'कांदा निर्यातबंदी कधी उठणार'?..शेतकऱ्यांच्या लागल्या नजरा

15-Onion.jpg
15-Onion.jpg

नाशिक : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या 2019-20 च्या पहिल्या अंदाजानुसार देशात गेल्यावर्षीपेक्षा 16 लाख टनाने कांद्याचे उत्पादन वाढणार आहे. 
केंद्रीय कृषी आयुक्तालयाचा 32 लाख टनाने रब्बीचे (उन्हाळ) उत्पादन वाढीचा अंदाज आहे. अशातच, सध्या बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या लेट खरिपाचे (रांगडा) उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा 10 ते 15 लाख टनाने अधिक होणार आहे. कांदा उत्पादन वाढीमध्ये नाशिकसह नगर पट्याचा मोठा सहभाग असून शेतकऱ्यांच्या कांदा निर्यातबंदी उठवण्याकडे नजरा लागल्यात. 

मुंबई, दिल्ली, नाशिकमध्ये घाऊक बाजारपेठेत किलोभर कांद्याचा भाव 25 रुपयांपर्यंत घसरला

महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, कर्नाटकमध्ये रांगड्या कांद्याचे उत्पादन घेतले जाते. यंदा हे उत्पादन 40 ते 50 लाख टनापर्यंत अपेक्षित आहे. देशाला महिन्याला 12 ते 13 लाख टनापर्यंत कांदा खायला लागतो. त्यामुळे रांगड्याचे वाढलेले उत्पादन पाहता, महिन्याचा आणि उन्हाळ कांद्याचे नुकसान वजा जाता तीन महिन्यांनी अधिकचे असे एकुण चार महिने अधिकचे उत्पादन देशात अपेक्षित आहे. ही सारी परिस्थिती पाहता, कांद्याच्या भावातील घसरण आताच थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. मुंबई, दिल्ली, नाशिकमध्ये घाऊक बाजारपेठेत किलोभर कांद्याचा भाव 25 रुपयांपर्यंत घसरला आहे. पुण्यात 20, देवळ्यात 23.50, लासलगावमध्ये 26, मनमाडमध्ये 25, पिंपळगावमध्ये 24.50, मालेगावमध्ये 23, कळवणमध्ये 25.50, उमराणेमध्ये 23, येवल्यात 24 रुपये किलो असा सरासरी घाऊक भाव शुक्रवारी (ता. 31) कांद्याला मिळाला. 

आयातीची मागणी रद्द 

देशांतर्गत बाजारपेठेत शुक्रवारी (ता. 31) किलोभर कांद्याला सरासरी मिळालेला भाव रुपयांमध्ये असा - आग्रा-38, अहमदाबाद-29, चेन्नई-40, इंदूर-25, कोलकोत्ता-38, पाटणा- 33, सूरत-22, कर्नूल-22. देशातंर्गत बाजारपेठेत कांद्याचे भाव वधारलेले असताना केंद्र सरकारने 1 लाख 20 हजार टन कांद्याची आयात करण्याचे धोरण स्विकारले होते. 36 हजार टन कांद्याच्या आयातीचा करार प्रत्यक्षात करण्यात आला. त्यापैकी 15 हजार टन कांद्याची आयात झाली असून आंध्रप्रदेश, केरळ, तेलंगणा, उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगालने आयात कांदा खरेदी केला. मात्र उर्वरित आयात कांद्याला मागणी नसल्याने आयात रद्द करण्याचे धोरण स्विकारण्यात आले. मात्र शेतकरी, व्यापाऱ्यांनी मागणी करुनही केंद्राकडून कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरवात केलेली नाही. मध्यंतरी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्राकडे कांदा साठवणुकीच्या मर्यादा आणि निर्यातबंदी हटवण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले होते. 

कांद्याची निर्यातबंदी उठवण्याची योग्यवेळ 

अतिवृष्टी, अवकाळी पावसाने कांद्याचे नुकसान मोठ्याप्रमाणात झाल्याने भाव वाढले होते. आता मात्र, फलोत्पादन आयुक्त बी. एन. मूर्ती यांनी गेल्यावर्षीच्या रब्बीमधील 157 लाख टनाच्या तुलनेत यंदा 189 लाख टन कांद्याच्या उत्पादनाचा अंदाज वर्तवला आहे. त्यातच सध्यस्थितीत कांद्याच्या भावात दिवसेंदिवस घसरण वाढीस लागली आहे. त्यामुळे कांद्याची निर्यातबंदी उठवण्याची योग्यवेळ आता आहे. - दीपक चव्हाण (शेती अभ्यासक, पुणे) 

मार्चनंतर कांदा मातीमोल भावाने विकावा लागेल

खरीप, लेट खरिपामध्ये शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन घेता आले नाही. अशातच, चांगले पाणी उपलब्ध असल्याने उन्हाळ कांद्याची लागवड अजूनही सुरु असून, ती 15 फेब्रुवारीपर्यंत चालेल असे दिसते. त्यावरुन उन्हाळ कांद्याचे गेल्यावर्षीपेक्षा दीडपट अधिक उत्पादनाची शक्‍यता दिसते. आताचा रांगडा कांदा बाजारात विक्रीसाठी असताना उन्हाळ कांदा बाजारात येण्यास सुरवात होताच, मार्चनंतर कांदा मातीमोल भावाने विकावा लागेल. - चांगदेवराव होळकर (माजी अध्यक्ष, नाफेड)  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com