अर्ली द्राक्षांना अपेक्षेपेक्षा खूपच कमी भाव; सलग दुसऱ्या वर्षी बागांचे नुकसान  

arli grapes.jpg
arli grapes.jpg

तळवाडे दिगर (जि.नाशिक) : नाशिक जिल्ह्यातील अर्ली द्राक्ष हंगामास नुकताच प्रारंभ झाला आहे. मात्र गेल्या तीन दिवसांपासून बागलाण तालुक्यात सुरू असलेल्या जोरदार परतीच्या पावसामुळे काढणीला आलेल्या द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तयार बाग काढण्यास नुकतीच सुरवात झाल्याने मोजकेच व्यापारी दाखल होऊन अत्यल्प दारात द्राक्ष विक्री शेतकऱ्यांना करावी लागत आहे. 

अर्ली द्राक्षांना अपेक्षेपेक्षा खूपच कमी भाव 
यंदा तालुक्यातील द्राक्ष उत्पादक पट्ट्यात सुरवातीपासूनच मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे छाटणीच्या सुरवातीपासून ढगाळ वातावरण व त्यात होणाऱ्या सततच्या बदलामुळे डावणी, करपा, गढ जिरणे, भुरी यांसारखे अनेक रोग वाढल्याने शेतकऱ्यांना बागा वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणत खर्च करावा लागला. तसेच उत्पादकांना अपेक्षित असलेला प्रतिकिलो ९० ते १०० रुपयांचा दर यंदा प्रतिकिलो ४५ ते ५५ रुपये इतका खाली आल्याने खर्चदेखील निघत नसल्याने अपेक्षाभंग झाला आहे. 

परतीच्या पावसामुळे सलग दुसऱ्या वर्षी बागांचे नुकसान 
प्रतिवर्षीप्रमाणे ऑक्टोबर महिन्यात नाशिक जिल्ह्यातील बागलाण, देवळा, कळवण तालुक्यांतील गावांमध्ये अर्ली द्राक्ष हंगामास सुरवात होते. मात्र, जिल्ह्यातील खरा द्राक्षांचा हंगाम जानेवारीत सुरू होत असला तरी सर्वांत आधी हंगाम सुरू करण्यात अर्ली छाटणी झालेल्या बागलाण तालुक्याने यंदाही बाजी मारली आहे. तालुक्यातील पश्चिम व दक्षिण पट्ट्यातील गावांतून अर्ली छाटणी केलेल्या काही बाग तयार असून, येत्या पंधरा दिवसांत खूप मोठ्या प्रमाणात माल काढणीयोग्य होणार आहे. 

हेही वाचा > मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर 

गेल्या तीन वर्षांतील अर्ली द्राक्षांचे दर 
वर्ष प्रतिकिलो मिळालेला दर 

२०१८ ९० ते १०० रुपये 
२०१९ ५५ ते ६० रुपये 
२०२० ४५ ते ५५ रुपये 

हेही वाचा > क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश

द्राक्षबागांवर कुऱ्हाड 
चालू वर्षी सुरवातीपासून द्राक्षबागांवर मोठ्या प्रमाणावरील पाऊस, वातावरणातील बदल व डावणी, करपासारख्या रोगांमुळे तालुक्यातील ३० ते ४० टक्के द्राक्षबागा रोगाला बळी पडल्याने शेतकऱ्यांना खर्च करून हंगामाआधीच सोडाव्या लागल्या. अनेक ठिकाणी द्राक्षबागांवर कुऱ्हाड घालण्याची वेळ यंदा तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे. 
 

यंदा सुरवातीपासून खराब हवामान व त्यात होणारा सतत बदलामुळे माल तयार कारणासाठी खूप कष्ट करावे लागले. त्यानंतर परतीच्या पावसाचे आक्रमण सुरू आहे. दुसरीकडे तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून काढणीला आणलेल्या हंगामपूर्व द्राक्षांनाही अपेक्षित दर मिळेनासा झाला आहे. त्यामुळे उत्पादक चोहोबाजूंनी संकटात सापडला आहे. -पंकज ठाकरे, द्राक्ष उत्पादक शेतकरी, तळवाडे दिगर  

संपादन - ज्योती देवरे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com