अतिवृष्टीने खरीप पिकांचे कोट्यावधींचे नुकसान; सलग तिसऱ्या वर्षी शेतकरी संकटात

heavy rain damaged crops in nashik district marathi news
heavy rain damaged crops in nashik district marathi news

नाशिक/निफाड : तीन वर्षांपासून दुष्काळ आणि अतिवृष्टीशी शेतकरीराजा सामना करीत आहे. चार महिन्यांपासून धो-धो कोसळणारा पाऊस आणि डोळ्यादेखत होणारी पिकांची नासाडी यामुळे शेती आणि शेतकऱ्यांचे गणित कोलमडले असून, या अवकाळी पावसाने निफाड तालुक्यातील खरीप पुरा धुतला जाण्याची शक्यता आहे. द्राक्षासह काढणीस आलेल्या खरिपाच्या पिकाची पुरती धुळधाण झाली आहे. 

उभ्या असलेल्या सोयाबीनला मोड फुटले

निफाड तालुक्यात खरिपाची प्रमुख पिके असलेल्या सोयाबीन, मका, कांदे, भाजीपाला या पिकांचीही नासाडी झाली आहे. काही ठिकाणी तर पावसाच्या पाण्यात संपूर्ण पिकेच वाहून गेले आहेत. गोदाकाठ भागातील सायखेडा, शिंगवे, चांदोरी, दिंडोरी, शिवरे व निफाड परिसरातील जळगाव कोठुरे, नैताळे, सोनेवाडी, कोळवाडी, उगाव परिसरात तसेच खडकमाळेगाव परिसरातील खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात उभ्या असलेल्या सोयाबीनला मोड फुटले आहेत. अनेक ठिकाणी शेतात पाणी आहे. त्याचा निचरा होत नसल्याने अनेकांनी सडलेले सोयाबीनचे पीक उपटून टाकले आहे. गेल्या वर्षी साडेतेरा हजार हेक्टरवरील सोयाबीनला अतिवृष्टीत जलसमाधी मिळाली होती. यंदाही मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या मागचे नैसर्गिक दुष्टचक्र तीन वर्षांपासून सुरूच आहे. 

शेतकरी संकटात सापडला

तालुक्यातील बहुतांश भागात सोयाबीन सोंगणीला आले आहे. त्यासाठी काही जण पाऊस उघडण्याची वाट पाहत आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने शेतात साठवून ठेवलेले पीक बाहेर काढणेदेखील अवघड झाले आहे. या पिकांना शेतातच मोड येण्याची शक्यता असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. गोदावरीसह तिच्या नद्यांना आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात शेतातून पाणी वाहिले. भरीस भर पुन्हा एकदा पावसाने डोके वर काढल्याने सोयाबीन, मका, कांदे, पालेभाज्यांचे नुकसान झाले आहे. उन्हाळ कांद्याची रोपेदेखील खराब झाली आहेत. सततच्या पावसामुळे शेती आणि शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. 


चार महिने झाले तरी पावसाळा उघडण्याचे नाव घेत नाही, अशा परिस्थितीत झालेल्या पिकांची नासाडी त्यामुळे होणारे नुकसान यातून कसा मार्ग काढायचा, याची चिंता भेडसावत आहे. सरकारने लक्ष घालून त्यातून मार्ग काढायला हवा; अन्यथा निफाड तालुक्यातील शेतकरी उद्ध्वस्त होतील. 
- शिवा पाटील-सुरासे , माजी प्रभारी सभापती, पंचायत समिती, निफाड 

चार महिन्यांपासून निफाडच्या बागायती पट्ट्याला पावसाचा फटका बसला आहे. प्रशासनाने बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. शेतकरी उद्‌ध्वस्त होण्याच्या मार्गावर असताना त्याला मदत करायला हवी. तातडीने पंचनामा करावा. निफाडच्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.  - विकास रायते  

संपादन - रोहित कणसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com