोका मोठ्या प्रमाणात असतो. पावसाळ्यात विशेषत: तापाची मोठी साथ असते. शिवाय न्यूमोनियामध्येही सुरवातीला ताप येत असतो. त्यामुळे अशा वेळी कोविड व नॉक कोविड रुग्णांची विभागणी करण्याचे मोठे आव्हान आरोग्य विभागासमोर असणार आहे. दरम्यान, सुरवातीला तापाची लक्षणे आढळली तरी संबंधित रुग्णांकडे कोरोनाच्या संशयानेच बघून त्यांची तापासाठी निर्माण केलेल्या प्युअर सेंटरवर स्वतंत्र तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. डावल साळवे यांनी दिली. पावसाळी साथरोगांच्या दृष्टीने हायरिस्क असलेल्या पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर तसेच इतर आदिवासी दुर्गम भागात सुदैवाने कोरोनाचा शिरकाव झाला नसल्याने आरोग्य विभागाला दिलासा मिळाला आहे. 

पाणी गुणवत्ता तपासणी रखडली 

पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभागाकडून ग्रामीण भागातील पाण्याची गुणवत्ता तपासणी करण्यात येत असते. पावसाळ्यातील बहुतेक साथरोग दूषित पाण्याच्या माध्यमातून होत असल्याने पाण्याची गुणवत्ता तपासूनच ते पिण्यायोग्य आहे की नाही हे ठरते. परंतु सध्या सर्वत्र कोरोनाचा संसर्ग झाला असल्याने आरोग्य विभागातील अनेक नियोजित कामे रखडली आहेत. आरोग्य विभागाची निम्म्याहून अधिक यंत्रणा कोरोना नियंत्रणासाठी गुंतलेली असल्याने ग्रामीण भागातील पाणी गुणवत्ता तपासणी अद्यापही पूर्ण झालेली नाही. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ती पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. 

आरोग्यसेवकांच्या 40 टक्के रिक्‍त जागा  

जिल्हा आरोग्य विभागाकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या पुरेशी असली, तरी गावाच्या आरोग्यव्यवस्थेत स्थानिक पातळीवर आरोग्यसेवक व सेविका यांची भूमिका महत्त्वाची असते. जिल्हा आरोग्य विभागात आरोग्यसेवकांच्या 40 टक्के जागा रिक्त असल्याने साथरोगांचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाला कंत्राटी स्वरूपात पदांची भरती करावी लागली आहे. 

उपजिल्हा रुग्णालये : 4, खाटांची क्षमता : 600 
ग्रामीण रुग्णालये : 24, खाटांची क्षमता : प्रत्येकी 30 
प्राथमिक आरोग्य केंद्रे : 106, खाटांची क्षमता : प्रत्येकी 10 
उपकेंद्रे : 592 गर्भवती तसेच इतर उपचारांसाठी 

कोरोनासोबतच पुढील काळातील साथरोगांच्या दृष्टीने आरोग्य विभागाकडून तयारी करण्यात आली आहे. दर वर्षी पावसाळी साथरोगांचा मोठा धोका असतो. त्यामुळे जिल्ह्यात नॉन कोविड रुग्णांसाठी तेवीसशे खाटांचे नियोजन करण्यात आले आहे. दुर्गम भागातील पाण्याची गुणवत्ता तपासण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल. - डॉ. कपिल आहेर, जिल्हा  आरोग्य अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com