मोफत अन्नधान्यवाटपाचा सर्वाधिक फायदा नाशिकला...महिन्याला 'इतक्या' लाभार्थ्यांना मिळणार लाभ!

ration shop.jpg
ration shop.jpg

नाशिक : (येवला) कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत प्राधान्य कुटुंब व अंत्योदय योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारकांना एप्रिल ते जून तीन महिन्यांसाठी नियमित धान्याव्यतिरिक्त अतिरिक्त पाच किलो तांदळाचे मोफत वाटप केले जाणार आहे. याचा मोठा आधार सर्वसामान्यांना होणार असून, या योजनेचा राज्यात सर्वाधिक लाभ नाशिक जिल्ह्यातील एक लाख 78 हजार कार्डधारकांना होणार आहे. त्यांना दरमहा तीन हजार 851 टन तांदूळ मिळणार आहे. 

एक कोटी आठ लाख सदस्यांना होणार लाभ

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार प्रतिसदस्याला तांदूळ मोफत वितरित कारण्याचे आदेश निघाले आहेत. त्यानुसार राज्यात याची अंमलबजावणी सुरू झाल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिली. या योजनेत लाभार्थ्यांना नियमित अन्नधान्य त्या-त्या महिन्यातच वाटप होणार आहे. तांदळाचे वाटप करताना लाभार्थी नियमित अन्नधान्याची उचल करणारा हवा. अगोदर अंत्योदय योजनेतील कुटुंबांना नियमित 35 किलो अन्नधान्याचे वितरण केल्यानंतरच प्रतिसदस्याला पाच किलो वितरण होणार आहे. रास्त भाव दुकानदारांना ई-पॉजद्वारे अन्नधान्य वितरित करणे अनिवार्य आहे. दरम्यान, राज्य शासनानेही स्वस्त धान्य दुकानांमधून एप्रिल आणि मेसोबत जूनचे धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकाच वेळी तीन महिन्यांची धान्य वाहतूक, साठवणूक व वितरण अडचणीचे असल्याने प्रत्येक महिन्याला याचे वितरण होणार असल्याचे मंत्री भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. 
या योजनेचा लाभ राज्यातील 25 लाख पाच हजार 300 कार्डांवरील एक कोटी आठ लाख सदस्यांना होणार आहे. प्रत्येकी पाच किलोप्रमाणे राज्यात दरमहा 54 हजार टन तांदळाचे वाटप होणार आहे. आनंदाची बाब म्हणजे सर्व जिल्ह्यांपैकी नाशिकला सर्वाधिक लाभ होणार असल्याचे आकडे सांगतायत. 

तांदूळ किंवा गव्हासोबतच एक किलो डाळ देण्याची घोषणा

नाशिकमध्ये एक लाख 78 हजार 654 कार्डधारक असून, त्यांची सदस्यसंख्या सात लाख 70 हजार 177 आहे. त्यांच्यासाठी जिल्ह्याला दरमहा तब्बल तीन हजार 851 टन तांदूळ मिळणार आहे. नाशिकपाठोपाठ जळगाव जिल्ह्याला दोन हजार 929, अमरावतीसाठी दोन हजार 644, यवतमाळला दोन हजार 643, तर चंद्रपूरला तीन हजार टन तांदळाचे वाटप होणार आहे. केंद्र सरकारने गरिबाला पुढील तीन महिने प्रत्येकी पाच किलो तांदूळ किंवा गव्हासोबतच एक किलो डाळ देण्याची घोषणा केली आहे. मात्र अद्याप तांदळाव्यतिरिक्त इतर मदतीचे आदेश नसल्याने सर्वसामान्यांत संदिग्धता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com