
नाशिक : (येवला) एकीकडे कोरोनाच्या प्रादुर्भावाने जगण्याचे चक्र मंदावले असताना दुसरीकडे मात्र ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची साडेसाती नागरिकांना भेडसावू लागली आहे. पुरेसा पाऊस झाल्याने यंदा उशिराने टंचाई जाणवत असली तरी आता अडचणीच्या काळात तब्बल आठ गावांना पिण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रस्ताव पंचायत समितीकडे प्राप्त झाले आहेत.
गावाची तहान भागविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार
ब्रिटिशकालीन दुष्काळी असलेल्या या तालुक्यात मागील वर्षी सलग १८ महिने टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. म्हणजे फेब्रुवारी २०१८ मध्ये सुरू झालेला पाणीपुरवठा सलग ऑगस्ट-सप्टेंबर २०१९ पर्यंत सुरू होता. तब्बल २०० पर्यंत गावे - वाड्या होरपळून निघाल्या होत्या. दरवर्षीच तालुक्यात जानेवारीनंतर टँकरची मागणी सुरू होते. यंदा मात्र पावसाने सरतेशेवटी का महिना कृपा केल्याने तालुक्यात अद्यापही बऱ्यापैकी पाण्याची उपलब्धता आहे. तसेच पालखेड डावा कालवा लाभ क्षेत्रातील विहिरींना मागील महिन्यात कालव्याला आलेल्या शेतीसाठीच्या पाणी आवर्तनामुळे पाणी टिकून असल्याचे सध्या तरी चित्र आहे. मात्र मात्र उत्तर-पूर्व भागातील विहिरी, जलस्रोत कोरडे झाल्याने पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावू लागला आहे. त्यामुळे प्रशासनाला कोरोनाच्या संकटाचा सामना करताना या गावांची तहान भागविण्यासाठी टँकर सुरु करावे लागणार आहे.
पाणी टँकर सुरू करण्याची केली मागणी
तालुक्याच्या उत्तर पूर्व भागातील सर्वाधिक गावे ही दरवर्षी टंचाईग्रस्त गावांच्या यादीत असतात. पालखेड कालव्याला लाभ क्षेत्रात नसलेल्या गावांना पावसाच्या पाण्याव्यतिरिक्त कुठलाही पाणीस्रोत नसल्याने या गावांना पाणी टंचाई उन्हाळ्याच्या प्रारंभीच जाणवू लागते. त्यामुळे लहीत, आहेरवाडी, जायदरे, चांदगाव, हडप सावरगाव, खरवंडी, ममदापूर, तांडा वस्ती, आडसुरेगाव या गावांनी पाणी टँकर सुरू करण्यासाठी आपली मागणी पंचायत समितीकडे केली आहे. या प्रस्तावांची पडताळणी करून तहसील कार्यालयाकडे बुधवारी प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. दरम्यान टंचाईग्रस्त गावात सध्या शेतकऱ्यांच्या विहिरी किंवा कूपनलिकाच्या थोड्याफार पाण्यावरच नागरिकांची गरज भागत असल्याचे चित्र आहे.
प्रांताधिकारी नसल्याने होणार खोळंबा
सध्या येथील प्रांत कार्यालयात कायमस्वरूपी प्रांताधिकारी नसून मालेगाव येथील प्रांताधिकारी श्री. शर्मा यांच्याकडे अतिरिक्त पदभार आहे. तेही इकडे कधी येत नव्हतेच आता तर मालेगाव कोरोना हॉटस्पॉट ठरल्यामुळे त्यांचा व्याप वाढला आहे. त्यामुळे टँकरच्या प्रस्तावावर प्रांतांच्या सह्या होण्यासाठी विलंब होण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तहसील कार्यालयातून प्रस्ताव थेट जिल्हाधिकाऱ्यांनी मागवून घेत टँकरला मंजुरी द्यावी अशी मागणीही केली जात आहे.
तालुक्यात आता दिवसागणिक टंचाईची तीव्रता वाढत आहे. पंचायत समिती कार्यालयाकडून टँकरच्या प्रस्तावांना मंजुरी मिळविण्यासाठी पाठपुरावा करून तात्काळ टँकर कसे मंजूर होतील यासाठी प्रयत्न करणार आहे. नागरिकांची पाण्यासाठी हाल होणार नाही याची काळजी घ्यावी. - प्रवीण गायकवाड, सभापती, पंचायत समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.