अखेर वणीच्या ग्रामस्थांची नाराजी दूर; समन्वय उपसमितीत स्थानिकांना सदस्यत्व

sapt shrungi 1.jpg
sapt shrungi 1.jpg

नाशिक (वणी) :  श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या नव नियुक्त विश्वस्त मंडळात स्थानिकांना डावलल्याचा आरोप करुन सप्तशृंगी गड ग्रामस्थ व्यक्त करीत असलेली नाराजी दूर करण्यासाठी जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायाधिश तथा श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे अध्यक्ष गणेश देशमुख यांनी संस्थानच्या घटनेतील तरतुदीनूसार समन्वय उप समिती गठीत करुन त्यात स्थानिकांना सदस्यत्व देण्याचा सकारात्मक निर्णय घेतल्याने  सप्तशृंगी गड ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले आहे.

अखेर वणीच्या ग्रामस्थांची नाराजी दूर

राज्यातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे स्वंयभू शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावरील आदिमाया सप्तशृंगी मंदीर देवस्थान संस्थानच्या विश्वस्त मंडळातील पाच सदस्यांची १ ऑक्टोबर २०२० ते ३० सप्टेबर २०२५ या पाच वर्षांसाठी निवड समितीने निवड प्रकियेद्वारे पाच विश्वस्तांची निवड केली. या निवडीत स्थानिकांना डावलल्याचा आरोप करीत सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. तसेच गडावर येणाऱ्या विश्वस्तांचा ग्रामस्थांनी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्याचा निर्णय शनिवारी, ता.३ ग्रामस्थांनी घेतला होता. मात्र संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायाधिश गणेश देशमुख यांनी ग्रामस्थांच्या नाराजी दुर करण्यासाठी सकारात्मकता दर्शविल्याने ग्रामस्थांनी निषेधात्मक आंदोलन स्थगित केले.

स्थानिक नागरिकांना घेण्याबाबत चर्चा

दरम्यान  रविवारी (ता. ४) सकाळी १० वाजेच्या सुमारास संस्थानचे अध्यक्ष गणेश देशमुख हे नवनियुक्त विश्वस्तांसह गडावर संस्थानच्या कार्यालयात आले असता,  देवस्थान अध्यक्षांनी स्थानिक ग्रामस्थांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी देवस्थान ट्रस्टच्या घटनेतील ३८ क्रमांकावर असलेल्या समन्वय तथा उपसमिती बाबतही चर्चा पुढे येवून समन्वय उपसमिती गठीत करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला. पाच वर्षांच्या विश्वस्त मंडळाच्या कार्यकाळात या उपसमितीवर दरवर्षी दोन असे एकूण दहा सर्वसमावेशक व विशेषतः स्थानिक नागरिकांना घेण्याबाबत चर्चा झाली. यास ग्रामस्थांनीही प्रतिसाद दिल्याने ग्रामस्थांची विश्वस्तपदाच्या नियुक्तीवरुन असलेली नाराजी काहीशी दूर झाली आहे.

उपसमितीसाठी नावांची यादी विश्वस्त मंडळाकडे सुपूर्द

दरम्यान विश्वस्त मंडळाच्या चर्चेआधी ग्रामस्थांनी अडीच तास प्रस्तावित उपसमितीसाठी नावे निश्चित करण्यासाठी ग्रामस्थांनी स्वतंत्र बैठक घेतली. यात होवू घातलेल्या ग्रामपंचायत  निवडणूक डोळ्यासमाेर ठेवून इच्छुक गटांनी एकमत होवू शकले नसल्याने काहीसा वाद निर्माण झाला होता. मात्र हा वाद ग्रामस्थांनी विश्वस्त मंडळापुढे न येऊ देता चिठ्ठी पध्दतीचा अवलंब करुन नावे काढण्यात येवून प्रस्तावित उपसमितीसाठी नावांची यादी ग्रामस्थांनी विश्वस्त मंडळाकडे सुपूर्द केली. दरम्यान  येत्या ६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या नूतन कार्यकारिणीच्या पहिल्याच मासिक बैठकीत या नावांबाबत विचारमंथन विश्वस्त मंडळाकडून आपला निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com